Tuesday, April 11, 2017

माझ्या मराठीचा बोलू कौतुके – कासवही पैजा जिंके

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात तब्बल आठ पुरस्कारांवर मोहोर उमटविणा-या मराठी चित्रपटांचा डंका देशभर वाजतो आहे. ‘कासव’ सुवर्णकमळाच्या शर्यतीत जिंकले आहे. ‘व्हेंटीलेटर’, ‘दशक्रीया’ तसेच ‘सायकल’ या चित्रपटांनीही बाजी मारली आहे. 
दादासाहेब फाळके, सावेदादा, विष्णूपंत दामले, एस.फतेलाल, सी.रामचंद्र, बाबूराव पेंटर यासारख्या मराठी माणसांनी भारतीय सिनेमा रुजवला, वाढविला. मात्र मध्यंतरीच्या काळात मराठी सिनेमा रंजनाच्या गर्तेत हरवला होता. ‘श्वास’ चित्रपटाने मराठी सिनेमाच्या हरवलेल्या आत्मविश्वासाला नवसंजीवनी दिली. त्यानंतर मात्र मराठी सिनेमाने मागे वळून पाहिलेले नाही. आपण आता अभिमानाने म्हणू शकतो ‘माझ्या मराठीचा बोलू कौतुके – कासवही पैजा जिंके’. मराठी सिनेमा कथानक, अभिनय, दिग्दर्शन, गीत-संगीत या सर्वच बाबतीत हिंदी चित्रपटांच्या पुढे आहे.
‘शामची आई’ या प्रल्हाद केशव अत्रे दिग्दर्शित मराठी चित्रपटाला 1954 साली राष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सुवर्णकमळ मिळाले होते. त्यानंतर तब्बल 50 वर्षानंतर 2004 साली संदीप सावंत यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘श्वास’ चित्रपटाला सुवर्णकमळ मिळाले. त्यानंतरच्या एक तपाच्या कालखंडात जे दर्जेदार मराठी चित्रपट निघाले त्यांची यादी मोठी आहे. यात जोगवा, सिंधुताई सपकाळ, ता-यांचे बेट, बालगंधर्व, बाबू बँडबाजा, शाळा, जन गण मन, देऊळ, फँड्री, बालक – पालक, विहीर, डोंबीवली फास्ट, गाभ्रीचा पाऊस एक हजाराची नोट, रमा- माधव, लोकमान्य एक युगपुरुष, कोर्ट,  नागरिक ,किल्ला, ख्वाडा, एलिझाबेथ एकादशी, हाफ तिकीट , वेंटीलेटर, दशक्रीया, कासव, सायकल इत्यादी चित्रपटांचा समावेश होतो. या प्रत्येक चित्रपटाचे कथानक वेगळे आहे. आशयदृष्टया इतके दर्जेदार चित्रपट मागील बारा वर्षात हिंदी भाषेतही निघाले नाहीत. तमाशाप्रधान आणि  विनोदाच्या गर्तेत सापडलेल्या मराठी चित्रपटांनी आता कात टाकून उंबरठा ओलांडला आहे हेच यातून दिसून येते.
व्यावसायिकदृष्टया यशस्वी ठरलेल्या मराठी चित्रपटांची संख्याही अशात वाढते आहे. नटरंग, लय भारी, दुनियादारी, टाईमपास, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, कटयार काळजात घुसली, दगडी चाळ, टाईमपास 2, नटसम्राट इत्यादी सिनेमांचा यात समावेश करता येईल. नागराज मंजुळे यांनी दिग्दर्शित केलेल्या सैराट या मराठी सिनेमाने तर उत्पन्नाचा शंभर कोटीचा टप्पा पार करुन मोठा विक्रम नोंदविला आहे.
चौंसष्टाव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2017 या सोहळ्यात ज्या मराठी चित्रपटांना पुरस्कार मिळाले त्यांचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने  7 एप्रिल 2017 या जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने ‘नैराश्य ( डिप्रेशन)’ विषयावर पुढील वर्षभरात ‘चला बोलू नैराश्यावर’ ही मध्यवर्ती संकल्पना घेऊन काम करण्याचे आवाहन केले आहे. नेमक्या याच विषयावरील ‘कासव’ या मराठी चित्रपटाला राष्ट्रीय स्तरावरील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाल्याचा आनंद खूप मोठा आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर यांनी केले आहे. नैराश्यातून  बाहेर येणे कसे शक्य आहे ही कथा यात मांडण्यात आली आहे. मराठी चित्रपटाला केवळ पाच वेळा सुवर्णकमळ मिळाले. त्यात प्र.के.अत्रे दिग्दर्शित श्यामची आई (1954), संदीप सावंत दिग्दर्शित श्वास (2004), उमेश कुलकर्णी दिग्दर्शित देऊळ (2012), संदीप ताम्हाणे दिग्दर्शित कोर्ट ( 2015) आणि आता सुमित्रा भावे – संजय सुकथनकर दिग्दर्शित कासव ( 2017) या चित्रपटांना हा बहुमान लाभला आहे.
दशक्रीया हा चित्रपट बाबा भांड यांच्या कादंबरीवर आधारलेला आहे. एखादया कादंबरीवर आधारलेला चित्रपट करताना खूप अडचणी येतात. दशक्रीया चित्रपटाची पटकथा संजय कृष्णाजी पाटील यांना आठ वेळा लिहावी लागली, तेव्हा हवी तशी प्रभावी पटकथा तयार झाली. या पटकथा लेखनासाठी त्यांनी घेतलेल्या परिश्रमामुळेच त्यांना सर्वोत्कृष्ट पटकथा लेखनाचा पुरस्कार जाहीर झाला. ‘‘मी 1995 साली लिहिलेल्या दशक्रीया कादंबरीवरुन हा चित्रपट तयार करण्यात आला आहे. या चित्रपटात दाखविण्यात आलेला शेवट माझ्या कादंबरीतील शेवटापेक्षाही प्रभावी आहे’’ अशी आठवण बाबा भांड यांनी यासंदर्भाने सांगितली आहे. दशक्रीया विधीच्या वेळी कर्मकांडाचे स्तोम माजवून सर्वसामान्य माणसाला कसे लुबाडले जाते याची कथा या चित्रपटात आहे.
अभिनेत्री प्रियंका चोप्रा यांनी ‘व्हेंटीलेटर’ ची निर्मिती केली आहे. या चित्रपटाला तीन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले तेव्हा त्या म्हणाल्या ‘‘या चित्रपटाला तीन राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याचे समजले तेव्हा खूप आनंद झाला. हा चित्रपट चित्रित करणे खूप अवघड कार्य होते.दिग्दर्शक राजेश मापुस्कर आणि सहका-यांनी केलेल्या एकत्रित प्रयत्नामुळे हे शक्य झाले. मी या चित्रपटाची कथा प्रथम ऐकली तेव्हा मला माझ्या बाबांची आठवण आली. माझ्या बाबांना काही काळ व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले होते’’. या चित्रपटात प्रियंका चोप्रा यांनी ‘थांब ना रे तू बाबा, जाऊ नको दूर तू बाबा’ हे एक हृदयस्पर्शी गाणेही म्हटले आहे.
 प्रकाश कुंटे यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘सायकल’ या चित्रपटात सामाजिक स्थितीवर रंजक पध्दतीने भाष्य करण्यात आले आहे. या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट वेशभूषा सन्मान लाभलेले सचिन लोवलेकर यांनी सांगितले की ‘‘या चित्रपटासाठी वेशभूषा निश्चित करताना लहान मुलांच्या गोष्टीच्या पुस्तकातील रंगसंगती विचारात घेऊन काम केले’’.

