Sunday, April 21, 2019

जागा राहा रात्र माध्यमांची आहे


माणूस आणि जीवसृष्टीतील इतर प्राणीमात्र एकच मोठा फरक आहे तो म्हणजे जिज्ञासा अथवा कुतुहल. माणूस फक्त आपला विचार करीत नाही तर इतरांचा, जीवसृष्टीचा व त्यापलिकडचाही विचार करतो. या मानवी जिज्ञासेतूनच माध्यमांचा जन्म झाला आहे. ‘माध्यम’ हा शब्द मुळात मिडियम’ या असिरिअन शब्दापासून तयार झालेला आहे. ‘माध्यम’ म्हणजे संवादाचे असे साधन आहे की ज्याव्दारे विचार, भावना , घडामोडी इतरांना कळविता येतात. जेव्हा मोठया जनसमुदयापर्यंत या बातम्या, संदेश पोहोचवायच्या असतात, तेव्हा एखाद्या यंत्राचा/तंत्राचा आधार घेतला जातो, तेव्हा याच माध्यमांना प्रसार माध्यमे ( मास मिडिया ) म्हटले जाते. या प्रसार माध्यमांना सर्वत्र ‘माध्यमे असेच संबोधले जाते, त्यामुळे या लेखात प्रसार माध्यमांचा उल्लेख माध्यमे असाच केला आहे.
माध्यमांचे प्रामुख्याने पाच प्रमुख प्रकार सांगता येतील .त्यात पारंपरिक माध्यमे ( लोकनाटय, गोंधळ, कीर्तन इत्यादी), मुद्रित माध्यमे ( वृत्तपत्रे, मासिके),दृकश्राव्य माध्यमे (रेडिओ, टेलिव्हीजन, चित्रपट इत्यादी), बाहय प्रसिध्दी माध्यमे ( होर्डिंग्ज, बॅनर इत्यादी), इंटरनेट माध्यमे ( समाज माध्यमे, ब्लॉग,वेब पोर्टल इत्यादी ) यांचा समावेश होतो.
माध्यमांची प्रमुख कार्ये माहिती देणे, ज्ञान देणे, रंजन करणे, सेवा देणे आणि प्रबोधन करणे ही आहेत. माध्यम शास्त्रानुसार बातमी ही पवित्र असते, त्यामुळे ती आहे तशी दयावी असे मानले जाते. जर मते व्यक्त करायची असतील तर ती बातमीत नव्हे तर लेख , अग्रलेखातून व्यक्त करावित असे मानले जात होते.
भारताचा विचार केला तर पारंपरिक माध्यमे ही समाजातूनच उदयाला आली. लोकजीवन , लोकसंस्कृतीचे प्रतिबिंब त्यातून दिसत होते.दळवळणाची फारशी साधने नसल्याने ही माध्यमे व त्यातील संदेश त्या-त्या प्रदेशापुरतेच सीमित राहिले. स्वातंत्र्यलढयाच्या काळात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, अमर शेख इत्यादींनी लोकजागृतीसाठी शाहिरीचा उपयोग करुन घेतला असे काही अपवाद वगळता, लोकमाध्यमांचा प्रभार सीमित राहिला व ही लोकमाध्यमे पुढे अस्तंगत होत गेली.
 मुद्रित माध्यमाच्या व्‍2कसाची सुरुवात 1454 मध्ये जर्मनीतील जोहान्स गटेनबर्ग यांनी हलत्या टंकाचा ( टाईप) शोध लावला तेथून झाली . जगात आणि भारतात मुद्रणाचा वापर प्रथम धर्मग्रंथ छापण्यास झाला, त्यामुळे छापलेले प्रत्येक अक्षर खरे व पवित्र असे मानले जाऊ लागले. त्यापाठोपाठ आलेल्या वृत्तपत्रातील बातम्या, मजकुरालाही समाजात मानाचे स्थान प्राप्त झाले. भारतात स्वातंत्र्यलढयाच्या काळात महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरु, लोकमान्य टिळक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, मौलाना आझाद, लाला लाजपत राय यांच्यासह सर्वच नेत्यांनी वृत्तपत्रे स्वातंत्र्य व सामाजिक लढयाचे साधन म्हणून उपयोगात आणली, त्यामुळे भारताच्या स्वातंत्र्य लढयास मोठे बळ मिळाले आणि देश स्वतंत्र झाला. माध्यमांची शक्ती किती असते याचा प्रत्यय सर्वांना आला. ती वृत्तपत्रे मतपत्रे होती, ती बहुतांशी समाजहितासाठी काय्‍॒ करीत होती. त्यामुळे त्यांचे बाहयस्वरुप ओबडधोबड आणि कृष्णधवल असले तरी त्यांचे अंतरंग हे सुंदर, पवित्र होते. आता गुळगुळीत कागदावर रंगीत छपाई होत आहेत. बाहयस्वरुपात सुंदर भासणा-या बहुतांशी वृतपत्र, मासिकांचे अंतरंग मात्र कुरुप आहे.
