Tuesday, February 13, 2018

समाज माध्यमातील करिअर संधी

एकविसाव्या शतकाच्या आरंभाबरोबरच भारतात माहिती तंत्रज्ञानाचा प्रसार  वाढू लागला होता. त्या काळात मला एका मित्राने म्हटलेअरे गूगलवर शोधल्यावर तुझी काहीच माहिती दिसत नाही’. त्यावेळीच मला धक्का बसला होता. आता तर फेसबुक, व्टिटर, इन्स्टाग्राम, लिंक्डइन, वॉटसअप यासारख्या समाज माध्यमांशिवाय आपल्या अस्तित्वाला काहीच अर्थ नाही असे प्रत्येक व्यक्तीला वाटू लागले आहे. मोबाईलचा वापर तर वेड म्हणावे इतका वाढला आहे

भारतात 100 कोटीपेक्षा अधिक लोक मोबाईल वापरतात. शेतमजुरापासून उद्योगपतीपर्यंत प्रत्येकजण मोबाईलचा वापर करतो आहे. माणसाचे रुपांतर डाटामध्ये झाले आहे असे आता म्हटले जाते. अर्धा तास फेसबुक किंवा वॅाटसअप बंद पडले तर अनेकांच्या मनाची मोठी तगमग होते. माहिती तंत्रज्ञानाच्या झपाटयामुळे जग गतीने बदलले आहे, हेच खरे. याचा मोठा प्रभाव समाजजीवनावर पडला असून त्यामुळे नवनवीन क्षेत्रे विकसित झाली. त्यात समाज माध्यमे (सोशल मिडिया), डिजिटल माध्यमे, ऑनलाईन माध्यमे यांचा प्रामुख्याने समावेश करता येईल.या नव्या क्षेत्रात रोजगाराच्या नवीन संधीही वाढल्या आहेत.  संदेशाचा सर्वत्र झटपट प्रसार करण्याची शक्ती या माध्यमात आहे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यत पोहोचण्यासाठी ही माध्यमे उपयुक्त आहेत,  त्यामुळे या माध्यमाकडील ओढा वाढतो आहे. या माध्यमांमध्ये ज्या करिअर संधी निर्माण झाल्या आहेत, त्यातील प्रमुख संधी खालीलप्रमाणे आहेत.
सोशल मिडिया मॅनेजर आपल्या अथवा संस्थेच्या, कंपनीच्या प्रगतीसाठी  सोशल मिडियाचा वापर केला तरच आपण टिकून राहू शकू याची जाणीव सर्वांना झाली आहे. त्यामुळे सोशल मिडियाव्दारे आपली चांगली प्रतिमा निर्माण करण्याचे, जोपासण्याचे काम व्यक्ती, संस्था, कंपनीला करावे लागते.फेसबुक, व्टिटर, इन्स्टाग्राम, वॉटसाप इत्यादी सोशल मिडियाव्दारे लोकांपर्यंत संस्तेची, कंपनीची माहिती पोहोचविण्यासाठी कुशल मनुष्यबळ लागते. राजकीय पक्ष, कार्पोरेट संस्था, सेलेब्रिटी यांना तर त्यांच्यासाठी हे  काम करणा-यांची मोठी फौजच लागते.यासाठी सोशल मिडिया मॅनेजर त्यांच्या हाताखाली अनेकजण कार्यरत असतात. तालुक्याच्या , जिल्हयाच्या ठिकाणी काम करणा-या व्यक्ती आणि संस्थांनादेखील याची गरज भासू लागली आहे.प्रसिध्द व्यक्तींच्या समाजमाद्यमांवरील मजकुराचे नियोजन करणे, त्यातील मजकूर अद्यावत करणे, विचारल्या जाणा-या प्रश्नांना उत्तरे देणे इत्यादी कामे यात करावी लागतात.
या पदावर काम करण्यासाठी पत्रकारितेचा अभ्यासक्रम पूर्ण असणे, मराठी इंग्रजी भाषेवर चांगले प्रभुत्व असणे, सोशल मिडियाच्या हाताळणीचे चांगले ज्ञान असणे, कमी शब्दात आशयघन लेखनाची सृजनशीलता असणे गरजेचे आहे.
डिजिटल मार्केटिंग मॅनेजर –   ऑनलाईन विपनणासाठी केल्या जाणा-या कार्याला एकत्रितपणे डिजिटल मार्केटिंग असे म्हटले जाते. वेबसाईट, सर्च इंजिन, मेल , मोबाईल ऍप इत्यादीव्दारे जाहिराती लक्ष्यित गटापर्यंत पोहोचविणे हे यात मह्त्वाचे असते. ‘कंटेंट इज किंगहा आजच्या काळातील यशस्वितेचा मंत्र आहे. त्यामुळे आपल्या उत्पादन अथवा सेवांची माहिती प्रभावीपणे ग्राहकापर्यंत पोहोचविणे हे सर्वात महत्वाचे कार्य बनले आहे. विपणनाच्या क्षेत्रात सध्याच्या काळात फार मोठी स्पर्धा सुरु आहे. कंपन्यांची आणि उत्पादनांची संख्या मोठया प्रमाणात वाढल्यामुळे लक्ष्यित गटापर्यंत विपणनाचा संदेश कसा पोहोचवायचा हा अवघड प्रश्न आहे. याचे उत्तर डिजिटल मार्केटिंगमध्ये आहे. आता प्रत्येक कंपनी आपली उत्पादने, योजनांची माहिती देण्यासाठी डिजिटल मार्केटिंगचा उपयोग करतात. बाजारपेठ निश्चित करणे, जाहिरात धोरण ठरविणे यासाठी तसेच विपणन योजनेचे विश्लेषण करण्यासाठी डिजिटल मार्केटिंग उपयुक्त ठरते. ऍमेझॉन , फ्लिफकार्ट , .एल.एक्स. यासारख्या ऑनलाईन विक्री करणा-या कंपन्या, मेक माय ट्रिप ,रेडबस तसेच ओला, उबरसारख्या वाहन सेवा पुरविणा-या कंपन्यांसह अनेक कंपन्यांमध्ये अशी पदे उपलब्ध होतात.
