Sunday, February 6, 2011

शिकले आता बाई म्हणूनी सारं बदललं........

                                "शिकले आता बाई म्हणूनी सारं बदललं" या समूहगीताचे स्वर गुंजत असतात आणि ते स्वर ऐकत आपण कधी एका वेगळ्या विश्वात जातो ते लक्षातही येत नाही.गावगुंफण हा माहितीपट पाहताना मला हा अनुभव आला. डॉ. शशीकांत अहंकारी व डॉ. शुभांगी अहंकारी या सेवाव्रती दाम्पत्याच्या ध्येयासक्त वाटचालीची माहिती यातून उलगडत जाते. या दाम्पत्याने ग्रामीण आरोग्यसेवेचे व्रत स्वीकारुन , उस्मानाबाद जिल्हयातील अणदूर या लहानशा गावात गेली पंचवीस वर्षे खडतर कार्य केले आहे.हॅलो मेडिकल फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी केलेल्या या कार्याची मांडणी प्रख्यात दिग्दर्शक अतुल पेठे यांनी गावगुंफण या माहितीपटाद्वारे केली आहे.
                             हा माहितीपट पाहिल्यावर आपले डोळे लख्खपणे उघडतात. विकासातला कोणताही अडसर एकांगी प्रयत्न करुन दूर करता येत नाही.कारण प्रत्येक अडसर हा विविध प्रश्नांच्या अभेद्य तटबंदीतला एक-एक दगड असतो. त्यामुळे एखादा प्रश्न सुटा करुन सोडविता येत नाही, सारी तटबंदीच खिळखिळी करावी लागते.त्यानंतरच ज्ञानाचा प्रकाश सर्वसामान्यांपर्यंत पोहोचू शकतो हे पूर्णसत्य ' गावगुंफण ' च्या माध्यमातून आपणाला उमगते.
                            मराठवाडा विकास आंदोलनाच्या पार्श्वभूमीमुळे 1980 च्या कालखंडातील मराठवाडयातील तरुण पिढी भारावलेली होती. त्यामुळे  उच्चशिक्षण घेतल्यानंतर काय करणार? असा प्रश्न  कोणाला विचारला तर  ' समाजाची सेवा ' असे उत्तर  मराठवाडयातील अनेकजण त्या काळी देत असत. असे असूनही शिक्षण पूर्ण झाल्यावर मात्र समाजसेवेचा सोयीस्कर विसर सार्‍यांना पडत असतो. पण लाखातील एखादी व्यक्ती सार्‍या सुखसोयींचा, तथाकथित करिअरचा त्याग करुन इतरांच्या जीवनात प्रकाश आणण्याचे व्रत स्वीकारते.अहंकारी दाम्पत्य या दुसर्‍या प्रकारात मोडणारे आहे. हॅलो मेडीकल फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी केलेल्या या
कार्यात डॉ. अशोक बेलखोडे, डॉ. संजय गायकवाड, डॉ. मनीषा निंबाळकर आदींची चांगली साथ लाभली हे माहितीपटातून उलगडत जाते.
                                             औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेतले तेव्हाच 1978-80 या कालखंडात डॉ. अहंकारी यांनी Health and Auto Learning Organization ( हॅलो ) ही संघटना स्थापन केली.1983 ला अणदूर येथे जानकी रुग्णालय सुरु करुन ग्राम आरोग्याच्या क्षेत्रातील सेवाकार्य  सुरु केले.हे कार्य करताना  त्यांना लक्षात आले की,शासकीय आरोग्यासेवा आणि लोकांच्या गरजा यात मोठी तफावत आहे.त्याचबरोबर हे देखील जाणवले की,सार्वजनिक आरोग्याचे प्रश्न सामाजिक, राजकीय तसेच विकासाच्या प्रश्नाशी निगडित आहेत.त्यातून बहुपेडी कार्याची प्रेरणा मिळाली.
                                    महितीपटातून समजते की, हॅलो मेडीकल फाउंडेशनच्या कार्याला आता चांगले यश लाभते आहे पण प्रारंभी खूप खडतर प्रसंगांना सामोरे जावे लागले.30 सप्टेंबर 1993 च्या महाभयंकर भूकंपानंतरच्या काळात 40 गावात आरोग्ययात्रा काढून केलेली सेवा, या परिसरातील जनतेशी सातत्याने सुरु असलेला आरोग्यसंवाद, बैलपोळ्याच्या माध्यमातून   आरोग्यसंदेश देण्यासारखे अफलातून प्रयोग, भारतवैद्य प्रशिक्षणातून महिलांना स्वावलंबी करण्याबरोबरच ग्रांमीण व दुर्गम भागात आरोग्यसुविधा पोहोचवण्याचा महत्वाकांक्षी उपक्रम, जातीधर्माच्या भिंती दूर करुन समानतेचे तत्व्‍ा समाजात रुजविण्यासाठी केलेले प्रयत्न याद्वारेच हॅलो मेडिकल फाउंडेशनला जनतेचा विश्वास संपादन करता आला.या विश्वासाच्या बळावर संस्थेने कार्यकर्त्यांचे व्यापक जाळे उभारले आहे.