1913 मध्ये सिनेमा हे नवे माध्यम भारतात उपलब्ध झाले. दादासाहेब फाळके, बाबुराव पेंटर, व्ही.शांताराम, विष्णुपंत दामले, सत्यजित रे, मृणाल सेन, श्याम बेनेगल, गोविंद निहलानी यांच्यासह अनेक दिग्दर्शकांनी चांगल्या चित्रपटांची न्‍2र्मिती केली. मात्र भारतीय समाजमन मसाला चित्रपटांच्या दुनियेतच रममाण झाले. त्यामुळे गोलमालसारख्या भंपक चित्रपटाचे पाच – पाच भाग निघतात आणि प्रत्येक भाग 100 कोटीपेक्षा अधिक कमाई करतो.सिनेमाला केवळ रंजनाचे साधन मानले गेल्याने या माध्यमाचे अंतरंग मारधाड, हिंसाचार, बलात्कार, प्रेमदृश्ये यातच धन्यता माननारे बनले आहे.
1927 नंतर नभोवाणीची ( रेडिओ ) सुरुवात झाली. या माध्यमाला प्रारंभी इंग्रजांनी आणि स्वातंत्र्यानंतर भारतीय सरकारने बंधनात ठेवले. 1990 नंतर खाजगी एफ.एम.ला परवानगी देण्यात आली मात्र, फक्तगाणी वाजविण्यासाठीच. त्यामुळे या माध्यमाची शक्ती शासकीय प्रचार आणि रंजन यापलिकडे वापरलीच गेली नाही.
1959 नंतर चित्रवाणीचा ( टेलिव्हिजन) उदय झाला. या माध्यमालाही प्रारंभी सरकारी बंधनात ठेवले गेले, 1990 नंतर अचानक मुक्त करण्यात आले .आता 400 बातम्यांच्या आणि इतर 500 अशा एकंदर 900 पेक्षा अधिक चित्रवाहिन्या आहेत. बहुराष्ट्रीय कंपन्यांनी या क्षेत्रावर कब्जा केला आहे. जाहिरातींसाठी वाटेल त्या तडजोडी केल्याने यातील बहुतांश वाहिन्या पाश्चिमात्य संस्कृती लादण्यातच धन्यता मानत आहेत.
1990 नंतर इंटरनेट व त्यानंतर समाज माध्यमांचा ( सोशल मिडिया ) उदय झाला. प्रत्येक भारतीय माणूस फेसबुक, व्हॉटसअप, व्टिटर, यू टयूब किंवा इतर कोणत्या तरी समाज माध्यमाचा भरपूर वापर करतो आहे.या माध्यमातून कोनलाही लिहिता  येते, मते, चित्रे, व्हिडिओ पाठविता येतात. या माध्यमाच्या अमर्याद शक्तीचा समाजहितासाठी सकारात्मक वापर करण्याऐवजी, व्देष, जातीयता, हिंसक विचार पसरविण्यासाठी या माध्यमाचा वापर अधिक होतो आहे. या माध्यमांचे मालक हे परदेशात असल्याने यातील मजकुरावर प्रतिबंध घालता येईल असे सशक्त कायदेच उपलब्ध नाहीत.
