Saturday, May 2, 2020

छायाचित्र पत्रकारिता (फोटो जर्नलिझम)


छायाचित्र पत्रकारिता (फोटो जर्नलिझम)  हा पत्रकारितेचा एक विशेष प्रकार आहे. छायाचित्राच्या मदतीने बातमी वाचकापर्यंत पोहोचविणे याला छायाचित्र पत्रकारिता म्हणतात . सामान्य पत्रकारितेमध्ये बातमी केवळ भाषा आणि शब्दांद्वारे संकलित केली आणि प्रकाशित केली जाते. मात्र छायाचित्रांच्या माध्यमातून आपल्या बातम्या किंवा बातम्यांची कथा वाचकांपर्यंत पोहोचविल्यास त्या अत्यंत प्रभावी ठरतात.छायाचित्राच्या माध्यमातून जो पत्रकारिता करतो त्याला छायाचित्र पत्रकार म्हणतात. प्रसिध्द छायाचित्र पत्रकार रघु राय यांच्या मते “एखादया प्रसंगाच्या पाठीमागे असणारे सत्य छायाचित्राच्या माध्यमातून जो प्रखरपणे पुढे आणतो तोच खरा छायाचित्र पत्रकार होय”.घटना सोपी करुन सांगणे हा संज्ञापनाचा मूळ हेतू असतो. शब्दांपेक्षा दृश्य माध्यमातून संज्ञापन अधिक प्रभावीपणे साधता येते. म्हणूनच वृत्तपत्रात बातम्यांबरोबर छायाचित्रांचा वापर केला जातो. छायाचित्रांप्रमाणेच व्यंगचित्र, नकाशा, आलेख, रेखाटन, कल्पनाचित्रे आदींचा वापर करुन संज्ञापन साधले जाते.
छायाचित्र पत्रकारितेसाठी पत्रकारितेची दृष्टी असलेला छायाचित्रकार आवश्यक असतो. कोणत्याही घटनेचा सर्वांत महत्त्वाचा, नेमका क्षण कॅमेऱ्याने टिपणे यातच त्याचे कौशल्य असते.वृत्तपत्रात छायाचित्र प्रसिद्ध करताना त्याच्या तांत्रिक गुणवत्तेपेक्षा त्यातील पत्रकारिता-मूल्यास अधिक महत्त्व दिले जाते. प्रसिद्धीसाठी निवड करताना छायाचित्र बातमीला पूरक आणि छापण्यायोग्य असावे, अशी अपेक्षा असते. त्याखेरीज ते बनावट, दिशाभूल करणारे, न्यायालयीन कारवाई ओढवून घेणारे, वाचकावर विपरीत परिणाम करणारे, हीन अभिरुचीचे असू नये, असे काही निकषही पत्रकारितेत मानले जातात.
एखादा छायाचित्र पत्रकार शब्दांऐवजी फोटोंच्या माध्यमातून आपली बातमी / दृष्टिकोन / कथा / माहिती देतो. म्हणूनच, छायाचित्र पत्रकार एक कुशल छायाचित्रकार असणे आवश्यक आहे, परंतु छायाचित्र पत्रकार केवळ छायाचित्रकार नसतो. फोटोंच्या माध्यमातून सांगायचं असलं म्हणून पत्रकाराची शोधक दृष्टी त्याच्याकडे असणंही महत्त्वाचं आहे.

 जगभरात गाजलेली काही छायाचित्रे

1)छायाचित्र कला हीसुद्धा विविध दृश्य आपल्या कॅमेऱ्यात पकडते आणि ती क्षणचित्रे छायाचित्रकार साकार करतो. छायाचित्रकला ही एक कला नव्हेच , असा एक युक्तिवाद पूर्वी केला जात असे. एखादे दृश्य निवडायचे, चौकटीत आणायचे आणि फोटो घ्यायचा, यात कला कुठे आहे? ते केवळ एक तंत्र आहे असेच म्हटले जात असे; परंतु जेव्हा आशय आणि दृष्टिकोन भरलेली छायाचित्रे छायाचित्रकार साकारू लागले तेव्हा जगाला यातील कलेचा साक्षात्कार होऊ लागला. याचे उत्तम उदाहरण प्रसिद्ध लेखक पत्रकार अनिल अवचट यांच्याफोटोग्राफीया लेखात वाचायला मिळते.
       महायुद्धातले अनेक फोटो पाहिले; पण एका फोटोने मन जसे चरचरले तसे दुसऱ्या कशाने नव्हते. मुख्य म्हणजे तो  फोटो  युद्धभूमीवरचा नव्हताच. युद्धकाळातलाही नव्हता. युद्धानंतर काही वर्षानी विशिष्ट बटालियनमधले लोक एकत्र आले, त्याचा एक ग्रुप फोटो होता. काहीजण खुर्चीत बसलेले, कोणी मागे उभे, असा तो टिपिकल ग्रुप फोटो.फोटोतल्या माणसांना कुणाला हात नाही, कुणाला पाय नाही, कुणाचा जबडा  फाटलेला, कुणाच्या गमावलेल्या डोळ्यावर कायमची काळी पट्टी चढलेली. माणसे जशी आपल्याला छत्र्या घेऊन फोटोला त्याकाळात बसायची, तसे इथे फक्त छत्र्याच्या जागी वेगवेगळ्या प्रकारच्या कुबड्या ठेवलेल्या. मागची इमारत छान चिरेबंदी, पुढे हिरवळ बाकी सगळे व्यवस्थित. फक्त हे असे आणि मुख्य म्हणजे फोटो काढताना ते हसत होते, युद्धाच्या परिणामाविषयी वेगळे भाष्य करण्याची गरजच नाही. तो फोटो युद्धावरच्या फोटोच्या संग्रहातला होता.तो फोटोग्राफरने परिस्थिती दाखवण्यासाठी, रूढ मार्गाने जाता अगदी वेगळ्या तऱ्हेने दाखवून आपली निवड केली होती.”
2) अफगाण –पाकिस्तान सीमेवर निर्वासितांच्या अनेक छावण्या होत्या. 1984 मध्ये छायाचित्र पत्रकार स्टीव्ह मॅककुरी यांना नॅशनल जिओग्राफिकने अफगाण-पाकिस्तान सीमेवरील निर्वासित छावण्यांचे फोटो काढण्यासाठी निमंत्रित केले. त्यांनी पेशावरच्या बाहेर छावण्या पाहिल्या .नासिर बागच्या छावणीत मॅककुरीला मुलींचा शाळा म्हणून उभारलेला तंबू सापडला ज्यामध्ये पंधरा मुली शिकत असत. त्यात हिरव्या डोळ्यांच्या एका मुलीला त्याने पाहिले.मॅककुरी यांनी ही आठवण सांगताना लिहिले आहे : “मी या तरूणीला शोधले. ती फक्त बारा वर्षांची होती. ती खूपच लाजाळू होती आणि मला वाटलं की मी इतर मुलांचे छायाचित्र प्रथम काढले तर ती सहमत होण्याची शक्यता जास्त आहे. मला वाटते की तिच्याविषयी मी जशी उत्सुक होती तशीच तिलाही होती, कारण तिचे कधीच छायाचित्र घेतले नव्हते आणि तिने कॅमेराही कधीच पाहिला नव्हता. काही क्षणांनंतर ती उठली आणि निघून जाऊ लागली. पण एका क्षणात तिने मागे वळून पाहिले तो क्षण मी टिपला - तिच्या डोळ्यातील प्रकाश, पार्श्वभूमी आणि अभिव्यक्ती. यामुळे छायाचित्र अजरामर झाले. ” विसाव्या शतकातील सर्वात गाजलेले छायाचित्र म्हणून ते ओळखले गेले.