या पदावर काम करण्यासाठी पत्रकारिता/ मार्केटिंगचा अभ्यासक्रम पूर्ण असणे, मराठी   इंग्रजी भाषेवर चांगले प्रभुत्व असणे, प्रभावी जाहिरात लेखनाचे कौशल्य असणे आवश्यक आहे.
ऑनलाईन प्रॉडक्ट जर्नालिस्ट ऑनलाईन माध्यमांव्दारे उत्पादनाची माहिती ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याचे काम यात पत्रकाराला करावे लागते. कंपनीची उत्पादने ग्राहकासाटी कशी उपयुक्त आहेत, याचे फायदे कोणते आहेत, याचा वापर कसा करावा, ज्या ग्राहकांनी याचा वापर केला ते कसे समाधानी आहेत यावर आधारित वृतांत  देण्याचे काम यात करावे लागते. ही माहिती फेसबुक, व्टिटर, यूटयुब यासारखी समाजमाध्यमे अथवा मोबाईल ऍपव्दारे ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याचे काम पत्रकाराला प्रभावीपणे करावे लागते. यात उत्पादनाला ब्रँड म्हणून प्रस्थापित करणे, ब्रँडची प्रतिष्ठा वाढविणे, ब्रँडबद्दल ग्राहकांचा दृष्टीकोण जाणून घेणे यासारखी कामे करणे अपेक्षित आहे.
या पदावर काम करण्यासाठी पत्रकारितेचा अभ्यासक्रम केलेला असण्याबरोबर, इंटरनेट वापराचे चांगले ज्ञान असणे गरजेचे आहे. समाजमाध्यमांव्दारे प्रभावीपणे लेखन करणे, ब्लॅागवर मजकूर लिहिणे, व्हिडिओ तयार करणे संपादित करणे इत्यादी कामे करता येणे आवश्यक आहे.
कंटेंट रायटर / एडिटर  माहिती प्रस्फोटाच्या युगात आपण आहोत. माहितीचा प्रवाह सर्व दिशांनी लक्षावधी माहिती स्रोतातून निरंतर वाहता असतो. आपल्या वाचकांना नेमक्या ज्या माहितीत स्वारस्य आहे अशीच माहिती तयार करणे आवश्यक झाले आहे. समाज माध्यमांवर असे लेखन करणा-यांची खूप गरज असते. असे लेखनाचे काम करण्या-यास कटेंट रायटर म्हटले जाते. वाचकांना हवी असणारी माहिती निवडून संपादित करणा-यास कंटेंट एडिटर म्हणतात. यात प्रामुख्याने बेबसाईट, ब्लॅाग, समाज माध्यमांसाठी मजकूर लेखन करणे, संपादित करणे ही कामे करावी लागतात. या पदावर नोकरीच्या अनेक संधी सोशल डिजिटल माध्यम क्षेत्रात उपलब्ध आहेत. न्यूज हंट, वे टू एस.एम.एस. यासह विविध संस्थांमध्ये अशा नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत.
 या पदावर काम करण्यासाठी पत्रकारिता / इंग्रजी भाषा अभ्यासक्रम पूर्ण केलेला असणे आवश्यक आहे. भाषेवर प्रभुत्व असणे, लेखनाची आवड क्षमता असणे, मराठीतील मजकूर इंग्रजीत, इंग्रजीतील मजकूर मराठीत भाषांतरित करता यायला हवा.
वेब जर्नालिस्ट वृत्तपत्रांच्या ऑॅनलाईन आवृत्ती तसेच ऑनलाईन वृत्तपत्रे (वेबपोर्टल ) यांची त्याचबरोबर त्यांच्या वाचकांची संख्या मोठया प्रमाणात वाढते आहे. या माध्यमांसाठी उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक इत्यादी पदे गरजेची असतात. इनाडू , वेबदुनिया यासारख्या अनेक वेबपोर्टल्समध्ये, तसेच प्रमुख वृत्तपत्रांच्या ऑनलाईन आवृत्तीत या संधी उपलब्ध आहेत.स्वतःचे वेबपोर्टल सुरु करणे हा पर्यायही सहज उपलब्ध आहे. कारण वेबपोर्टल सुरु करणे फारसे खर्चिक नाही उस्मानाबाद लाईव, आज लातूर, बार्शी लाईव यासह जिल्हयाच्या ठिकाणी पत्रकारांनी सुरु केलेली वेब पोर्टल्स चांगली कार्यरत आहेत.
हे काम करण्यासाठी पत्रकारितेचा अभ्यासक्रम पूर्ण असणे. संगणक हाताळणीचे चांगले ज्ञान असणे. ऑनलाईन वृतपत्रासाठी लेखन संपादन करण्याची क्षमता असणे गरजेचे आहे.
ऍडवोकसी मॅनेजर- एखादया विचाराचे , कार्याचे समर्थन करण्यासाठी, समाजाचा पाठिंबा मिळविण्यासाठी केल्या जाणा-या कामगिरीला मिडिया ऍडवोकसी असे म्हटले जाते. या क्षेत्रात कार्य करणा-या संस्थांमध्येही नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध आहेत.
या पदावर कार्य करण्यासाठी पत्रकारितेची पदवी, सामाजिक प्रश्नांची जाण, संगणकावर काम करण्याचे तांत्रिक कोशल्य, भाषेवर प्रभुत्व ही कौशल्ये असणे आवश्यक आहे.