मराठी सिनेमाला उंचीवर नेण्याचे काम आपल्या चित्रपट दिग्दर्शक, कलाकारांनी केले आहे. आता मराठी रसिकांनीही या दर्जेदार कलाकृतींना चित्रपटगृहात सिनेमा पाहून तितकीच मनस्वी दाद देणे गरजेचे आहे.

Tuesday, March 28, 2017

                              व्हा माध्यमकार

          


               सध्याचे युग हे माहितीयुग म्हणून ओळखले जाते. आल्विन टॉफलर या विचारवंताने म्हटल्याप्रमाणे कृषी , औदयोगिक या दोन युगानंतर आलेल्या 'माहिती युगात' ज्ञान हीच खरी संपत्ती बनली आहे. त्यामुळे माहितीचे ज्ञानात रूपातंर करणारी माध्यमे व त्यातील  पत्रकार हे माहिती युगातील अत्यंत महत्त्वाचे घटक बनले आहेत.
               मागील तीन दशकात माध्यमांच्या क्षेत्राचा अफाट विस्तार झाला व त्यानुसार या क्षेत्रात मोठे बदल झाले आहेत. भारतात झपाटयाने विकसित होत असलेल्या क्षेत्रात माध्यम आणि रंजन क्षेत्राचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. वार्षिक 13.9 टक्के विकासदराने या क्षेत्राची वाढ होत असल्याने माध्यम व रंजन उदयोग क्षेत्रातील उलाढाल 2019 सालापर्यंत 2000 अब्ज रुपयापर्यंत जाईल असे अपेक्षित आहे. यावरुन या क्षेत्रातील वाढीचा धडाका आपल्या लक्षात येऊ शकेल.परिणामी माध्यम शिक्षणाच्या क्षेत्रातही मोठे बदल घडले आहेत.