मोबाईलच्या माध्यमातून नवे डिजिटल माध्यम आता अवतरत आहे. उद्याचे भविष्य हे मोबाइलभोवतीच फिरणारे असणार आहे. सिनेमापेक्षा टीव्हीचा पडदा छोटा म्हणून त्याला घोटा पडदा म्हटले जायचे, त्याहीपेक्षा छोटया मोबाईलच्या पडदयावर आता जग सामावले जात आहे. वेब सिरिजने पुढच्या काळाची चुणुक दाखवायला सुरुवात केली आहे. यापुढच्या काळातील माध्यमांचे अंतरंग हे अधिक संकुचित , अधिक भयावह असेल अशीच शक्यता आहे.
बडया भांडवलदारांच्या आणि जाहिरातदारांच्या कचाटयात माध्यमे जाऊ नयेत अशी महात्मा गांधी आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची इच्छा होती. पहिल्या आणि दुस-या वृत्तपत्र आयोगांनीही यासाठी अनेक सुधारणा सुचविल्या व त्यानुसार सरकारनेही काही कायदे केले. मात्र या कायद्यांना बडया माध्यम समूहांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. न्यायालयाने सरकारने केलेले कायदे रद्द ठरविले. त्यामुळे भारतातील माध्यमांतील गळेकापू स्पर्धेला मोकळे रान मिळाले. बडे उद्योजक अथवा राजकारणी हेच माध्यम सम्राट बनले. छोटी वृत्तपत्रे, वाहिन्यांना गिळंकृत करीत, आठ - दहा माध्यम सम्राटांनी आपल्या साम्राज्याचा प्रचंड विस्तार केला. या माध्यम सम्राटांच्या हाती 70 टक्के माध्यमे आहेत आणि 90 टक्के जनतेचा कब्जा त्यांनी मिळविला आहे. या माध्यम सम्राटांनी माध्यमांच्या मूळ उद्देशांना आणि नैतिकतेला तिलांजली दिली आहे. त्यामुळे आजच्या माध्यमांचे अंतरंग खूपच वेगळे आहे. जनहिताचा विचार करुन माध्यमे समाजप्रहरी म्हणून  कार्य करतील या भाबडया आशावादाला आता अर्थ राहिलेला नाही.  माध्यमांमधून दिल्या जाणा-या बातम्यांची विश्वासार्हता केव्हाच हरवलेली आहे. त्याउलट माध्यमांव्दारे दिल्या जाणा-या खोटया बातम्या ओळखणे हेच मोठे आव्हान बनले आहे. ही माध्यमे आता जनतेसाठी नव्हे तर बडया राजकारण्यांसाठी, जाहिरातदारांसाठी काम करीत आहेत. पैशांसाठी मिंधे होऊन फेक न्यूज आणि पेड न्यूज देणा-या या माध्यमांकडे आता समाज बदलण्याची शक्ती राहिलेली नाही . त्यामुळे जनतेला रंजनाच्या मोहपाशात गुंग ठेवण्याचे काम ही माध्यमे करीत आहेत. अशा या विपरित परिस्थितीत अजूनही आशेचा एक किरण आहे, तो म्हणजे जनहितासाठी निष्ठापूर्वक कार्य करणारे मोजके पत्रकार. माध्यमांनी संधी दिली नाही तरी ब्लॉगव्दारे, समाज माध्यमांव्दारे सत्य जनतेपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न ते करीत आहेत. अशा वेळी सर्वसामान्य माणसाला मात्र सांगावेसे वाटते की जागा राहा रात्र माध्यमांची आहे, त्यांच्यावर विसंबू नकोस;खरे काय ते तूच पारखून घे.

(मुंबई येथून प्रकाशित झालेल्या चैत्र पालवी माध्यम विशेष अंकात माध्यमांचे अंतरंग हा  लेख प्रसिध्द झाला आहे.)

Wednesday, April 17, 2019

माध्यम स्वातंत्र्याचे खंदे पुरस्कर्ते : डॉ. बाबासाहेब आंबेडकर



भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना घटनाकार , थोर समाज सुधारक म्हणून आपण जाणतो. मात्र पत्रकारितेच्या क्षेत्रातील त्यांची कामगिरीही अलौकिक स्वरुपाची आहे. मूकनायक , बहिष्कृत भारत, जनता आणि प्रबुध्द भारत ही चार वृत्तपत्रे त्यांनी चालविली. त्यातील बहुतांश लेखन त्यांनी स्वतः केले आहे, याशिवाय समता आणि इतर वृत्तपत्रांमधूनही त्यांनी सातत्याने लेखन केले. त्यांनी त्यावेळी पत्रकारितेतून मांडलेले विचार आजही तितकेच प्रेरक आणि मार्गदर्शक आहेत.