 याशिवाय मार्केटिंग ब्लॉगर, डिजिटल मिडिया एक्झिक्युटीव, डिजिटल मिडिया प्लॅनर, सोशल मिडिया एक्सपर्ट, सोशल मिडिया प्लॅनर, सोशल मिडिया मार्केटिंग हेड यासारखी समकक्ष पदेही उपलब्ध आहेत.स्वतःचे न्यूज ऍप सुरु करणे अथवा स्वतःचे यू ट्युब चॅनल सुरु करणे देखील सहज शक्य आहे. एकंदरित सोशल मिडिया, डिजिटल मिडिया हेच यापुढच्या काळातील वास्तव आहे. या क्षेत्रातील नोकरीच्या संधी मिळविण्यासाठी पत्रकारितेच्या अभ्यासक्रमाशिवाय डाटा ऍनालिटिक्स, डिजिटल मार्केटिंग, सोशल मिडिया याच्याशी निगडित एखादा प्रमाणपत्र अभ्याक्रम पूर्ण करने आवश्यक आहे.
 ( लोकराज्य मासिकात फेब्रुवारी २०१८ च्या अंकात प्रसिध्द झालेला लेख )

Tuesday, April 11, 2017

माझ्या मराठीचा बोलू कौतुके – कासवही पैजा जिंके

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात तब्बल आठ पुरस्कारांवर मोहोर उमटविणा-या मराठी चित्रपटांचा डंका देशभर वाजतो आहे. ‘कासव’ सुवर्णकमळाच्या शर्यतीत जिंकले आहे. ‘व्हेंटीलेटर’, ‘दशक्रीया’ तसेच ‘सायकल’ या चित्रपटांनीही बाजी मारली आहे. 
दादासाहेब फाळके, सावेदादा, विष्णूपंत दामले, एस.फतेलाल, सी.रामचंद्र, बाबूराव पेंटर यासारख्या मराठी माणसांनी भारतीय सिनेमा रुजवला, वाढविला. मात्र मध्यंतरीच्या काळात मराठी सिनेमा रंजनाच्या गर्तेत हरवला होता. ‘श्वास’ चित्रपटाने मराठी सिनेमाच्या हरवलेल्या आत्मविश्वासाला नवसंजीवनी दिली. त्यानंतर मात्र मराठी सिनेमाने मागे वळून पाहिलेले नाही. आपण आता अभिमानाने म्हणू शकतो ‘माझ्या मराठीचा बोलू कौतुके – कासवही पैजा जिंके’. मराठी सिनेमा कथानक, अभिनय, दिग्दर्शन, गीत-संगीत या सर्वच बाबतीत हिंदी चित्रपटांच्या पुढे आहे.
‘शामची आई’ या प्रल्हाद केशव अत्रे दिग्दर्शित मराठी चित्रपटाला 1954 साली राष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सुवर्णकमळ मिळाले होते. त्यानंतर तब्बल 50 वर्षानंतर 2004 साली संदीप सावंत यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘श्वास’ चित्रपटाला सुवर्णकमळ मिळाले. त्यानंतरच्या एक तपाच्या कालखंडात जे दर्जेदार मराठी चित्रपट निघाले त्यांची यादी मोठी आहे. यात जोगवा, सिंधुताई सपकाळ, ता-यांचे बेट, बालगंधर्व, बाबू बँडबाजा, शाळा, जन गण मन, देऊळ, फँड्री, बालक – पालक, विहीर, डोंबीवली फास्ट, गाभ्रीचा पाऊस एक हजाराची नोट, रमा- माधव, लोकमान्य एक युगपुरुष, कोर्ट,  नागरिक ,किल्ला, ख्वाडा, एलिझाबेथ एकादशी, हाफ तिकीट , वेंटीलेटर, दशक्रीया, कासव, सायकल इत्यादी चित्रपटांचा समावेश होतो. या प्रत्येक चित्रपटाचे कथानक वेगळे आहे. आशयदृष्टया इतके दर्जेदार चित्रपट मागील बारा वर्षात हिंदी भाषेतही निघाले नाहीत. तमाशाप्रधान आणि  विनोदाच्या गर्तेत सापडलेल्या मराठी चित्रपटांनी आता कात टाकून उंबरठा ओलांडला आहे हेच यातून दिसून येते.
व्यावसायिकदृष्टया यशस्वी ठरलेल्या मराठी चित्रपटांची संख्याही अशात वाढते आहे. नटरंग, लय भारी, दुनियादारी, टाईमपास, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, कटयार काळजात घुसली, दगडी चाळ, टाईमपास 2, नटसम्राट इत्यादी सिनेमांचा यात समावेश करता येईल. नागराज मंजुळे यांनी दिग्दर्शित केलेल्या सैराट या मराठी सिनेमाने तर उत्पन्नाचा शंभर कोटीचा टप्पा पार करुन मोठा विक्रम नोंदविला आहे.
चौंसष्टाव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2017 या सोहळ्यात ज्या मराठी चित्रपटांना पुरस्कार मिळाले त्यांचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने  7 एप्रिल 2017 या जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने ‘नैराश्य ( डिप्रेशन)’ विषयावर पुढील वर्षभरात ‘चला बोलू नैराश्यावर’ ही मध्यवर्ती संकल्पना घेऊन काम करण्याचे आवाहन केले आहे. नेमक्या याच विषयावरील ‘कासव’ या मराठी चित्रपटाला राष्ट्रीय स्तरावरील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाल्याचा आनंद खूप मोठा आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर यांनी केले आहे. नैराश्यातून  बाहेर येणे कसे शक्य आहे ही कथा यात मांडण्यात आली आहे. मराठी चित्रपटाला केवळ पाच वेळा सुवर्णकमळ मिळाले. त्यात प्र.के.अत्रे दिग्दर्शित श्यामची आई (1954), संदीप सावंत दिग्दर्शित श्वास (2004), उमेश कुलकर्णी दिग्दर्शित देऊळ (2012), संदीप ताम्हाणे दिग्दर्शित कोर्ट ( 2015) आणि आता सुमित्रा भावे – संजय सुकथनकर दिग्दर्शित कासव ( 2017) या चित्रपटांना हा बहुमान लाभला आहे.