पूर्वी छापून हाती येणार्‍या वृत्तपत्रे व नियतकालिकांपुरतीच पत्रकारांची कामगिरी असायची. भारतात आजच्या घडीला 70 हजार वृत्तपत्रे आणि 800 टेलिव्हिजन चॅनल्स आहेत. याशिवाय रेडिओ, सिनेमा, वेबपोर्टल, ऑनलाईन वृत्तपत्रे,मोबाईल न्यूज, इव्ह्न्ट मॅनेजमेंट,सोशल मिडिया,  जाहिरात, जनसंपर्क इत्यादी क्षेत्रेही विस्तारत आहेतच. त्याचबरोबर माध्यम संशोधन क्षेत्र, बाहय प्रसिध्दी, माध्यमे,प्रकाशन क्षेत्र, माहितीपट व चित्रपट क्षेत्र, जनसंपर्क क्षेत्र, शैक्षणिक क्षेत्र, भारत सरकार व विविध राज्य सरकारांच्या माहिती व जनसंपर्क यंत्रणा, कॉर्पोरेट क्षेत्र, शासकीय कार्यालये यात पत्रकारितेचे शिक्षण घेतलेल्या विदयार्थ्यांना रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत.
पूर्वी केवळ हस्ताक्षर चांगले असले तरी पत्रकार होण्यासाठी पुरेसे असायचे. आता मात्र पत्रकारितेचा अभ्यासक्रम पूर्ण असणे, किमान दोन भाषांवर चांगले प्रभुत्व असणे, संगणक हाताळण्याचे चांगले ज्ञान असणे या तीन बाबी पत्रकारितेच्या क्षेत्रातील नोकरीसाठी अत्यावश्यक आहेत. पत्रकारितेच्या क्षेत्रात नोकरीच्या संधी मोठया प्रमाणात उपलब्ध होत आहेत. त्यामुळे पत्रकारितेचे शिक्षण देणारी महाविदयालयेही वाढत आहेत. एकटया मुंबई शहरात पत्रकारितेचे शिक्षण देणारी 80 पेक्षा अधिक महाविदयालये आहेत. इतर शहरातील महाविदयालयांची संख्याही वाढली आहे. माध्यम क्षेत्रात नोकरीच्या संधी वाढल्याने अभ्याससक्रमांची संख्यादेखील वाढते आहे.  
वृत्तपत्रांच्या खपाच्या बाबतीत भारत जगातील दुस-या क्रमांकाचा देश आहे. भारतात दररोज वृत्तपत्राचे 12 कोटीपेक्षा अधिक अंक दररोज विक्री होतात , अशी आकडेवारी आहे. आपल्या महाराष्ट्रातही नव-नवी वृत्तपत्रे येत आहेत, पूर्वीपासून सुरु असलेल्या वृत्तपत्राच्या आवृत्ती वाढत आहेत.त्यामुळे वृत्तपत्र क्षेत्रात मोठया प्रमाणात करिअर संधी आहेत. या क्षेत्रात बातमीदार, उपसंपादक, विशेष प्रतिनिधी, ब्युरो चिफ यासारखी पदे उपलब्ध असतात.स्वतःचे वृत्तपत्र सुरु करणे हे देखील शक्य आहे. प्रत्येक वृत्तपत्राच्या ऑनलाईन आवृत्ती निघू लागल्या आहेत, त्यातही कंटेट एडिटर  होता येते. वृत्तपत्रात इवन्ट मॅनेजमेंट हा स्वतंत्र विभाग सुरु झालेले आहेत , त्यातही इवन्ट मॅनेजर व इतर पदावर काम करण्याची संधी मिळू शकते. छायाचित्र पत्रकार हे पदही उपलब्ध असते. मॅगजिन जर्नालिजमचे क्षेत्रही नव्याने भरारी घेत आहे. या क्षेत्रातही उपसंपादक व इतर पदावर काम करता येते. प्रकाशन व्यवसाय क्षेत्रातही उपसंपादक, संपादक, लेखक, चरित्र लेखक म्हणून कार्य करता येते.