हे छायाचित्र युद्धग्रस्त देशांमधील मुलांचे दुःख आणि सामान्य लोकांवर अशा संघर्षाचे वास्तविक परिणाम दर्शवते. नॅशनल जिओग्राफिकच्या जून 1985 च्या अंकाच्या मुखपृष्ठावर हे छायाचित्र प्रसिध्द झाले. नंतर अनेक वर्षानंतर त्या मुलीचे नाव शरबत गुल असल्याचे समजले.  
                                                                                                                                                
4)सीरियातील यादवीला कंटाळून सप्टेंबर 2015 मध्ये जीव मुठीत धरुन अब्दुल्ला कुर्दी याचे कुटुंब कॅनडाला जाण्यासाठी साध्या बोटीतून निघाले होते. मात्र हा एजियन समुद्रातच बोट उलटून त्याचा आयलान या मुलाचा मृत्यू झाला. अगदी तीन वर्षाच्या आयलान कुर्दी या मुलाचा लाल टी शर्ट व निळ्या चड्डी घातलेला मृतदेह वाहून किनाऱ्याला आला. निलोफर डेमीर यांनी काढलेले आयलानचे छायाचित्र  जगभरात अनेकांचे काळीज पिळवटणारे ठरले. या अपघातात अब्दुल्ला यांनी आयलानसह, गालेब या चार वर्षांच्या मुलासह पत्नीला गमावले आहे.