1919 ते 1956 या जवळपास 37 वर्षाच्या प्रदीर्घ कालखंडात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पत्रकारिता केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्रकारितेची उद्दिष्टये धार्मिक, शैक्षणिक, आर्थिक सुधारणा ,सामाजिक प्रबोधन,सामाजिक न्याय, समाज परिवर्तन आणि राजकीय स्वातंत्र्य ही होती.
 ‘‘गुलामाला गुलामगिरीची जाणीव करुन द्या , मगच तो आपल्या हक्कांसाठी संघर्ष करेल ‘ असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणत असत. आपल्या लेखणीव्दारे त्यांनी दलित समाजाला जागे केले, ‘शिका , संघटित व्हा आणि संघर्ष करा’ हा विचार दिला. या विचाराने पेटून उठलेल्या दलित समाजाने बाबासाहेबांनी दाखविलेल्या मार्गाने पुढे जाऊन, इथल्या बुरसट समाज व्यवस्थेने हिरावून घेतलेले मानवी हक्क परत मिळविले . डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या  लेखणीच्या सामर्थ्यामुळे भारतात ही सामाजिक क्रांती घडली.
मात्र डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य एवढ्या चौकटित मावणारे नाही. त्यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून भारतीय जनतेला शेती, शिक्षण, अर्थकारण, समाजकरण, राजकारण, सिंचन, कामगार चळवळ, परराष्ठ्र व्यवहार, संरक्षण , उदयोग यासह सर्वच विषयांवर विपुल लेखन केले आहे.  ते विचार आजही तेवढेच उपयुक्त आहेत.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे वृत्तपत्र स्वातंत्र्याचे प्रखर पुरस्कर्ते होते. ‘अन्यायाला वाचा फोडण्यासाठी पत्रकारितेसारखे दुसरे साधन नाही ‘असे ते म्हणत असत. याच भूमिकेतून त्यांनी 31 जानेवारी 1920 रोजी ‘ मूकनायक ‘ हे वृत्तपत्र सुरु केले. पत्रकारितेच्या क्षेत्रातील त्यांचे हे पहिले पाऊल होते. परिवर्तनाची बीजे पेरण्याचे काम या वृत्तपत्राने चोख बजावले. 20 जुलै 1924 रोजी त्यांनी ‘बहिष्कृत हितकारिणी सभेची ‘ स्थापना करुन आपल्या सामाजिक क्षेत्रातील कार्याला प्रारंभ केला. त्यामुळे त्यानंतर 3 एप्रिल 1927 रोजी सुरु केलेले ‘बहिष्कृत भारत’ वृत्तपत्र डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक चळवळीचे मुखपत्र बनले. सामाजिक लोकशाही म्हणजे स्वातंत्र्य , समता , सामाजिक न्याय व बंधुता ही जीवनाची मूलभूत तत्वे मान्य करणारी पध्दती आहे.या तत्वांना अलग करता येणार नाही.भारत हे खरेखुरे राष्ट्र व्हायचे असेल तर जातीभेद गाडावा लागेल असे डॉ, बाबासाहेब आंबेडकर म्हणत.               