दशक्रीया हा चित्रपट बाबा भांड यांच्या कादंबरीवर आधारलेला आहे. एखादया कादंबरीवर आधारलेला चित्रपट करताना खूप अडचणी येतात. दशक्रीया चित्रपटाची पटकथा संजय कृष्णाजी पाटील यांना आठ वेळा लिहावी लागली, तेव्हा हवी तशी प्रभावी पटकथा तयार झाली. या पटकथा लेखनासाठी त्यांनी घेतलेल्या परिश्रमामुळेच त्यांना सर्वोत्कृष्ट पटकथा लेखनाचा पुरस्कार जाहीर झाला. ‘‘मी 1995 साली लिहिलेल्या दशक्रीया कादंबरीवरुन हा चित्रपट तयार करण्यात आला आहे. या चित्रपटात दाखविण्यात आलेला शेवट माझ्या कादंबरीतील शेवटापेक्षाही प्रभावी आहे’’ अशी आठवण बाबा भांड यांनी यासंदर्भाने सांगितली आहे. दशक्रीया विधीच्या वेळी कर्मकांडाचे स्तोम माजवून सर्वसामान्य माणसाला कसे लुबाडले जाते याची कथा या चित्रपटात आहे.
अभिनेत्री प्रियंका चोप्रा यांनी ‘व्हेंटीलेटर’ ची निर्मिती केली आहे. या चित्रपटाला तीन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले तेव्हा त्या म्हणाल्या ‘‘या चित्रपटाला तीन राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याचे समजले तेव्हा खूप आनंद झाला. हा चित्रपट चित्रित करणे खूप अवघड कार्य होते.दिग्दर्शक राजेश मापुस्कर आणि सहका-यांनी केलेल्या एकत्रित प्रयत्नामुळे हे शक्य झाले. मी या चित्रपटाची कथा प्रथम ऐकली तेव्हा मला माझ्या बाबांची आठवण आली. माझ्या बाबांना काही काळ व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले होते’’. या चित्रपटात प्रियंका चोप्रा यांनी ‘थांब ना रे तू बाबा, जाऊ नको दूर तू बाबा’ हे एक हृदयस्पर्शी गाणेही म्हटले आहे.
 प्रकाश कुंटे यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘सायकल’ या चित्रपटात सामाजिक स्थितीवर रंजक पध्दतीने भाष्य करण्यात आले आहे. या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट वेशभूषा सन्मान लाभलेले सचिन लोवलेकर यांनी सांगितले की ‘‘या चित्रपटासाठी वेशभूषा निश्चित करताना लहान मुलांच्या गोष्टीच्या पुस्तकातील रंगसंगती विचारात घेऊन काम केले’’.

मराठी सिनेमाला उंचीवर नेण्याचे काम आपल्या चित्रपट दिग्दर्शक, कलाकारांनी केले आहे. आता मराठी रसिकांनीही या दर्जेदार कलाकृतींना चित्रपटगृहात सिनेमा पाहून तितकीच मनस्वी दाद देणे गरजेचे आहे.

Tuesday, March 28, 2017

                              व्हा माध्यमकार

          


               सध्याचे युग हे माहितीयुग म्हणून ओळखले जाते. आल्विन टॉफलर या विचारवंताने म्हटल्याप्रमाणे कृषी , औदयोगिक या दोन युगानंतर आलेल्या 'माहिती युगात' ज्ञान हीच खरी संपत्ती बनली आहे. त्यामुळे माहितीचे ज्ञानात रूपातंर करणारी माध्यमे व त्यातील  पत्रकार हे माहिती युगातील अत्यंत महत्त्वाचे घटक बनले आहेत.
               मागील तीन दशकात माध्यमांच्या क्षेत्राचा अफाट विस्तार झाला व त्यानुसार या क्षेत्रात मोठे बदल झाले आहेत. भारतात झपाटयाने विकसित होत असलेल्या क्षेत्रात माध्यम आणि रंजन क्षेत्राचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. वार्षिक 13.9 टक्के विकासदराने या क्षेत्राची वाढ होत असल्याने माध्यम व रंजन उदयोग क्षेत्रातील उलाढाल 2019 सालापर्यंत 2000 अब्ज रुपयापर्यंत जाईल असे अपेक्षित आहे. यावरुन या क्षेत्रातील वाढीचा धडाका आपल्या लक्षात येऊ शकेल.परिणामी माध्यम शिक्षणाच्या क्षेत्रातही मोठे बदल घडले आहेत.