Sunday, February 23, 2020

व्हाटस ऍपचे तरुणाईवर गारुड

संदेशाची देवाण - घेवाण करण्यासाठी जगभरात आणि विशेषतः भारतात सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या व्हाटस ऍपचा प्रारंभ झाला त्या घटनेला दिनांक 24 फेब्रुवारी 2020 रोजी अकरा वर्षे पूर्ण होत आहेत. या अकरा वर्षाच्या वाटचालीमध्ये भारतीय तरुण पिढीवर गारुड घालण्याचे काम केले आहे व्हाटस ऍप ने जगभरात लोकप्रियता मिळविली त्याचबरोबर त्याला टीकेचे धनी देखील व्हावे लागले आहे. व्हाटस ऍपचा च्या या वाटचालीचा लेखाजोखा मांडण्याचा प्रयत्न येथे केला आहे
व्हाटस ऍपचा हे फेसबुक, व्टिटर सारखे समाज माध्यम Social Media) नाही. व्हाटस ऍप हे संदेशाची देवाण - घेवाण करणारे (Instant Messaging App) ॲप आहे. मात्र त्याला अनेकजण समज माध्यम असेच मानतात. गमती गमती मध्ये व्हाटस ऍप ची निर्मिती झाली,  त्याची कथा मोठी रंजक आहे. जॉन कॉम हा युक्रेनमधील एक तरुण गरिबीने गांजलेला होता, तो एका दुकानांमध्ये  काम करायचा. नंतर त्यांने अमेरिकेमध्ये जाऊन याहू या कंपनीमध्ये काळ काम केले. तेथे अमेरिकेतील ब्रायन अॅक्टन यांच्यासमवेत त्याची मैत्री झाली. त्या काळात जॉन कॉमने एक आयफोन विकत घेतला होता. जॉन कॉम  प्रत्येक आठवडयात आपल्या मित्रमंडळींना गप्पा-टप्पा, भोजनासाठी निमंत्रित करायचा. त्यावेळी त्याला सहज संदेश पाठवता येणारे एखादे ऑप असावे अशी गरज वाटू लागली. त्यावेळी जॉन कॉम, ब्रायन ऍक्टन आणि काही सहका-यांनी व्हाटस ऍपचा चा शोध लावलाइंग्रजीत बोलताना एकमेकांना काय चालले आहे हे विचारण्यासाठी ‘What’s up’ असे विचारले जाते. त्यारुनच या ऍपला त्यांनी व्हाटस ऍप नाव दिले.  पाहता पाहता व्हाटस ऍप जगभरात लोकप्रिय झाले, 2013 पर्यंत त्याचा वापर करणाऱ्या लोकांची संख्या वीस कोटी पेक्षा अधिक वाढली. त्यावेळेला जगभरातील अनेक मोठया कंपन्यांचे लक्ष त्याकडे वेधले गेले आणि त्यांनी व्हाटस ऍप खरेदी करण्याचा प्रयत्न केला.  मार्क झुकरबर्ग यांच्या फेसबुकने कंपनीने 14 फेब्रुवारी 2014 रोजी 1182 मिलियन डॉलर एवढी मोठी किंमत देऊन  व्हाटस ऍप विकत घेतले. व्हाटस ऍपला फेसबुक मध्ये विलीन न करता त्याचे स्वतंत्र अस्तित्व त्यांनी कायम ठेवले. आज घडीला जगभरात 180 देशांमध्ये व्हाटस ऍपचे दीड अब्ज पेक्षा अधिक वापरकर्ते आहेत. 50 कोटी लोक दररोज व्हाटस ऍप स्टेटस चा वापर करतात, तर सहा कोटी 50 लाख लोक व्हाटस ऍपचा व्दारे संदेश पाठवतातव्हाटस ऍपचा व्दारे 53 भाषांमध्ये संदेशाची देवाणघेवाण होऊ शकते. दररोज व्हाटस ऍपचा वापर करुन सरासरी 4300 कोटी संदेश एकमेकांना पाठविले जातात. एकटया भारतात 40 कोटींपेक्षा अधिक लोक व्हाटस ऍपचा वापर करतात, ही संख्या जगातील कोणत्याही देशातील सर्वाधिक आहे. भारतीय तरुणाईवर तर व्हाटस ऍपने अक्षरशः गारुड घातले आहे. भारतातील तरुण पिढी पिढीने आपापल्या भाषेत व्हाटस ऍप द्वारे संदेशाची देवाणघेवाण करण्याची एक नवी परिभाषा निर्माण केली आहे.
जगभरातील दीड अब्ज लोकांची पसंती असलेल्या व्हाटस ऍपचा कारभार हा फार अवाढव्य असेल व त्यासाठी फार मोठी यंत्रणा लागत असेल असे आपल्याला वाटू शकते. मात्र केवळ 50 अभियंते आणि 55 कर्मचारी व्हाटस ऍपने या कामासाठी नेमलेले आहेत.
व्हाटस ऍपच्या लोकप्रियतेच्या कारणांचा शोध घेतला असता जाणवते की,  संदेशाची देवाण-घेवाण ही सहज व मोफत होते, ती जगभरात व क्षणार्धात होते. व्हाटस ऍपचा वापर परस्पर संवादासाठी, संदेश, छायाचित्रे, ध्वनिफीत, व्हिडिओ पाठवण्यासाठी करता येतो. व्हाटस ऍप वर कोणत्याही प्रकारच्या जाहिराती नसतात. लोकप्रियता मिळविण्यासाठी व्हाटस ऍप ने स्थापनेपासून कधीही एक रुपयाची देखील जाहिरात केली नाही अथवा जनसंपर्क साधण्याचा देखील प्रयत्न केलेला नाही. व्हाटस ऍप ने आपल्या वाटचालीमध्ये वापरकर्त्यांना अधिकाधिक सुविधा देण्याचा प्रयत्न केला आहे. ऑडिओ-व्हिडिओ पाठविणे,  संदेश जर चुकलेला असेल तर तो डिलीट करणे, व्हाटस ऍपचा बिजनेस, अगदी अलीकडच्या काळामध्ये भारतात व्हाटस ऍपचा वापर पैशांची देवाणघेवाण करण्यासाठी देखील करता येईल अशी सुविधा निर्माण करण्यात आलेली आहे.
भारतीय समाजातील विविध समाजघटकांसाठी व्हाटस ऍपचे अनेक फायदे दिसून आलेले आहेत. शेतकऱ्यांना हवामानाचीबाजार भावाची, नवीन उपकरणांची माहिती उपलब्ध होते. उदयोजकांना शेअरबजार, नवे नियम यांची माहिती मिळते. सेवाभावी संस्था ग्रामस्थांना व्हाटस ऍप द्वारे संदेश पाठवून विधायक कार्यामध्ये सहभागी करून घेतात, काही रुग्णांना परदेशातून डॉक्टरांचा सल्ला मिळतो, पुराच्या परिस्थितीत अथवा दुष्काळाच्या परिस्थितीत अनेक नागरिक पुढे येऊन मदत करतात अशी अनेक उदाहरणे आहेत.
कोणतेही तंत्रज्ञान मुळामध्ये वाईट नसते त्यामुळे व्हाटस ऍप हे वाईट आहे असे म्हणता येणार नाही. मात्र वापर करणाऱ्यांना जर ते वाईट उद्देशाने वापरले तर त्याचे दुष्परिणाम सर्वांना भोगावे लागतात. इस्त्राईल  मधील एन.एस.ओ. गटाने हल्ला करून जगातील चौदाशे मानवाधिकार कार्यकर्ते, पत्रकार, नागरिक यांची माहिती चोरली होती अशी गंभीर घटना 2019 मध्ये घडलेली आहे. व्हाटस ऍपच्या माध्यमातून भारतात खोटया बातम्या पसरवण्याचे अनेक प्रकार मागील काही वर्षांत झाले आहेत. अशा खोटया संदेशामुळे जमावाकडून लोकांना जीवे मारण्यात आल्याच्या घटनाही घडल्या आहेत. अशाच एका घटनेमध्ये सोलापूरच्या मंगळवेढा परिसरातील पाच नागरिकांना धुळे जिल्ह्यातील साक्री येथे जमावाने ठार केले. भारतातही इतर ठिकाणीही अशा घटना घडलेल्या आहेत. एखादया व्यक्तीला बदनाम करण्यासाठी देखील व्हाटस ऍपचा वापर होतो. अलीकडच्या काळामध्ये सोलापूर- पुणे रस्त्यावर असलेल्या कुरकुंभ एमआयडीसी मध्ये मोठी आग लागलेली आहे अशी खोटी बातमी व्हाटस ऍप द्वारे फिरत होती, त्यामध्ये तसा व्हिडिओदेखील जोडलेला होता. अशा अनेक गोष्टी सातत्याने घडत आहेत.
व्हाटस ऍप ने देखील आपल्या परीने आपल्या सेवेमध्ये सुधारणा करण्याचे काही प्रयत्न केले आहेत, मात्र ते तोकडे आहेत. व्हाटस ऍप भारतीय तरुण पिढीवर एक गारुड निर्माण केले असले तरी या गारुडाच्या संमोहनात  किती काळ अडकून राहायचे याचा विचार तरुण पिढीने करण्याची गरज निर्माण झाली आहे. व्हाटस ऍप वरून दिली जाणारी माहिती किती उथळ स्वरुपाची असते याची अनेक उदाहरणे आहेत. व्हाटस ऍप व्दारे आलेल्या कोणत्याही माहितीवर अगदी पूर्ण विश्वास ठेवता येईल असे चित्र सध्या तरी नाही. तशी विश्वासार्हता निर्माण करण्या तसेच खोटया बातम्या आणि संदेश पसरविण्याच्या प्रकाराला आळा घालण्यात व्हाटस ऍपची यंत्रणा कितपत यशस्वी ठरते यावर व्हाटस ऍपचे भवितव्य अवलंबून आहे.

Saturday, December 7, 2019

व्यक्तिपूजा हूकूमशाहीकडे नेते


भारतीय समाजाचा, सामाजिक रचनेचा , भारतीयांच्या मानसिकतेचा संपूर्ण अभ्यास असणारी आणि त्यावर अचूक भाष्य करणारी एकमेव व्यक्ती म्हणजे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर होत. त्यांनी भारतासाठी अलोकिक कामगिरी केली आहे. 

