Sunday, August 5, 2012

टीआरपी म्ह्णजे काय रे भाऊ?


मरण पावलेला माणूस कधी पुन्हा जिवंत होतो का?पासपोर्टशिवाय परदेशात जाता येते काय? अशा चक्रावून टाकणार्‍या प्रश्नांचे उत्तर एकच आहे होय.जर ती भारतीय टीव्हीवरची मालिका असेल तर हे सारे शक्य आहे. भारतीय जनतेला टीव्ही मालिकांनी वेड लावले आहे आणि टीव्ही कार्यक्रम निर्मात्यांना टीआरपीने वेड लावले आहे. या टीआरपीसाठी असे वाट्टेल ते केले जाते.एखादया मालिकेचा टीआरपी कमी होऊ लागला की त्यात अशा चक्रावून टाकणार्‍या घटना घुसडल्या जातात.शेअरबाजारात ज्याप्रमाणे शेअरचा दर घसरला की उदयोजकाचे कोटयवधीचे नुकसान होते तसेच टीआरपी कमी झाला की मालिकेच्या निर्मात्याचे , टीव्ही वाहिनीचे कोटयवधीचे नुकसान होते.  

एवढी किमया करणारा हा टीआरपी म्ह्णजे आहे तरी काय? असा प्रश्न आपणाला पडू शकेल. टीआरपी हे टीव्ही कार्यक्रमाची लोकप्रियता मोजण्याचे एकक आहे. टीआरपी मोजणारी एकमेव यंत्रणा भारतात आहे, ती म्ह्णजे टेलिव्हीजन ऑडियन्स मेजरमेंट ( टॅम ) ही संस्था. अमेरिकेतली प्रख्यात संस्था नील्सन आणि कंटार मिडिया या दोन संस्थांनी मिळून टॅमची स्थापना केली आहे. टीव्ही वाहिन्यांवरील मालिका, न्यूज चॅनल यांच्या लोकप्रियतेचे मोजमाप टॅम करते. थोडक्यात टीआरपी मोजण्याच्या क्षेत्रात टॅमची दादागिरी आहे. त्यामुळे टॅमने जाहीर केलेली आकडेवारी खरी मानने हाच पर्याय सर्वांना स्वीकारावा लागतो. टॅमच्या या दादागिरीला प्रथमच एनडीटीव्ही या न्यूज चॅनलकडून मोठे आव्हान दिले गेले आहे. टॅममार्फत जाहीर केल्या जाणार्‍या टीआरपीच्या आकेवारीत हेराफेरी केली जाते असा आक्षेप एनडीटीव्हीने घेतला आहे आणि यासंदर्भात थेट अमेरिकेतील न्यूयॉर्क येथील सर्वोच्च्‍ा न्यायालयात दावा ठोकून नुकसानभरपाईची मागणी केली आहे. हा दावा तब्बल आठ हजार कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईसाठी केला गेला आहे. टॅमव्दारा टीआरपीच्या आकडेवारीत फेरफार केले जात असल्याचा पुरावा आमच्याकडे आहे असे एनडीटीव्हीचे म्ह्णणे आहे.

टॅमच्या आकडेवारीबाबत यापूर्वीही अनेकदा आक्षेप घेण्यात आले होते, पण टीआरपी मोजण्यासाठी आपल्याशिवाय दुसरा पर्यायच कोणाला उपलब्ध नसल्याची खात्री असल्याने टॅमने या आक्षेपांची दखल घेतली नाही.टॅमच्या कार्यपध्दतीबाबत प्रमुख आक्षेप आहे पीपलमीटरबाबतचा. भारतातील काही मोजक्या घरात टॅम पीपलमीटर हे यंत्र बसवते, ते यंत्र टीव्हीला जोडलेले असते, त्या घरातील टीव्हीवर कोणत्या वेळी , कोणते कार्यक्रम पाहिले गेले याची नोंद पीपलमीटर करते. हे पीपलमीटर कोणत्या शहरात, कोणत्या गावात, कोणाच्या घरात लावले जातातते टॅम कधीच उघड करीत नाही.एकशेवीस कोटी लोकसंख्या असलेल्या भारतात फक्त दहा हजार घरात पीपलमीटर लावले जातात. तेही प्रामुख्याने मुंबई , दिल्ली, कोलकाता, चेन्नई , पुणे अशा महानगरात. पूर्ण सोलापूर जिल्हयात एकतरी पीपलमीटर असेल का ते खात्रीपूर्वक सांगता येणार नाही.

पीपलमीटरच्या आकडेवारीत हेराफेरी होण्यास अनेक टिकाणी वाव आहे.ज्यांच्या घरात पीपल मीटर लावले जाते त्यांना अमुकच चॅनल लावा असे सांगितले जाऊ शकते.ही आकगेवारी गोळा करुन टॅमच्या कार्यालयात नेली जाते , तेव्हाही त्यात फेरबदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मुळात टॅमने टीआरपीची आकडेवारी जाहीर करायची आणि सर्वांनी ती मान्य करायची याशिवाय सध्यातरी दुसरा मार्ग नाही.या सार्‍या प्रक्रियेत पारदर्शकतेला वाव नाही.मग अशा स्थितीत टॅमवर आकडेवारीत फेरफार केल्याचे आरोप होणे साहजिकच आहे. चीनमध्ये 50 हजार पीपलमीटर बसवले जातात. भारतात मात्र दहा हजारापेक्षा कमी पीपलमीटर आहेत. पीपलमीटर बसविणे महाग पडते म्हणून टॅम त्यांची संख्या वाढविण्यास तयार नाही.दहा हजार पीपल मीटर्ची आकडेवारी एकशेवीस कोटी भारतीयांच्या मनाचा कौल देऊ शकते हे मान्य्‍ करणे कठीण आहे

कोणत्याही क्षेत्रात काम करणारी एकच संस्था असली की एकाधिकारशाही बळावते.यासाठी टीआरपीचे मोजमाप करणारी आणखी एखादी संस्था असायला हवी. भारत सरकारचेही  माध्यम धोरण निश्चित नसल्याने अशा प्रकरणी काय करावे त्याबाबत सरकार गोंधळलेले आहे. आम्ही चौकशी करु असे आता सरकारने जाहीर केले आहे.

टॅमच्या विरोधात न्यायालयीन लढाई लढण्यासाठी एनडीटीव्हीने दाखविलेले धैर्य कौतुकास्पद आहे. या घटनेचा फार मोठा परिणाम टीआरपी मोजण्याच्या पध्दतीवर होईल व त्यातून पारदर्शकतेकडे वाटचाल सुरु होईल अशी अपेक्षा आहे

कोण होतास तू काय झालास तू ?

खींचो न कमान को न तलवार निकालो जब तोप मुक़ाबिल हो तो अख़बार निकालो भारतावर इंग्रजांची राजवट होती त्या काळात अकबर इलाहाबादी यांनी लिहिलेला हा...