पूर्वी छापून हाती येणार्‍या वृत्तपत्रे व नियतकालिकांपुरतीच पत्रकारांची कामगिरी असायची. भारतात आजच्या घडीला 70 हजार वृत्तपत्रे आणि 800 टेलिव्हिजन चॅनल्स आहेत. याशिवाय रेडिओ, सिनेमा, वेबपोर्टल, ऑनलाईन वृत्तपत्रे,मोबाईल न्यूज, इव्ह्न्ट मॅनेजमेंट,सोशल मिडिया,  जाहिरात, जनसंपर्क इत्यादी क्षेत्रेही विस्तारत आहेतच. त्याचबरोबर माध्यम संशोधन क्षेत्र, बाहय प्रसिध्दी, माध्यमे,प्रकाशन क्षेत्र, माहितीपट व चित्रपट क्षेत्र, जनसंपर्क क्षेत्र, शैक्षणिक क्षेत्र, भारत सरकार व विविध राज्य सरकारांच्या माहिती व जनसंपर्क यंत्रणा, कॉर्पोरेट क्षेत्र, शासकीय कार्यालये यात पत्रकारितेचे शिक्षण घेतलेल्या विदयार्थ्यांना रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत.
पूर्वी केवळ हस्ताक्षर चांगले असले तरी पत्रकार होण्यासाठी पुरेसे असायचे. आता मात्र पत्रकारितेचा अभ्यासक्रम पूर्ण असणे, किमान दोन भाषांवर चांगले प्रभुत्व असणे, संगणक हाताळण्याचे चांगले ज्ञान असणे या तीन बाबी पत्रकारितेच्या क्षेत्रातील नोकरीसाठी अत्यावश्यक आहेत. पत्रकारितेच्या क्षेत्रात नोकरीच्या संधी मोठया प्रमाणात उपलब्ध होत आहेत. त्यामुळे पत्रकारितेचे शिक्षण देणारी महाविदयालयेही वाढत आहेत. एकटया मुंबई शहरात पत्रकारितेचे शिक्षण देणारी 80 पेक्षा अधिक महाविदयालये आहेत. इतर शहरातील महाविदयालयांची संख्याही वाढली आहे. माध्यम क्षेत्रात नोकरीच्या संधी वाढल्याने अभ्याससक्रमांची संख्यादेखील वाढते आहे.  
वृत्तपत्रांच्या खपाच्या बाबतीत भारत जगातील दुस-या क्रमांकाचा देश आहे. भारतात दररोज वृत्तपत्राचे 12 कोटीपेक्षा अधिक अंक दररोज विक्री होतात , अशी आकडेवारी आहे. आपल्या महाराष्ट्रातही नव-नवी वृत्तपत्रे येत आहेत, पूर्वीपासून सुरु असलेल्या वृत्तपत्राच्या आवृत्ती वाढत आहेत.त्यामुळे वृत्तपत्र क्षेत्रात मोठया प्रमाणात करिअर संधी आहेत. या क्षेत्रात बातमीदार, उपसंपादक, विशेष प्रतिनिधी, ब्युरो चिफ यासारखी पदे उपलब्ध असतात.स्वतःचे वृत्तपत्र सुरु करणे हे देखील शक्य आहे. प्रत्येक वृत्तपत्राच्या ऑनलाईन आवृत्ती निघू लागल्या आहेत, त्यातही कंटेट एडिटर  होता येते. वृत्तपत्रात इवन्ट मॅनेजमेंट हा स्वतंत्र विभाग सुरु झालेले आहेत , त्यातही इवन्ट मॅनेजर व इतर पदावर काम करण्याची संधी मिळू शकते. छायाचित्र पत्रकार हे पदही उपलब्ध असते. मॅगजिन जर्नालिजमचे क्षेत्रही नव्याने भरारी घेत आहे. या क्षेत्रातही उपसंपादक व इतर पदावर काम करता येते. प्रकाशन व्यवसाय क्षेत्रातही उपसंपादक, संपादक, लेखक, चरित्र लेखक म्हणून कार्य करता येते.
रेडिओच्या क्षेत्रात एफ.एम.च्या विस्ताराचा तिसरा टप्पा सुरु आहे.त्यामुळे एक लाखापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या प्रत्येक शहरात एफ.एम.रेडिओचे केंद्र असणार आहे. त्यामुळे या क्षेत्रातील नोकरीच्या संधी मोठया प्रमाणात वाढल्या आहेत. रेडिओ जॉकी, निवेदक , वृत्त निवेदक, वृत्त संपादक, डयुटी आफिसर,कार्यक्रम अधिकारी, केद्र संचालक यासारख्या पदांवर काम करण्याची संधी प्राप्त होऊ शकते.
टेलिविजन क्षेत्रातही नोकरीच्या भरपूर संधी आहेत. यात स्ट्रींजर,अँकर, कंटेंट एडिटर, जिल्हा प्रतिनिधी यासह विविध पदावर नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. चित्रपट क्षेत्रात चित्रपट समीक्षक , पटकथा लेखक, चित्रपट प्रसिध्दी अधिकारी, चित्रपट दिग्दर्शक , लघुपट व माहितीपट तयार करणे यासारखी कामे करण्याची संधी मिळू शकते.
जनसंपर्क क्षेत्रात शासकीय, सहकार,शिक्षण, बँकिंग, कार्पोरेट क्षेत्र यासह सर्वच क्षेत्रात जनसंपर्क अधिकारी,  जिल्हा माहिती अधिकारी, माहिती आधिकारी,जनसंपर्क सल्लागार यासारख्या पदांवर कार्य करण्याची संधी उपलब्ध होऊ शकते. केंद्र शासनाच्या प्रसार यंत्रणेत प्रवेश करण्यासाठी इंडियन इन्फॉर्मेशन सर्विसेस ( आय.आय. एस. ) ही स्पर्धा परीक्षा आहे. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यास प्रेस इफॉर्मेशन ब्युरो, रेजिस्ट्रार ऑफ न्यूजपेपर्स, क्षेत्रीय प्रचार कार्यालय यासह विविध कार्यालयात महत्वाच्या पदांवर कार्य करता येते.