आजच्या कोणत्याही राजकीय, सामाजिक, आर्थिक समस्येवरीलउत्तर त्यांच्या लेखनात सापडते. आजच्या काळातील राजकारणात पक्षनिष्ठेला दिली जाणारी तिलांजली, उबग आणणारा घोडेबाजार, विरोधकांची मुस्कटदाबी करणारी कपटनीती यावर त्यांनी अचूक आणि दिशादर्शक भाष्य केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी व्यक्त केलेल्या विचारांचे प्रत्येक भारतीयाने मंथन प्रत्येक भारतीयाने करण्याची गरज आहे असे प्रकर्षाने वाटते.
भारतातील प्रत्येक स्त्री – पुरुषाला घटनेतील तरतुदीनुसार देण्यात आलेला मतदनाचा आधिकार ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची मोठी देण आहे. अनेक प्रगत देशात मतदानाच्या अधिकारासाठी लोकांना व विशेषतः स्त्रियांना मोठा संघर्ष करावा लागला. मतदानाचा हा अधिकार किती महत्वपूर्ण आहे याविषयी डॉ आंबेडकर यांनी म्हटले आहे मत म्हणजे ईश्वराने दिलेल्या संजीवनी मंत्र आहे, त्याचा योग्य उपयोग केला तरच आपले संरक्षण होईल. स्वाभिमानी जीवनाचा तो एक तरणोपाय आहे, त्याची जोपासना करा. या दृष्टीने निवडणुकीचा विचार करा”. आजच्या काळात अधिक शिकलेले आणि श्रीमंत लोक मतदानासाठी बाहेरच पडत नाहीत. विशेष म्हणजे चांगले लोकप्रतिनिधी नाहीत असा गळा काढण्यात हेच लोक पुढे असतात.
निवडणुकीच्या काळात जे लोक प्रचार सभांचा धडाका लावून विमानाने फिरत सर्वत्र सभा घेतात त्यांच्याविषयी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भाष्य केले आहे. ते म्हणतात देशातील सरी जनता आपल्या मागे उभी आहे अशी फुशारकी व घमेंड मारणारे हे लोक विमानाने का उडतात? सारा देश घुसळून का काढतात?”. आजच्या काळात हे विधान अधिक मार्मिक आहे.
निवडून आल्यानंतर घोडेबाजारात विकले जाणाऱ्या लोकप्रतिनिधीनी विषयी आंबेडकर म्हणतात जो विकला जातो, लोभाला बळी पडतो, त्याचा काही उपयोग नाही”. लोककल्याण याच एकमेव भावनेने राजकारण केले गेले पाहिजे असे त्यांचे मत होते.
भारतीयांच्या मानसिकतेचा अभ्यास करुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी इशारा दिला होता की “राजकारणाच्या क्षेत्रात व्यक्ती पूजेला महत्त्व दिले जाऊ नये. इतर कोणत्याही देशाच्या राजकारणात दिसणार नाही इतक्या मोठया प्रमाणात भारतीय राजकारणात विभूतिपूजा दिसते. राजकारणात भक्ती किंवा व्यक्तीपूजा ही अधःपतन आणि अंतिमतः हुकूमशाहीकडे नेणारा हमखास मार्ग ठरतो”.
निकोप लोकशाहीत कोणत्याही पक्षाच्या हाती अनियंत्रित सत्ता असू नये असे स्पष्ट करताना डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणतात माझ्या मताप्रमाणे लोकशाहीच्या कामकाजासाठी फार महत्त्वाची बाब म्हणजे लोकशाहीच्या नावावर बहुमत वाल्यांनी अल्पमत वाल्यांवर जुलूम करता कामा नये. बहुमत वाले जरी सत्तेवर असले तरी अल्पमत वाल्यांना स्वतःबद्दल सुरक्षितता वाटली पाहिजे. अल्पमत वाल्यांची मुस्कटदाबी केली जाते किंवा त्यांना डावपेचाने मार दिला जातोय अशी अल्पमत वाल्यांची भावना होता कामा नये.
राजकारणही गाभीर्याने करण्याची गोष्ट आहे असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मानत. कोणाला राजकारणात यायचे असेल तर त्याने आधी भारतीय समाजाचा, अर्थकारणाचा अभ्यास केला पाहिजे. राजकारणी व्यक्तीने जनतेच्या पैशाचा कदापिही अपहार करु नये , तो पैसा लोककल्याणासाठीच वापरला गेला पाहिजे असे ते म्हणत. सरकारने राज्यकारभार कसा करावा याविषयी आंबेडकर म्हणतात कोणतेही सरकार जनहित किती पाहते याच्यावर त्याचे श्रेष्ठत्व अवलंबून असते. आपल्या देशात अनेक प्रश्न आहेत पण त्याहूनही महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे राज्यकारभार किती शुध्दतेने केला जातो. आपल्याकडील सगळ्यात महत्त्वाचा दोष कोणता असेल तर तो म्हणजे अशुद्ध व लाच बाजीने भरलेले राज्य शासन. राज्य शासन शुद्ध राखण्यासाठी काही बाहेरची मदत लागत नाही फक्त  ते शुद्ध राखण्याची इच्छा असली पाहिजे.
स्वातंत्र्य , समता आणि बंधुत्व या त्रिसूत्रीवर आधारित देशातील राजकीय, सामाजिक, आर्थिक व्यवस्था असावी. जातीधर्म विरहित सामाजिक विचार व्हावा, शुध्द हेतूने राजकारण केले जावे , राजकारणात घोडेबाजार होऊ नये, सक्षम विरोधी पक्ष असणे हे जिवंत लोकशाहीचे दयोतक आहे असे  असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मत होते. मात्र स्वातंत्र्यानंतर 72 वर्षे उलटून गेल्यावर आजही हे प्रत्यक्षात येवू शकलेले नाही. कोणताही पक्ष उमेदवार निवडताना त्याच्या मतदारसंघात त्याच्या जाती- धर्माचे किती मतदार आहेत , त्याची पैसा खर्च करण्याची ताकत किती आहे हे पाहूनच उमेदवारी देतो, निवडणुकीनंतर बहुमतासाठी होणारा घोडेबाजार ही नित्याचीच बाब झाली आहे. विरोधी पक्षांना संपविण्यासाठी सत्ताधारी पक्ष शासकीय यंत्रणा , न्यायसंस्थांना वेठीस धरीत आहेत. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेल्य मार्गाने राजकारण झाले  आणि लोकशाहीची जोपासना झाली तर आपला देश खरोखर बलशाली होईल .
 ( दिव्य मराठीत दिनांक 6 डिसेंबर 2019 रोजी प्रकाशित झालेला लेख )