वेळोवेळी निर्माण होणा-या  प्रश्नांसंबंधी जनतेला योग्य माग्‍॒दर्शन करण्याची जबाबदारी वृत्तपत्रांची आहे असे डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणत असत. भारतातील वृत्तपत्रे कशी असावित याबाबत त्यांनी एक आदर्श कल्पना मांडली होती. ‘जनता’ या वृत्तपत्राच्या 9 मार्च 1940 च्या अंकात त्यांनी यासंदर्भात लिहिले आहे की , ‘’वृत्तपत्रांना पूर्ण स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी मोठा निधी देऊन कायद्यान्वये एक समिती गठित करावी. या समितीचे विश्वस्त सरकारने दोन्ही कायदे मंडळांच्या मताने नेमावे. वृत्तपत्रांचे संपादकही याच पध्दतीने नेमावे. समितीचे विश्वस्त आणि संपादक यांना उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीएवढे मत स्वातंत्र्य दिले पाहिजे. त्यावर सरकारी नियंत्रण असता कामा नये’’.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी वृत्तपत्रांच्या संदर्भात जी संकल्पना 1940 साली मांडली होती, तशीच शिफारस दुस-या वृत्तपत्र आयोगाने 1980 च्या कालखंडात केली होती, मात्र ती संकल्पना प्रत्यक्षात येऊ शकली नाही. वृत्तपत्रांना सरकारच्या, जाहिरातदारांच्या दबावाशिवाय काम करता यावे अशी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची अपेक्षा होती. शुध्द सार्वजनिक जीवनासाठी भारताच्या नव्या घटनेत वृत्तपत्र स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी आम्ही अशी कायदेशीर समिती नेमण्याची योजना घडवून आणू आणि ख-या लोकशाहीचे रक्षण करु अशी आपणास उमेद असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. यावरुन डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांची माध्यम स्वातंत्र्याविषयीची मते किती उदात्त आणि सुस्पष्ट होती हे लक्षात येते. निकोप लोकशाहीसाठी वृत्तपत्र स्वातंत्र्य आवश्यकच आहे ही त्यांची धारणा होती. वृतपत्रांच्या स्वातत्र्याचे थोर पुरस्कर्ते असलेले पत्रकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताच्या राज्यघटनेतील कलम 19 (1)( अ) मध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्याची तरतूद करुन आपणास माध्यम स्वातंत्र्याची अनमोल देणगी दिली आहे. वृत्तपत्र स्वातंत्र्यासाठी त्यांनी प्रसंगी इंग्रज सरकारशी संघर्षही केला आहे.
 आज निवडणुकीच्या धामधुमीत अनेक वृत्तपत्रे,  चित्रवाहिन्या आणि त्यांचे आपले जनप्रबोधनाचे मूळ कार्य सोडून कोणत्या तरी राजकीय पक्षाची हुजुरेगिरी करताना दिसतात. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना नेमकी हीच भीती वाटत होती. त्यामुळे जाहिरातींचा विचार न करता वृत्तपत्रे आर्थिकदृष्टया स्वावलंबी बनावित अशी योजना त्यांना हवी होती.
 सार्वजनिक क्षेत्रात कार्य करणा-या कार्यकर्त्यावर एखादया वृत्तपत्राने बदनामीकारक लेखन केले, तर त्या कार्यकर्त्याचे म्हणणेही छापून येण्याचा कॅनडा देशातील अधिकारासारखा अधिकार भारतात असावा अशीही  डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची अपेक्षा होती. वृत्तपत्रांची भूमिका जनहिताची असायला हवी आणि कोनत्याही परिस्थितीतीत वृत्तपत्रांनी आणि संपादकांनी नीतीमत्ता सोडू नये याबाबत त्यांची मते ठाम होती. भारतातील वृत्तपत्रांचा  व्यक्तीपूजा हा स्वभावधर्म आहे, यापासून वृत्तपत्रांनी दूर रहायला हवे असेही त्यांचे स्पष्ट मत होते.
परिवर्तनाचे चक्र अर्धेच फिरल्याने भारताला राजकीय स्वातंत्र्य मिळाले , मात्र जाती, धर्माचे बंध अधिक घट्ट होत गेले. अशा काळात माध्यमांवर समाजाला योग्य दिशा दाखविण्याची जबाबदारी आहे मात्र माध्यमेच कोणाची तरी गुलामगिरी करीत आहेत, ते समाजाला कशी आणि कोणती दिशा दाखविणार?
( दैनिक दिव्य मराठी मध्ये 14 एप्रिल 2019 रोजी प्रसिध्द झालेला लेख )

अशीही पत्रकार - परिषद

पत्रकार परिषद हा एक मजेशीर प्रकार असतो. पत्रकार परिषद आयोजित करणारी व्यक्ती पत्रकारांना निमंत्रण देऊन बोलावते, पत्रकारांचे आगत-स्वागत करते ....