जाहिरात क्षेत्रात जाहिरात लेखक,जाहिरात प्रतिनिधी, जाहिरात व्यवस्थापक, जाहिरात सल्लागार, माध्यम खरेदी व्यवस्थापक,इत्यादी पदांवर कार्य करण्याची संधी लाभू शकते. स्वतःची जाहिरात संस्था सुरु करणेही सहज शक्य आहे. रेडिओसाठी ,टेलिविजनसाठी, इंटरनेटसाठी, होर्डिंग सारख्या बाय्ह प्रसिध्दी माध्यमासाठीही जाहिराती तयार करण्याची संधी मिळू शकते.
इंटरनेटच्या गतीत व तंत्रज्ञानात झालेल्या क्रांतीकारक प्रगतीमुळे वेब मीडियाचे महत्व वाढत आहे. त्यात स्मार्टफोन युजर्सची संख्या झपाटयाने वाढत असल्याने वेब मीडियामध्ये करिअरच्या अनेक संधी उपलब्ध होत आहेत. आज जवळपास सर्वच राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील दैनिके वेब पोर्टल आणि अॅपव्दारे वाचकांपर्यंत पोहोचविण्यात येत आहेत. त्यामुळे कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यत ही माध्यमे पोहोचत आहेत. त्यातूनच वेब पोर्टल आणि न्यूज अॅपमध्ये करिअरच्या अनेक संधी उपलब्ध होत आहेत. न्यूज अॅप, न्यूज साईट, युट्यूब चॅनेल, सोशल मीडिया, डिजीटल मार्केटींग, ऑनलाईन डव्हरटायजिं, गुगल अडव्हरटाईजिं, युट्यूब अॅडव्हरटायजिं, बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये कंटेट एडिटर म्ह्णून अनेक रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत. सोशल मिडिया मार्केटिंगसाठी कंटेंट एडिटर हवे असतात. त्यामध्ये फेसबूक पेज, ट्विटर अकाऊँट, सोशल इमेज बिल्डींग करण्यासाठी माध्यम क्षेत्रातील पदवीधरांना प्राधान्याने संधी दिली जाते. अॅप क्षेत्रात सध्या, डेली हंट, न्यूज हंट, वे टू ऑनलाईन यांसारखे बहुभाषिक अॅप आहेत. यामध्ये कंटेंट इडिटर म्ह्णून संधी उपलब्ध आहेत. तर शॉर्टन्यूज अॅप क्षेत्रात रिलायन्ससारखा ग्रुपही उतरत असल्याने नोकरीच्या सधी वाढणार आहेत.   
माध्यमाचे शिक्षण व संशोधन क्षेत्रातही नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. बॅचलर ऑफ जर्नालिझम, बॅचलर ऑफ मिडिया मॅनेजमेंट, एम.ए.मास कम्युनिकेशन यासारखे अभ्यासक्रम प्रत्येक शहरात उपलब्ध आहेत. माध्यमाच्या क्षेत्रात चांगले करिअर करु इच्छिणा-यांनी एम.ए.  मास कम्युनिकेशन हा अभ्यासक्रम पूर्ण करणे हितावह ठरते.       
आजच्या काळात वृत्तपत्राचा वाचक, रेडिओचा श्रोता, टीव्हीचा दर्शक बदललेला आहे. त्यामुळे त्यांच्या अपेक्षांची व गरजांची पूर्तता करणारी पत्रकारिता करणे अवघड बनले आहे. आता बातमी देताना अत्यंत कमी वेळात, सखोल , अचूक , इतरांपेक्षा वेगळी बातमी दयावी लागते. त्यासाठी त्या क्षमतेचे पत्रकार निर्माण होणे गरजेचे असते.नेमके प्रश्न विचारता येने, शोधक दृष्टी असणे, तर्क लढविता येणे व विश्लेषण करता येणे आवश्यक असते. आता विशेषीकरणाचे युग आहे, त्यामुळे पर्यावरण, शेती, उदयोग,उर्जा, शिक्षण, राजकारण, सहकार, गुन्हेगारी वृत्त, न्यायालयीन वृत्त, आंतरराष्ट्रीय राजकारण, वित्त, संरक्षण अशा कोणत्यातरी एका विषयाच सखोल अभ्यास असणार्‍या पत्रकाराला सर्वत्र मागणी असते. पी. साईनाथ केवळ भारतातच नव्हे तर जगभरात महत्व दिले जाते कारण ग्रामीण भारताशी संबंधित समस्यांचा पूर्ण अभ्यास त्यांनी केला आहे. देशाच्या कृषी धोरणात बदल घडविण्याचे सामर्थ्य त्यांच्या लेखणीत आहे, हे आपण पाहिले आहे. पत्रकारितेत करीअर करु इच्छिणार्‍या प्रत्येकाने कुठल्या तरी एका विषयाबाबत सखोल ज्ञान मिळविणे किती उपयुक्त ठरु शकते
पत्रकारितेचे क्षेत्र हे आव्हानात्मक आणि तेजोवलय लाभलेले आहे. उच्चपदस्थ राजकारणी,  समाजकारणी,  अधिकारी, चित्रपट कलावंत, साहित्यिक, शास्त्रज्ञ इत्यादींच्या सतत संपर्कात राहण्याची संधी पत्रकारांना मिळते. त्यामुळे नवे काही करू इच्छिणार्‍यांसाठी पत्रकारिता हे खुणावणारे क्षेत्र आहे. 
-    डॉ.रवींद्र चिंचोलकर
-    विभाग प्रमुख , पत्रकारिता विभाग, सोलापूर विदयापीठ
                                        ( मोबाईल क्रमांक 9860091855 )
( प्रसिध्दी - लोकराज्य फेब्रुवारी 2017 च्या अंकात प्रसिध्द झालेला लेख )