Monday, June 3, 2019

समाज माध्यमांना विषवल्लीचा विळखा


मार्शल मॅकलुहान या माध्यम तज्ञाने आपल्या 'अंडरस्टँडिंग मिडिया' या ग्रंथात भाकित केले होते की, तंत्रज्ञानातील बदलांमुळे जग एक वैश्विक खेडे बनेल. तेच वास्तव आज आपण आजच्या काळात समाज माध्यमांच्या ( सोशल मिडिया ) व्दारे अनुभवतो आहोत. समाज माध्यमे ही प्रत्येक भारतीयाच्या जीवनातील एक अत्यावश्यक बाब बनली आहे. विशेषतः फेसबुक आणि व्हॉटसअपचा वापर प्रत्येकजण करीत आहे. व्हॉटसअपची मालकी फेसबुककडेच आहे. भारतात फेसबुकचे 25 कोटी वापरकर्ते आहेत आणि जवळपास तेवढेच व्हॉटसअपचेही वापरकर्ते आहेत. याशिवाय व्टिटर,यू ट्यूब,  इन्स्टाग्राम, लिंक्डइन, माय स्पेस, गुगल प्लस यासारखी समाज माध्यमेही लोकप्रिय आहेत. मोबाईलचा वापर तर वेड म्हणावे इतका वाढला आहे. भारतात 100 कोटीपेक्षा अधिक लोक मोबाईल वापरतात. शेतमजुरापासून ते उद्योगपतीपर्यंत प्रत्येकजण स्मार्टफोनचा आणि समाज माध्यमांचा वापर करतो आहे. प्रत्येकजण या स्मार्टफोनच्या माध्यमातून माहितीच्या महासागरात डुंबत असतो. 
माणसे आता प्रत्यक्ष एकमेकाशी फारसे बोलत नाहीत, ते स्मार्टफोनव्दारे समाज माध्यमांवर गुंगुन गेलेले असतात.अर्धा तास फेसबुक किंवा व्हॅाटसअप बंद पडले तर अनेकांच्या मनाची मोठी तगमग होते. या समाज माध्यमांमुळे भारतीय समाज बदलतो आहे, संस्कृती बदलते आहे.
 या समाज माध्यमांमुळे घडत असलेले सकारात्मक बदल खालीलप्रमाणे नोंदविता येतील.
·         तात्काळ संवाद – आपल्या आप्तांशी, मित्रांशी, सहका-यांशी तात्काळ संपर्क साधता येतो. कोणी अमेरिकेत असो की, भारतातल्या एखादया खेड्यात कोठेही तात्काळ संपर्क आणि संवाद होतो.
·         ज्ञानाची उपलब्धता – जगभरातील ज्ञानाचे आदान – प्रदान समाज माध्यमांमुळे शक्य झाले आहे. एखाद्या असाध्य आजारावर जगातील सर्वोत्तम डॉक्टरांचा सल्ला समाजमाध्यमांवरुन घेतल्याची आणि त्यानंतरच्या उपचाराने रुग्ण सुधारल्याची अनेक उदाहरणे आहेत.
·         मुक्त अभिव्यक्ती – समाज माध्यमे दडपलेल्या, पिचलेल्या लोकांचा आवाज सर्वांपर्यंत पोहोचविण्यास उपयुक्त साधन आहे. अनेक देशातील, राज्यातील जनतेचे खरे प्रश्न त्यामुळे उघडकीस येत आहेत. विकिलिक्स सारख्या नागरिक पत्रकारितेने बड्या देशांची कारस्थाने वेशीवर टांगण्याचे काम यातून केले आहे.
·          रोजगाराच्या संधी – समाज माध्यमांमुळे एक नवेच क्षेत्र रोजगारासाठी उपलब्ध झाले आहे. या माध्यमांसाठी लेखन, संपादन , व्यवस्थापन , विपणन करणा-यांची मोठी गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे रोजगारच्या नव्या संधी उपलब्ध झाल्या आहेत.
·         स्वस्त आणि गतीमान संवाद – समाज माध्यमांमुळे अगदी नगण्य खर्चात आणि गतीमान संवाद होतो. इतर माध्यमांच्या तुलनेत या माध्यमावर होणारा खर्च नगण्य आहे. यातून हव्या त्या लक्ष्यित गटाशी नेमकेपणाने , गतीने आणि अचूक संवाद साधता येतो.
·         व्यवसाय वाढ -  प्रत्येक उदयोगाला आणि इतर व्यावसायिक क्षेत्रांना आपला व्यवसाय वाढविण्यासाठी समाज माध्यमांची मदत होते.  ग्रामीण भागातूनही निर्यात करण्यास ही माध्यमे उपयुक्त ठरतात.
·         आवडीची जोपासना - समाज माध्यमांमुळे एखाद्या व्यक्तीला ज्या क्षेत्राची आवड त्या क्षेत्राशी निगडित राहता येते. समान विचार, आवडी- निवडी असलेले लोक एकत्र येतात, त्यांच्यात संवाद निर्माण होतो आहे, वाढतो. संगीत, नाट्य, शिक्षण, पार्यावरण इत्यादी क्षेत्रातले असे अनेक अभ्यासगट समाज माध्यमांव्दारे एकत्र काम करीत आहेत.
·         जगभरातील घटनांची माहिती- जगभरात घटना-या घटनांची माहिती, घटना घडताच जगभर पोहोचते आहे. जग वैश्विक खेडे बनले, त्याची प्रचीती यातून येते.
·          नवतंत्रज्ञानाचा प्रसार-  समाज माध्यमांमुळे नवतंत्रज्ञानाचा प्रसारही जगभरात तात्काळ होतो आहे. पूर्वी जे तंत्रज्ञान भारतात यायला दहापेक्षा अधिक वर्षे लागायची , ते आता काही महिन्यात भारतात येत आहे.
·         आपत्ती व्यवस्थापन – आपत्तीच्या काळात समाज माध्यमे लोकांना संकटातून सोडविण्यासाठी उपयोगी ठरतात. इराकमधून भारतीयांना सोडविण्यात, केदारनाथ अपत्तीतून लोकांची सुटका करण्यात हे दिसले.
·         जनमत घडविणे – समाज माध्यमे जनमत घडविण्याचे मोठे कार्य करतात. इजिप्तसह अनेक देशात समाज माध्यमांनी जनमत घडविण्यातही मोठी भूमिका बजावली . भारतातही अण्णा हजारे यांच्या 2014 मधील आंदोलनाच्या काळात समाज माध्यमांनी मोठी जागृती घडविली होती. लोकसभा निवणुकतही या माध्यमांची ताकद दिसून आली.
छोटया गावापासून ते आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत समाजजीवन ढवळून टाकण्याचे काम समाज माध्यमांनी केले आहे. समाज माध्यमांव्दारे एकत्र आलेल्या जनतेने आपल्या देशातील हुकूमशाही राजवटी उलथवून लोकशाहीची पुर्नस्थापना करण्याचे काम अनेक देशात केले आहे. राजकीय प्रचारासाठी तर आता समाज माध्यमे हेच सर्वात महत्वाचे साधन बनले आहे. समाज माध्यमांच्याव्दारे लक्षावधी लोकांशी संपर्क साधने सहज शक्य होते आणि तेही जवळपास विनाशुल्क. कोणतेही तंत्रज्ञान वाईट, दुजाभाव करणारे नसते.  समाज माध्यमेही मूलतः चांगलीच आहेत, या माध्यमांची गुणवैशिष्टयेही खूप आहेत . मात्र या समाज माध्यमांचा गैरवापरच अधिक होत असल्याचे चित्र आहे.
 “सोशल मीडिया बन गया है एक नया संसार
जिसमें बढ़ता जा रहा है सूचना का भण्डार
सच और झूठ से नहीं रहा अब कोई वास्ता
सबकी अपनी मंज़िलें सबका अपना रास्ता”