रेडिओच्या क्षेत्रात एफ.एम.च्या विस्ताराचा तिसरा टप्पा सुरु आहे.त्यामुळे एक लाखापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या प्रत्येक शहरात एफ.एम.रेडिओचे केंद्र असणार आहे. त्यामुळे या क्षेत्रातील नोकरीच्या संधी मोठया प्रमाणात वाढल्या आहेत. रेडिओ जॉकी, निवेदक , वृत्त निवेदक, वृत्त संपादक, डयुटी आफिसर,कार्यक्रम अधिकारी, केद्र संचालक यासारख्या पदांवर काम करण्याची संधी प्राप्त होऊ शकते.
टेलिविजन क्षेत्रातही नोकरीच्या भरपूर संधी आहेत. यात स्ट्रींजर,अँकर, कंटेंट एडिटर, जिल्हा प्रतिनिधी यासह विविध पदावर नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. चित्रपट क्षेत्रात चित्रपट समीक्षक , पटकथा लेखक, चित्रपट प्रसिध्दी अधिकारी, चित्रपट दिग्दर्शक , लघुपट व माहितीपट तयार करणे यासारखी कामे करण्याची संधी मिळू शकते.
जनसंपर्क क्षेत्रात शासकीय, सहकार,शिक्षण, बँकिंग, कार्पोरेट क्षेत्र यासह सर्वच क्षेत्रात जनसंपर्क अधिकारी,  जिल्हा माहिती अधिकारी, माहिती आधिकारी,जनसंपर्क सल्लागार यासारख्या पदांवर कार्य करण्याची संधी उपलब्ध होऊ शकते. केंद्र शासनाच्या प्रसार यंत्रणेत प्रवेश करण्यासाठी इंडियन इन्फॉर्मेशन सर्विसेस ( आय.आय. एस. ) ही स्पर्धा परीक्षा आहे. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यास प्रेस इफॉर्मेशन ब्युरो, रेजिस्ट्रार ऑफ न्यूजपेपर्स, क्षेत्रीय प्रचार कार्यालय यासह विविध कार्यालयात महत्वाच्या पदांवर कार्य करता येते.
जाहिरात क्षेत्रात जाहिरात लेखक,जाहिरात प्रतिनिधी, जाहिरात व्यवस्थापक, जाहिरात सल्लागार, माध्यम खरेदी व्यवस्थापक,इत्यादी पदांवर कार्य करण्याची संधी लाभू शकते. स्वतःची जाहिरात संस्था सुरु करणेही सहज शक्य आहे. रेडिओसाठी ,टेलिविजनसाठी, इंटरनेटसाठी, होर्डिंग सारख्या बाय्ह प्रसिध्दी माध्यमासाठीही जाहिराती तयार करण्याची संधी मिळू शकते.
इंटरनेटच्या गतीत व तंत्रज्ञानात झालेल्या क्रांतीकारक प्रगतीमुळे वेब मीडियाचे महत्व वाढत आहे. त्यात स्मार्टफोन युजर्सची संख्या झपाटयाने वाढत असल्याने वेब मीडियामध्ये करिअरच्या अनेक संधी उपलब्ध होत आहेत. आज जवळपास सर्वच राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील दैनिके वेब पोर्टल आणि अॅपव्दारे वाचकांपर्यंत पोहोचविण्यात येत आहेत. त्यामुळे कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यत ही माध्यमे पोहोचत आहेत. त्यातूनच वेब पोर्टल आणि न्यूज अॅपमध्ये करिअरच्या अनेक संधी उपलब्ध होत आहेत. न्यूज अॅप, न्यूज साईट, युट्यूब चॅनेल, सोशल मीडिया, डिजीटल मार्केटींग, ऑनलाईन डव्हरटायजिं, गुगल अडव्हरटाईजिं, युट्यूब अॅडव्हरटायजिं, बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये कंटेट एडिटर म्ह्णून अनेक रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत. सोशल मिडिया मार्केटिंगसाठी कंटेंट एडिटर हवे असतात. त्यामध्ये फेसबूक पेज, ट्विटर अकाऊँट, सोशल इमेज बिल्डींग करण्यासाठी माध्यम क्षेत्रातील पदवीधरांना प्राधान्याने संधी दिली जाते. अॅप क्षेत्रात सध्या, डेली हंट, न्यूज हंट, वे टू ऑनलाईन यांसारखे बहुभाषिक अॅप आहेत. यामध्ये कंटेंट इडिटर म्ह्णून संधी उपलब्ध आहेत. तर शॉर्टन्यूज अॅप क्षेत्रात रिलायन्ससारखा ग्रुपही उतरत असल्याने नोकरीच्या सधी वाढणार आहेत.   