Friday, February 6, 2015

आर.के.लक्ष्मणः सामान्यांना बोलते करणारा असामान्य माणूस



 आर.के.लक्ष्मण यांच्याविषयी विचार करताना स्वानंद किरकिरेंच्या गाण्यातील हेच शब्द पुन्हा पुन्हा आठवत राहतात. आर. के. लक्ष्मण हा खरेच अ॑फाट माणूस होता, त्यांनी भारतात नवा इतिहास रचला. नाजूक कुंचल्याच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाला नायक बनविण्याची किमया त्यांनी करुन दाखविली. एखादया कसलेल्या गुप्तहेराप्रमाणे हा सामान्य माणूस हवा तिथे डोकावत असे. पंडित जवाहरलाल नेहरु, इंदिरा गांधी, मोरारजी देसाई, व्ही.पी.सिंह, अटलबिहारी बाजपेयी, लालकृष्ण अडवाणी ,बाळासाहेब ठाकरे, शरद पवार यांच्यासह अनेक राजकारण्यांच्या घरात, विविध मंत्रालयात, प्रसंगी परदेशातही हा सामान्य माणूस मुशाफिरी करीत असे. समाजातील, राजकारणातील व्यंगावर नेमके भाष्य करीत असे.
भारतात व्यंगचित्रे आणि व्यंगचित्रकाराला प्रतिष्ठा मिळवून देण्याचे ऐतिहासिक कार्य आर.के.लक्ष्मण यांनी केले. यापेक्षाही थक्क कारायला लावणारी बाब म्ह्णजे, सर्वश्रेष्ठ वृत्तपत्रापेक्षा व्यंगचित्र प्रभावी असू शकते, हे त्यांनी सिध्द करुन दाखविले. तब्बल पाच दशके टाईम्स ऑफ इंडियात त्यांची व्यंगचित्रे प्रसिध्द होत असत. तेव्हा लोक बातम्या वाचण्याआधी, आज आर.कें.नी कोणते व्यंगचित्र रेखाटले आहे ते पाहण्यासाठी धडपडत असत. टाईम्स ऑफ इंडियाने आपल्या वृत्तपत्राचा खप वाढविण्यासाठी आर.कें.च्या व्यंगचित्रांचे प्रदर्शन नवी दिल्ली येथे भरविले होते , यापेक्षा एखादया व्यंगचित्रकाराचा मोठा सन्मान असू शकत नाही.
आर.के.लक्ष्मण यांचे पूर्ण नाव होते रासीपुरम कृष्णस्वामी लक्ष्मण . 23 आक्टोबर 1921 रोजी म्हैसूर येथे त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील शाळेचे संचालक होते. मोठे बंधू आर.के. नारायण मोठे लेखक होते.आर.के.लक्ष्मण शाळेत शिकत असताना त्यांच्या घरी अनेक वृत्तपत्रे येत असत. त्यात छापून येणा-या व्यंगचित्रांपैकी, इंग्लंडमधील प्रख्यात व्यंगचित्रकार डेव्हीड लो यांच्या व्यंगचित्रांनी त्यांना विशेष प्रभावित केले. याच कालखंडात त्यांनी व्यंगचित्रे रेखाटायला सुरुवात केली.
आर.के.लक्ष्मण यांना मुंबईच्या जे.जे.स्कूल ऑफ आर्टसमध्ये महाविदयालयीन शिक्षण घेण्याची इच्छा होती. पण, त्यांची चित्रे तिथल्या प्राचार्यांना प्रभावशाली वाटली नाहीत, त्यामुळे त्यांनी प्रवेश नाकारला. त्यामुळे आर.कें.ना महाविदयालयीन शिक्षण म्हैसूर येथून पूर्ण करावे लागले. त्याविषयी आपल्या शैलीत भाष्य करताना आर.के.लक्ष्मण यांनी लिहिले आहे की, ‘’ बरे झाले मला जे.जे.स्कूल ऑफ आर्टमध्ये प्रवेश मिळाला नही. मी तिथे शिकलो असतो तर व्यंगचित्रकार झालोच नसतो. फार फार तर एखादया जाहिरात संस्थेत डासांची अगरबत्ती अथवा महिलांच्या सौंदर्य प्रसाधनांसाठी रेखाटने करीत बसलो असतो.’’