अभय गौड यांच्या कवितेतील या ओळी खूप काही सांगून जातात. 
समाज माध्यमांचा जो गैरवापर होत आहे,  त्यामुळे समाजावर होणा-या वाईट परिणामांची चर्चा करणेही गरजेचे झाले आहे.
·         फेक न्यूज (खोटया बातम्या) – फेक न्यूज हे समाज माध्यमांसमोरील सध्याचे एक सर्वात मोठे आव्हान आहे. समाज माध्यमातून खोट्या बातम्या फार गतीने आणि सर्वत्र पोहोचतात. फेक न्यूजचा वापर समाजामध्ये गैरसमज निर्माण करण्यासाठी, परस्परांविषयी द्वेष निर्माण करण्यासाठी, राजकीय स्वार्थ साधण्यासाठी केला जातो. सर्वसामान्य माणसाला खरी बातमी कोणती आणि खोटी बातमी कोणती हे समजणे शक्य नसते. त्यामुळे बातमीची सत्य-असत्यता पारखण्याआधीच हिंसा, जाळपोळ असे प्रकार घडतात. गुगल आणि इतर काही संस्थांनी फेक न्यूज ओळखण्यासाठी काही चाचण्या विकसित केल्या आहेत. मात्र त्याची माहिती सर्वसामान्यांना नाही आणि या तंत्राद्वारे सर्वच फेक न्यूज ओळखल्या जातील असेही सांगता येत नाही. भारत सरकारने समाज माध्यमांवरील फेक न्यूज आणि अफवा रोखण्यासंदर्भात वेळोवेळी काही नियम, कायदे करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र त्यांचा फार परिणाम दिसून आलेला नाही. काही वेळा काही भागातील इंटरनेट सेवा बंद ठेवण्याचाही उपाय योजला गेला. महाराष्ट्रात धुळे जिल्ह्यातील राईनपाडा येथे जुलै 2018 मध्ये घडलेली घटना तर माणुसकीला काळीमा फासणारी आहे. मुले चोरणारी टोळी आली आहे या व्हॉटसअप वरून पसरलेल्या अफवेमुळे जमावाने तेथे पाच निरपराध तरुणांना ठार केले. हे पाच करून सोलापूर जिल्हयातील मंगळवेढा भागातील बहुरूपी समाजातील लोक होते. बीड जिल्हयातही अशाच प्रकारे रोजगाराच्या शोधात आलेल्या गरीब लोकांना जमावाने मारहाण केल्याचे प्रकार घडले. देशात मागील वर्षभरात अशा प्रकारात 33 निरपराध लोकांचा जीव गेला आहे.