माध्यमाचे शिक्षण व संशोधन क्षेत्रातही नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. बॅचलर ऑफ जर्नालिझम, बॅचलर ऑफ मिडिया मॅनेजमेंट, एम.ए.मास कम्युनिकेशन यासारखे अभ्यासक्रम प्रत्येक शहरात उपलब्ध आहेत. माध्यमाच्या क्षेत्रात चांगले करिअर करु इच्छिणा-यांनी एम.ए.  मास कम्युनिकेशन हा अभ्यासक्रम पूर्ण करणे हितावह ठरते.       
आजच्या काळात वृत्तपत्राचा वाचक, रेडिओचा श्रोता, टीव्हीचा दर्शक बदललेला आहे. त्यामुळे त्यांच्या अपेक्षांची व गरजांची पूर्तता करणारी पत्रकारिता करणे अवघड बनले आहे. आता बातमी देताना अत्यंत कमी वेळात, सखोल , अचूक , इतरांपेक्षा वेगळी बातमी दयावी लागते. त्यासाठी त्या क्षमतेचे पत्रकार निर्माण होणे गरजेचे असते.नेमके प्रश्न विचारता येने, शोधक दृष्टी असणे, तर्क लढविता येणे व विश्लेषण करता येणे आवश्यक असते. आता विशेषीकरणाचे युग आहे, त्यामुळे पर्यावरण, शेती, उदयोग,उर्जा, शिक्षण, राजकारण, सहकार, गुन्हेगारी वृत्त, न्यायालयीन वृत्त, आंतरराष्ट्रीय राजकारण, वित्त, संरक्षण अशा कोणत्यातरी एका विषयाच सखोल अभ्यास असणार्‍या पत्रकाराला सर्वत्र मागणी असते. पी. साईनाथ केवळ भारतातच नव्हे तर जगभरात महत्व दिले जाते कारण ग्रामीण भारताशी संबंधित समस्यांचा पूर्ण अभ्यास त्यांनी केला आहे. देशाच्या कृषी धोरणात बदल घडविण्याचे सामर्थ्य त्यांच्या लेखणीत आहे, हे आपण पाहिले आहे. पत्रकारितेत करीअर करु इच्छिणार्‍या प्रत्येकाने कुठल्या तरी एका विषयाबाबत सखोल ज्ञान मिळविणे किती उपयुक्त ठरु शकते
पत्रकारितेचे क्षेत्र हे आव्हानात्मक आणि तेजोवलय लाभलेले आहे. उच्चपदस्थ राजकारणी,  समाजकारणी,  अधिकारी, चित्रपट कलावंत, साहित्यिक, शास्त्रज्ञ इत्यादींच्या सतत संपर्कात राहण्याची संधी पत्रकारांना मिळते. त्यामुळे नवे काही करू इच्छिणार्‍यांसाठी पत्रकारिता हे खुणावणारे क्षेत्र आहे. 
-    डॉ.रवींद्र चिंचोलकर
-    विभाग प्रमुख , पत्रकारिता विभाग, सोलापूर विदयापीठ
                                        ( मोबाईल क्रमांक 9860091855 )
( प्रसिध्दी - लोकराज्य फेब्रुवारी 2017 च्या अंकात प्रसिध्द झालेला लेख )

कोण होतास तू काय झालास तू ?

खींचो न कमान को न तलवार निकालो जब तोप मुक़ाबिल हो तो अख़बार निकालो भारतावर इंग्रजांची राजवट होती त्या काळात अकबर इलाहाबादी यांनी लिहिलेला हा...