Friday, March 4, 2011

जनसंपर्काचे सुवर्णयुग

                                    जनसंपर्काचे शास्त्र युरोप व अमेरिकेतून भारतात आले आहे. आय व्ही ली यांना जनसंपर्काचे जनक मानले जाते.विसाव्या शतकाच्या आरंभी त्यांनी जनसंपर्काचा पाया रचण्याचे महत्वपूर्व कार्य केले.भारताच्या इतिहासाचा विचार केला तर, सम्राट अशोक, छत्रपती शिवाजी महाराज आणि बादशहा अकबर यांनी लोककल्याणकारी राज्यासाठी केलेले काही प्रयत्न जनसंपर्काच्या कार्याशी जुळणारे होते असे म्हणता येईल. मात्र त्या काळात जनसंपर्काची संकल्पना व शास्त्र विकसित झाले नसल्याने, या स्‍ांदर्भाने विशेष अभ्यास झालेला दिसत नाही.महात्मा गांधींनी स्वातंत्र्य लढयाच्या काळात जनतेला संघटित करण्यासाठी जनसंपर्क तंत्रांचा प्रभावी अवलंब केला. दुसर्‍या महायुध्दाच्या काळात भारतीय जनतेला आपल्या बाजूने लढण्यास प्रवृत्त करण्यासाठी इंग्रजांनीही काही जनसंपर्क तंत्रांचा वापर केला.
                                  भारतात स्वातंत्र्यानंतरच्या कालखंडातच प्रामुख्याने जनसपर्काच्या प्रसारास सुरुवात झाली.1958 साली पब्लिक रिलेशन्स सोसायटी ऑफ इंडियाची स्थापना झाली आणि जनसंपर्काच्या शास्त्रशुध्द अभ्यासाला चालना मिळाली जनसंपर्काचे क्षेत्र आता खूप विस्तारले आहे..सेवा, शिक्षण,सहकार, संरक्षण, बँकिंग, वैद्यकक्षेत्र, संरक्षणक्षेत्र,सेवाभावी संस्था, उद्योग, राजकारण, कार्पोरेट क्षेत्र यासह सर्वच क्षेत्रांना आजच्या काळात जनसंपर्काची गरज भासू लागली आहे. विविध विद्यापीठांमध्ये व महाविद्यालयात जनसंज्ञापन अभ्यासक्रमात किंवा स्वतंत्रपणे जनसंपर्क अभ्यासक्रम शिकविण्याची सुविधा आता उपलब्ध झाली आहे.
           1995 ते 2008 या जवळपास तेरा वर्षाच्या कालखंडात मी जळगाव येथील उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात जनसंपर्क अधिकारी होतो, त्यामुळे जनसंपर्क कार्याचा चांगला अनुभव घेण्याची संधी मला लाभली. पत्रकारितेत दहा वर्षे काम केले असल्याने जनसंपर्काचे काम अगदी सहज जमेल असे मला वाटत होते. मात्र माझ्‍या अनुभवाच्या आधारे मला सांगावे वाटते की, जनसंपर्काचे कार्य वरकरणी सोपे वाटत असले तरी ती प्रत्यक्षात अवघड जबाबदारी आहे.सर्कसमध्ये काम करणार्‍या व्यक्तीला ज्याप्रमाणे पदोपदी क्सरत करावी लागते, तशीच कसरत जनसंपर्क अधिकार्‍याला करावी लागते. पत्रकारांसाठी आवश्यक असणारे भाषाज्ञान, लेखनकौशल्य,चौकसवृत्ती, प्रामाणिकपणा, धैर्य, चिकाटी इत्यादी गुण त्याच्याकडे असायलाच हवेत. या व्यतिरिक्तही जनसंपर्क अधिकारी म्हणून त्याच्या अंगी काही गुण असायला हवेत ते खालीलप्रमाणे-