                                                          प्रारंभी.जनतेशी संवाद साधण्यासाठी बचतगटाच्या व्यास्पीठाचा आधार घ्यावा लागला. व्यवसायकर्ज घेउन महिलांनी विविध व्यवसाय सुरु केले, याद्वारे महिलाशक्तीचे मोठे पाठबळ लाभले.यापाठोपाठ आरोग्य्‍ा विमा योजना,मुलींना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्यासाठी जानकी रुग्णालयाच्या माध्यमातून उभारलेले नर्सिंग स्कूल, तरुणींच्या प्रश्नांसाठीकिशोरी प्रशिक्षण कार्यक्रमयासारख्या योजना अमलात आणल्या.मुलांसाठी शब्दयात्रा वाचनालय,विज्ञानवाहिनीच्या सहकार्याने ग्रामीण विज्ञान केंद्र हे उपक्रम हाती घेतले.सावधान कलापथकाद्वारे युवकांना संस्थेच्या कार्यात सहभागी करुन घेतले व या कलापथकांमार्फत जनजागृतीचा संदेश गावागावात पोहोचविल जात आहे.वैद्यक सहाय्य समितीच्या कार्याद्वारे पुरुषमंडळीही विधायक कार्यात सहभाग नोंदवत आहे.समता, सामंजस्य आणि संयम या त्रिसूत्रीच्या आधारे सर्वांगिण विकास तसेच सर्वांसाठी आरोग्य या ध्येयाकडे निरंतर वाटचाल सुरु आहे.अणदूर परिसरात 17 वर्षात दोन लाखाहून अधिक ग्रामस्थांना आरोग्यसेवा पुरविण्याची कामगिरी निश्चितच अलौकिक आहे संस्थेच्या कार्याची व्याप्ती सातत्याने वाढते आहे.सोलापूर शहरात झोपडपट्टीतील महिलांच्या आरोग्यसमस्या सोडविण्यासाठीही व्यापक कार्य केले जात आहे..या सार्‍यामागे असलेल्या अथक परिश्रमांची योग्य दखल या माहितीपटाने घेतली आहे. डॉ. शशीकांत अहंकारी व डॉ. शुभांगी अहंकारी या सेवाव्रती दाम्पत्याच्या व त्यांच्या सहकार्‍यांच्या ध्येयासक्तीला सलाम करावा अशीच भावना हा माहितीपट पाहिल्यावर मनात निर्माण होते.      
                        या माहितीपटाचे निवेदन व दिग्दर्शन अतुल्‍ा पेठे यांनी वेधकपणे केले आहे.हा माहितीपट कुठेही कंटाळवाणा होत नाही, त्याचबरोबर वास्तवाचे भान सोडून उदात्तीकरण अथवा रंजकतेच्या वाटेला जात नाही , ही या माहितीपटाची बलस्थाने आहेत.आवश्यक तेथे कार्यकर्तांच्या मुलाखती देउन वलयांकिततेला फारकत दिली आहे. माहितीपटाच्या निर्मितीसाठी अतुल पेठे व मिलिंद जोग यांनी जवळपास चाळीस तास शूटींग केले, त्यातून हा तीस मिनिटांचा माहितीपट साकारला आहे.हा सामाजिक विषय मांडण्यासाठी त्यानी घेतलेले परिश्रम्‍ा यातून प्रतिबिंबित होतात. संहिता लिहिताना अतुल पेठे व अनुपमा पाठक यांनी काटेकोर नियोजन केले आहे. श्रीरंग उमराणी यांचे संगीत माहितीपटाच्या उद्देशाला पोषक आहे.चाळीस तासाच्या शूटींगमधून तीस मिनिटाचा माहितीपट संकलित करताना समीर शिरपूरकर यांनी किती कसरत केली असेल याची आपण केवळ कल्पना करु शकतो. हा माहितीपट केवळ या संस्थेपुरता मर्यादित न राहता सामाजिक कार्याविषयी आस्था असणार्‍या सर्वांनीच आवर्जून पाहायला हवा. संवादाच्या अभ्यासकंनीही माहितीपट कसा असावा यासाठी चांगला वस्तुपाठ म्हणून या माहितीपटाकडे पाहायला हवे. ग्रामीण भागातला कोणताही प्रश्न सोडवायचा असेल तर ग्रामव्यवस्थेतील सर्व घटकांचा सहभाग मिळवून आर्थिक विकासासह सामाजिक प्रश्न  सोडविण्यासाठी गावगुंफण करावी लागते हा संदेश मनावर ठसविण्यात माहितीपट यशस्वी झाला आहे.


                                                                                   -रवींद्र चिंचोलकर







No comments:

Post a Comment

कोण होतास तू काय झालास तू ?

खींचो न कमान को न तलवार निकालो जब तोप मुक़ाबिल हो तो अख़बार निकालो भारतावर इंग्रजांची राजवट होती त्या काळात अकबर इलाहाबादी यांनी लिहिलेला हा...