·         ट्रोलिंग – समाज माध्यमांचा दुसरा गैरवापर ट्रोलिंगसाठी केला जातो. यात एखादया व्यक्तीला लक्ष्य करुन समाज माध्यमांवर त्याची बदनामी केली जाती, अश्लील, विखारी भाषेत टीका केली जाते. विशेषतः आपली परखड मते समाज माध्यमांव्दारे मांडणा-या युवती, महिलांना यात अधिक लक्ष्य केले जाते. ट्रोलिंगसाठी प्रामुख्याने व्टिटरचा वापर केला जातो. गुरमेहर कौरपासून पत्रकार बरखा दत्त यांच्यापर्यत हजारो महिलांना ट्रोलिंगचा त्रास सहन करावा लागला आहे. यात बदनामीपासून थेट बलात्काराची धमकी देण्यापर्यंत या ट्रोलर्सनी उच्छाद मांडला आहे. पुरुष विचारवंत, लेखक , पत्रकारांनाही खुनाच्या धमक्या दिल्या गेल्या आहेत. दहशत निर्माण करणा-या ट्रोलर्सला आळा घालू शकणारा प्रभावी कायदा अद्यापही झाला नाही. काही राजकीय पक्षंनी तर ट्रोल आर्मीच उभी केली आहे. त्यांच्या पक्षावर टीका करणा-यांवट ही ट्रोलधाड तुटून पडते. विरोधकांची यथेच्छ बदनामी करण्याची,देशद्रोही ठरविण्याची, त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्याची मोहीमच उघडली जाते. समाज माध्यमे म्हणजे मुक्त अभिव्यक्तीची व्यासपीठे असे म्हटले जाते, मात्र असे करु पाहणारांचा आवाज दडपण्याचे प्रकारच जास्त घडत आहेत.
·         युवापिढीला व्यसन - समाज माध्यमे ही तरुण पिढीसाठी एखाद्या व्यसनाप्रमाणे बनली आहेत. या समाज माध्यमांच्या आहारी गेलेल्या तरुण पिढीचे आरोग्य यामुळे धोक्यात आले आहे. देश उभारणीसाठी झटण्यापेक्षा समाजमाध्यमांवर पडिक असलेली तरुण पिढी पाहायला मिळते आहे.  नैराश्य, मानसिक आजार,वाढती गुन्हेगारी हे प्रकार तरुण पिढीत वाढत आहेत. गुड मॉर्निंग गुड नाईट यासारखे कोट्यवधी संदेश पाठवण्यात धन्यता मानणा-या भारतीयांमुळे जगभरातील इंटरनेट यंत्रणा ठप्प झाल्याची उदाहरणे आहेत.
·         अश्लीलतेचा प्रसार – समाज माध्यमांव्दारे किशोरवयीन व तरुण पीढीला अश्लील चित्रफिती, मजकूर सहज उपलब्ध होतो. या समाज माध्यमांव्दारे मुली, महिलांना धमकावण्याचे, ब्लॅकमेल करण्याचे प्रकार सर्रास घडतात. समाज माध्यमांवर त्यांची बदनामी करण्याची धमकी देऊन, बलात्कार केला गेल्याचे अनेक प्रकार उघडकीस आले आहेत.
·         जातीय, धार्मिक विव्देष –  भारतीय समाज जसजसा अधिक शिक्षित, प्रगत होत आहे तसतशी जातीयता, धर्मांधता कमी होईल असे वाटत होते. भारतीय घटनेनेही यापुढचा भारतीय समाज जातीभेद, धर्मभेद न माननारा असावा अशी अपेक्षा केली आहे. मात्र वास्तव चित्र नेमके उलट आहे. राजकीय आणि आरक्षणाच्या लाभासाठी आपल्या जातीला, धर्माला अधिक कवटाळून समाज माध्यमांव्दारे जातीय, धार्मिक विव्देष पसरविण्याचे प्रकार सर्वत्र घडत आहेत.
·         प्रशिक्षणाचा अभाव- समाज माध्यमे म्हणजे तंत्रज्ञानाचा अदभूत अविष्कार आहे. मात्र ही संवेदनशील माध्यमे कोणत्याही प्रशिक्षणाविना प्रत्येकाच्या हातात आली आहेत. त्यामुळे या माध्यमांचा वापर कसा करावा याबाबतची समाज माध्यम साक्षरता भारतीय समाजाला ठाऊकच नाही. ही समाज माध्यम साक्षरता निर्माण करण्याचे आणि रुजविण्याचे मोठे आव्हान आपल्या देशासमोर आहे.
·         कायद्याच्या मर्यादा –फेसबुक, व्हॉटसअप, यु ट्यूब, व्टिटर, इन्स्टाग्राम, लिंक्डइन, माय स्पेस, गुगल प्लस यासारख्या समाज माध्यमांची मालकी-या बहुराष्ट्रीय कंपन्याकडे आहे. त्यांचे लक्ष मिळणा-या नफ्याकडे आहे. त्यामुळे सदस्यांची खाजगी माहिती विकण्याचेही प्रकार त्यांनी केले. महापुरुषांची , महिलांची बदनामी होत असल्याच्या तक्रारी आल्यावरही या कंपन्या कारवाई करत नाहीत. भारत सरकारने विनंती करुनही लवकर लक्ष देत नाहीत. यासंदर्भात आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रभावी ठरतील असे कायदे नाहीत.
·         वाढते गुन्हे – फेसबुक, व्हॉटसपच्या माध्यमातून आर्थिक फसवणूक केल्याचे गुन्हे वाढत आहेत. वृध्द, अज्ञानी लोकांना यात लक्ष केले जात आहे. पासवर्ड मिळवून नागरिकांचे पैसे लुबाडणा-यांची संख्याही मोठी आहे.
 या सर्व बाबी विचारात घेता समाज माध्यमांच्या गैरवापराला आणि फेक न्यूज ला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने प्रभावी कायदे करण्याची आणि ते कायदे प्रभावीपणे अमलात आणण्याची गरज प्रकर्षाने जाणवते. भारतातील नागरिकांना घटनेने अभिव्यक्ती स्वातंत्र्यांची अनमोल देणगी दिली आहे. हे स्वातंत्र्य अबाधित राहिलेच पाहिजे, मात्र या स्वातंत्र्याच्या आडून भारतीय जनतेमध्ये खोट्या बातम्या, गैरसमज पसरविणा-या, जाती-धर्मामध्ये तेढ निर्माण करणा-या विषवल्लीला  पायबंद घालण्याची नितांत गरज आहे.