1) श्रवणभक्ती - इतरांचे म्हणणे शांत चित्ताने ऐकून घेणे खूप महत्वाचे आहे. ऐकून घेणे या साध्या उपायामुळे अनेकदा पेचप्रसंग टळतात.  
2) विनम्रता व संयम नेहमी विनम्रपणे बोलण्याची वृत्ती जनसंपर्क अधिकार्‍याने जोपासायला हवी. संयम हाच जनसंपर्क अधिकार्‍याचा सर्वात महत्वाचा अलंकार असतो.
3) सह्कार्याची वृत्ती आपल्या संपर्कात येणार्‍या प्रत्येक व्यक्तीला सह्कार्य करण्याचीच  जनसंपर्क अधिकार्‍याची वृत्ती हवी.
4) प्रतिमा निर्मिती आपल्या संस्थेशी निगडित सर्व घटकांमध्ये संस्थेची चांगली प्रतिमा रुजविण्याचे व ती प्रतिमा टिकविण्याचे कार्य त्याला करता यायला हवे.
5) संस्थेविषयीचे ज्ञान - जनसंपर्क अधिकार्‍याला आपल्या संस्थेविषयी संपूर्ण ज्ञान असणे आवश्यक आहे. आपल्या संस्थेचे कार्य, विविध विभाग, संस्थेतील महत्वाच्या व्यक्ती, त्यांचे संपर्क क्रमांक इत्यादी माहिती त्याला असायलाच हवी.
6) माध्यम संपर्क  प्रसारमाध्यमे जनतेपर्यंत आपल्या संस्थेची माहिती व संदेश पोहोचविण्यावे कार्य करतात.त्यामुळे प्रसारमाध्यमांना आवश्यक असलेल्या स्वरुपात आपल्या संस्थेचे वृत्त देण्याचे कार्य जनसंपर्क अधिकार्‍याने तत्परतेने करायला हवे. बातमी कधी व कशी द्यावी, पत्रकार परिषद केव्हा आयोजित करावी इत्यादी बाबतीत तो तरबेज असायला हवा.
7) तांत्रिक ज्ञान संपर्क साधनांच्या क्षेत्रात नव्या तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे सातत्याने बदल घडत आहेत. हे बदल आत्मसात करुन जनसंपर्क अधिकार्‍याने वेबसाईट, ई- मेल यासारख्या नव्या तंत्रांचा अवलंब करुन संस्थेची माहिती सर्वांपर्यंत पोहोचवावी. मुद्रण, छायाचित्रण,माहितीपट निर्मिती याविषयीही अद्यावत माहिती त्याला असायला हवी.
8) संवाद कौशल्य व सौहार्द - जनसंपर्क अधिकारी आपला स्नेही, हितचिंतक आहे हीच भावना संस्थेशी संबंधित घटकांच्या मनात निर्माण व्हावी, अशा प्रकारे संवाद साधण्याचे कौशल्य जनसंपर्क अधिकार्‍याकडे असायला हवे. त्याचे सर्वांशी सौहार्दाचे संबंध असावेत.
9) भूमिकेशी तादात्म्यता कामाची वेळ संपली तरी जनसंपर्क अधिकार्‍याला आपली भूमिका सोडता येत नाही. वेळी-अवेळी संपर्क साधणार्‍यांनाही आवश्यक ती माहिती देणे वा मदत करणे हे त्याचे कर्तव्य ठरते.        
10) आत्मविश्वास व निर्णयक्षमता -  जनसंपर्क अधिकार्‍याला आत्मविश्वास असायला हवा.संस्थेचे हित ही भावना नजरेसमोर ठेऊन त्याला त्वरेने आवश्यक ते निर्णय घेता यायला हवेत. मात्र हे सारे करताना माणुसकीचा विसर त्याने पडू देता कामा नये.
          स्वातंत्र्यानंतरच्या काळातही भारतात केवळ उद्योग क्षेत्रासाठीच जनसंपर्काची आवश्यकता आहे असे मानले जात होते.1990 नंतर भारतात नव्या आर्थिक धोरणामुळे व जागतिकीकरणामुळे मोठे बदल घडले, त्यामुळे सर्वच क्षेत्रात स्पर्धात्मक वातावरण निर्माण झाले. PRSI चे प्रयत्न तसेच विविध महाविद्यालये व विद्यापीठात जनसंपर्काचे शास्त्रशुद्ध शिक्षण दिले जाऊ लागले, त्यामुळे जनसंपर्काचे शास्त्र सर्वच क्षेत्रासाठी उपयुक्त आहे याची जाणीव रुजली.