व्यंगचित्रे काढण्याचे अथवा चित्रकलेचे कुठलेही औपचारिक शिक्षण आर.के.लक्ष्मण यांनी घेतलेले नव्हते. व्यंगचित्र कला ही त्यांना उपजतच लाभलेली देणगी होती.काही वर्षे म्हैसूर येथील वृत्तपत्रात व्यंगचित्रे रेखाटण्याचे काम केल्यावर, ते मुंबईला फ्री प्रेस जर्नलमध्ये राजकीय व्यंगचित्रकार म्ह्णून रुजू झाले. तिथे बाळासाहेब ठाकरे त्यांचे सहकारी होते.पुढे टाईम्स ऑफ इंडियामध्ये त्यांचे आगमन झाले, 1957 साली ‘ यू सेड इट’ या दररोजच्या व्यंगचित्र मालिकेव्दारे ‘ कॉमन मॅन ‘ अवतरला. त्यानंतरची पाच दशके आर.के. लक्ष्मण यांच्या ‘कॉमन मॅन’ ने गाजविली. या कालखंडात आर.के.लक्ष्मण यांना  इंग्लंडच्या वृत्तपत्राकडूनही नोकरीची चांगली संधी देऊ करण्यात आली होती. त्यासाठी मोठा पगार, इंग्लंडमध्ये स्थाईक होण्याची सुविधा अशी आमिषेही दाखविण्यात आली. पण इंग्लडमध्ये जाण्यापेक्षा भारतातील बहुढंगी वास्तव मांडणे त्यांना अधिक मह्त्वाचे वाटले.
व्यंगचित्रातून एकाच वाक्यात ते अचूक आणि सडेतोड भाष्य करीत असत. व्यंगचित्राविषयी बोलताना ते म्ह्णत ‘ पूर्वी पंडित नेहरु, इंदिरा गांधी , मोरारजी देसाई यासह जे राजकारणी होते त्यांचे काहीन काही वेगळेपण होते.त्यामुळे त्यांची व्यंगचित्रे काढण्यात मजा होती. पण अलिकडच्या काळात लालूप्रसाद यादव आणि जयललिता हे दोन अपवाद वगळता सर्वांचे चेहरे सारखेच वाटतात.’
आणीबाणीच्या कालखंडात होणा-या अतिरेकाबाबत इंदिरा गांधीवर त्यांनी व्यंगचित्र रेखाटले, ते  त्यावेळी खूप गाजले होते. त्या काळात त्यांच्यावर मोठा दबाव टाकण्यात आला. अशा वेळी तडजोड स्वीकारुन काम करण्यास त्यांनी नकार दिला. ‘मी व्यंगचित्रकार आहे. मला अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य असलेच पाहिजे’ ही त्यांची भूमिका होती. त्या कालखंडात काही काळ ते मॉरीशस येथे वास्तव्यास गेले होते, निवडणुकीनंतरच ते परतले.
आर.के.लक्ष्मण यांना 94 वर्षाचे आयुष्य लाभले. या कालखंडात त्यांना अनेकदा आर्थिक ओढातान सहन करावी लागली. पण पैशाचा , प्रसिध्दीचा हव्यास त्यांनी कधीच धरला नाही. त्यांना रेमन मॅगेसेसे पुरस्कार, पद्मभूषण, पद्मविभूषण यासह अनेक मोठे पुरस्कार लाभले. एक प्रतिभासंपन्न जीवन ते जगले. आर.के.लक्ष्मण यांनी अजरामर केलेल्या ‘कॉमन मॅन ‘चा पुतळा पुणे आणि मुंबई येथे उभारण्यात आला आहे. हे पुतळे उभे आहेत , पण त्यांना नायकत्व मिळवून देणारा निर्माताच हरवला आहे. त्याला साद घालून म्ह्णावेसे वाटते ...........
 ‘’ हे लक्ष्मणा,       
  तुझ्या कुंचल्याच्या लक्ष्मणरेषांनी                                               सामान्यांच्या संवेदनांना बोलते केलेस                                         त्यांच्या व्यथा - वेदनांना शब्द दिलेस                                         बघ, ही माणसे पुन्हा मूक झालीत                                               पुन्हा एखादा लक्ष्मण जन्मावा                                                  या वाटेकडे आस लावून बसलीत. ’’

( साप्ताहिक प्रजापत्र मध्ये प्रकाशित )

****************************************************************************

ट्रम्प टॅरीफची दादागिरी

 जगाच्या इतिहासात 2 एप्रिल 2025 हा दिवस महत्त्वाचा ठरणार आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या शुल्क (टॅरिफ) बॉम्बने जगाला आर्थिक यु...