          सध्या कार्पोरेट क्षेत्रात तसेच सार्वजनिक उध्योग क्षेत्रात जनसंपर्क तंत्रांचा सर्वाधिक अवलंब केला जातो.प्रत्येक कार्पोरेट उद्योगाच्या कार्यालयात मोठा व स्वतंत्र जनसंपर्क विभाग असतो. या विभागाच्या कार्यासाठी मनुष्यबळ व आर्थिक तरतूद मुबलक प्रमाणात उपलब्ध असते.या विभागाची जबाबदारीही तेवढीच महत्वाची असते. माध्यमसंपर्क म्हणजेच जनसंपर्क असे बर्‍याच क्षेत्रात मानले जाते. कार्पोरेट जनसंपर्कात मात्र माध्यमसंपर्काबरोबरच भागधारक, वितरक व विक्रेते, ग्राहक, शासन, समुदाय या सर्व घटकांसमवेत प्रभावी जनसंपर्क तंत्रांचा अवलंब करुन सतत संवाद करावा लागतो. कार्पोरेट क्षेत्रातील प्रतिस्पर्धी कंपन्यांच्या तुलनेत जनसंपर्काची सरस कामगिरी करणे हे या क्षेत्रातील जनसंपर्क अधिकार्‍यासमोरील आव्हान असते.या क्षेत्रात नोकरीच्या संधी खूप आहेत, मात्र इंग्रजी भाषेतून प्रभावीपणे संभाषण व लेखण करता येणे तसेच संगणकाचे चांगले  ज्ञान ही यासाठीची पूर्वअट असते.
          शासकीय जनसंपर्काचे क्षेत्रही मोठे आहे.केन्द्र सरकारची मोठी जनसंपर्क यंत्रणा आहे.माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या अधिपत्याखाली ही यंत्रणा कार्य करते.पत्र सूचना कार्यालय (PIB), वृत्तपत्र प्रबंधक कार्यालय(RNI), जाहिरात आणि दृकप्रसिद्धी संचालनालय(DAVP), छायाचित्र विभाग(Photo Division),प्रकाशन विभाग (Publication Division), चित्रपट विभाग(Films Division), संशोधन व संदर्भ विभाग(RR Section), वृत्तपत्र परिषद(PCI),क्षेत्रीय प्रचार कार्यालय, गीत व नाटय विभाग, प्रसारभारतीच्या अधिपत्याखालील आकाशवाणी, दूरदर्शन इत्यादी कार्यालयांचा यात समावेश होतो. प्रत्येक राज्याचीही स्वतंत्र जनसंपर्कयंत्रणा असते.महाराष्ट्रात माहिती व जनसंपर्क महासंचालनालय हे कार्य करते.यात वृत्त विभाग, प्रकाशन विभाग, प्रदर्शन विभाग इत्यादी विभाग आहेत.सह विभागीय कार्यालये, प्रत्येक जिल्हात जिल्हा माहिती कार्यालये, गोवा व दिल्ली येथे महराष्ट्र परिचय केन्द्र अशी यंत्रणा आहे.या व्यतिरिक्त विविध शासकीय विभागात आता जनसंपर्क अधिकारी नियुक्त केले जात आहेत.या सर्व बाबी विचारात घेता, शासकीय
जनसंपर्क क्षेत्रातही नोकरीच्या संधी मोठया प्रमाणात उपलब्ध आहेत हे स्पष्ट होते.
                           राजकीय क्षेत्रातही आता जनसंपर्काचे महत्व वाढले आहे.राजकीय पक्ष प्रसारमाध्यमांद्वारे प्रचार करण्याची संपूर्ण जबाबदारी जनसंपर्क संस्थांवर सोपवत आहेत.राजकीय व्यक्तीही प्रतिमा निर्मितीसाठी जनसंपर्क आधिकार्‍यावर विसंबताना दिसत आहेत. सेवाभावी संस्थादेखील आपले कार्य सर्वांना ठाऊक व्हावे यासाठी जनसंपर्क तंत्रांचा अवलंब करीत आहेत. शिक्षण, बँकिंग, वैद्यक, संरक्षण, सहकार इत्यादी क्षेत्रातही जनसंपर्काचे महत्व वाढ्ले आहे. एकंद्रा, भारतात जनसंपर्काचे सुवर्णयुग अवतरले असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.


-   
                                      

No comments:

Post a Comment

कोण होतास तू काय झालास तू ?

खींचो न कमान को न तलवार निकालो जब तोप मुक़ाबिल हो तो अख़बार निकालो भारतावर इंग्रजांची राजवट होती त्या काळात अकबर इलाहाबादी यांनी लिहिलेला हा...