Sunday, April 21, 2019

जागा राहा रात्र माध्यमांची आहे


माणूस आणि जीवसृष्टीतील इतर प्राणीमात्र एकच मोठा फरक आहे तो म्हणजे जिज्ञासा अथवा कुतुहल. माणूस फक्त आपला विचार करीत नाही तर इतरांचा, जीवसृष्टीचा व त्यापलिकडचाही विचार करतो. या मानवी जिज्ञासेतूनच माध्यमांचा जन्म झाला आहे. ‘माध्यम’ हा शब्द मुळात मिडियम’ या असिरिअन शब्दापासून तयार झालेला आहे. ‘माध्यम’ म्हणजे संवादाचे असे साधन आहे की ज्याव्दारे विचार, भावना , घडामोडी इतरांना कळविता येतात. जेव्हा मोठया जनसमुदयापर्यंत या बातम्या, संदेश पोहोचवायच्या असतात, तेव्हा एखाद्या यंत्राचा/तंत्राचा आधार घेतला जातो, तेव्हा याच माध्यमांना प्रसार माध्यमे ( मास मिडिया ) म्हटले जाते. या प्रसार माध्यमांना सर्वत्र ‘माध्यमे असेच संबोधले जाते, त्यामुळे या लेखात प्रसार माध्यमांचा उल्लेख माध्यमे असाच केला आहे.
माध्यमांचे प्रामुख्याने पाच प्रमुख प्रकार सांगता येतील .त्यात पारंपरिक माध्यमे ( लोकनाटय, गोंधळ, कीर्तन इत्यादी), मुद्रित माध्यमे ( वृत्तपत्रे, मासिके),दृकश्राव्य माध्यमे (रेडिओ, टेलिव्हीजन, चित्रपट इत्यादी), बाहय प्रसिध्दी माध्यमे ( होर्डिंग्ज, बॅनर इत्यादी), इंटरनेट माध्यमे ( समाज माध्यमे, ब्लॉग,वेब पोर्टल इत्यादी ) यांचा समावेश होतो.
माध्यमांची प्रमुख कार्ये माहिती देणे, ज्ञान देणे, रंजन करणे, सेवा देणे आणि प्रबोधन करणे ही आहेत. माध्यम शास्त्रानुसार बातमी ही पवित्र असते, त्यामुळे ती आहे तशी दयावी असे मानले जाते. जर मते व्यक्त करायची असतील तर ती बातमीत नव्हे तर लेख , अग्रलेखातून व्यक्त करावित असे मानले जात होते.
भारताचा विचार केला तर पारंपरिक माध्यमे ही समाजातूनच उदयाला आली. लोकजीवन , लोकसंस्कृतीचे प्रतिबिंब त्यातून दिसत होते.दळवळणाची फारशी साधने नसल्याने ही माध्यमे व त्यातील संदेश त्या-त्या प्रदेशापुरतेच सीमित राहिले. स्वातंत्र्यलढयाच्या काळात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, अमर शेख इत्यादींनी लोकजागृतीसाठी शाहिरीचा उपयोग करुन घेतला असे काही अपवाद वगळता, लोकमाध्यमांचा प्रभार सीमित राहिला व ही लोकमाध्यमे पुढे अस्तंगत होत गेली.
 मुद्रित माध्यमाच्या व्‍2कसाची सुरुवात 1454 मध्ये जर्मनीतील जोहान्स गटेनबर्ग यांनी हलत्या टंकाचा ( टाईप) शोध लावला तेथून झाली . जगात आणि भारतात मुद्रणाचा वापर प्रथम धर्मग्रंथ छापण्यास झाला, त्यामुळे छापलेले प्रत्येक अक्षर खरे व पवित्र असे मानले जाऊ लागले. त्यापाठोपाठ आलेल्या वृत्तपत्रातील बातम्या, मजकुरालाही समाजात मानाचे स्थान प्राप्त झाले. भारतात स्वातंत्र्यलढयाच्या काळात महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरु, लोकमान्य टिळक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, मौलाना आझाद, लाला लाजपत राय यांच्यासह सर्वच नेत्यांनी वृत्तपत्रे स्वातंत्र्य व सामाजिक लढयाचे साधन म्हणून उपयोगात आणली, त्यामुळे भारताच्या स्वातंत्र्य लढयास मोठे बळ मिळाले आणि देश स्वतंत्र झाला. माध्यमांची शक्ती किती असते याचा प्रत्यय सर्वांना आला. ती वृत्तपत्रे मतपत्रे होती, ती बहुतांशी समाजहितासाठी काय्‍॒ करीत होती. त्यामुळे त्यांचे बाहयस्वरुप ओबडधोबड आणि कृष्णधवल असले तरी त्यांचे अंतरंग हे सुंदर, पवित्र होते. आता गुळगुळीत कागदावर रंगीत छपाई होत आहेत. बाहयस्वरुपात सुंदर भासणा-या बहुतांशी वृतपत्र, मासिकांचे अंतरंग मात्र कुरुप आहे.
1913 मध्ये सिनेमा हे नवे माध्यम भारतात उपलब्ध झाले. दादासाहेब फाळके, बाबुराव पेंटर, व्ही.शांताराम, विष्णुपंत दामले, सत्यजित रे, मृणाल सेन, श्याम बेनेगल, गोविंद निहलानी यांच्यासह अनेक दिग्दर्शकांनी चांगल्या चित्रपटांची न्‍2र्मिती केली. मात्र भारतीय समाजमन मसाला चित्रपटांच्या दुनियेतच रममाण झाले. त्यामुळे गोलमालसारख्या भंपक चित्रपटाचे पाच – पाच भाग निघतात आणि प्रत्येक भाग 100 कोटीपेक्षा अधिक कमाई करतो.सिनेमाला केवळ रंजनाचे साधन मानले गेल्याने या माध्यमाचे अंतरंग मारधाड, हिंसाचार, बलात्कार, प्रेमदृश्ये यातच धन्यता माननारे बनले आहे.
1927 नंतर नभोवाणीची ( रेडिओ ) सुरुवात झाली. या माध्यमाला प्रारंभी इंग्रजांनी आणि स्वातंत्र्यानंतर भारतीय सरकारने बंधनात ठेवले. 1990 नंतर खाजगी एफ.एम.ला परवानगी देण्यात आली मात्र, फक्तगाणी वाजविण्यासाठीच. त्यामुळे या माध्यमाची शक्ती शासकीय प्रचार आणि रंजन यापलिकडे वापरलीच गेली नाही.
1959 नंतर चित्रवाणीचा ( टेलिव्हिजन) उदय झाला. या माध्यमालाही प्रारंभी सरकारी बंधनात ठेवले गेले, 1990 नंतर अचानक मुक्त करण्यात आले .आता 400 बातम्यांच्या आणि इतर 500 अशा एकंदर 900 पेक्षा अधिक चित्रवाहिन्या आहेत. बहुराष्ट्रीय कंपन्यांनी या क्षेत्रावर कब्जा केला आहे. जाहिरातींसाठी वाटेल त्या तडजोडी केल्याने यातील बहुतांश वाहिन्या पाश्चिमात्य संस्कृती लादण्यातच धन्यता मानत आहेत.
1990 नंतर इंटरनेट व त्यानंतर समाज माध्यमांचा ( सोशल मिडिया ) उदय झाला. प्रत्येक भारतीय माणूस फेसबुक, व्हॉटसअप, व्टिटर, यू टयूब किंवा इतर कोणत्या तरी समाज माध्यमाचा भरपूर वापर करतो आहे.या माध्यमातून कोनलाही लिहिता  येते, मते, चित्रे, व्हिडिओ पाठविता येतात. या माध्यमाच्या अमर्याद शक्तीचा समाजहितासाठी सकारात्मक वापर करण्याऐवजी, व्देष, जातीयता, हिंसक विचार पसरविण्यासाठी या माध्यमाचा वापर अधिक होतो आहे. या माध्यमांचे मालक हे परदेशात असल्याने यातील मजकुरावर प्रतिबंध घालता येईल असे सशक्त कायदेच उपलब्ध नाहीत.
मोबाईलच्या माध्यमातून नवे डिजिटल माध्यम आता अवतरत आहे. उद्याचे भविष्य हे मोबाइलभोवतीच फिरणारे असणार आहे. सिनेमापेक्षा टीव्हीचा पडदा छोटा म्हणून त्याला घोटा पडदा म्हटले जायचे, त्याहीपेक्षा छोटया मोबाईलच्या पडदयावर आता जग सामावले जात आहे. वेब सिरिजने पुढच्या काळाची चुणुक दाखवायला सुरुवात केली आहे. यापुढच्या काळातील माध्यमांचे अंतरंग हे अधिक संकुचित , अधिक भयावह असेल अशीच शक्यता आहे.
बडया भांडवलदारांच्या आणि जाहिरातदारांच्या कचाटयात माध्यमे जाऊ नयेत अशी महात्मा गांधी आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची इच्छा होती. पहिल्या आणि दुस-या वृत्तपत्र आयोगांनीही यासाठी अनेक सुधारणा सुचविल्या व त्यानुसार सरकारनेही काही कायदे केले. मात्र या कायद्यांना बडया माध्यम समूहांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. न्यायालयाने सरकारने केलेले कायदे रद्द ठरविले. त्यामुळे भारतातील माध्यमांतील गळेकापू स्पर्धेला मोकळे रान मिळाले. बडे उद्योजक अथवा राजकारणी हेच माध्यम सम्राट बनले. छोटी वृत्तपत्रे, वाहिन्यांना गिळंकृत करीत, आठ - दहा माध्यम सम्राटांनी आपल्या साम्राज्याचा प्रचंड विस्तार केला. या माध्यम सम्राटांच्या हाती 70 टक्के माध्यमे आहेत आणि 90 टक्के जनतेचा कब्जा त्यांनी मिळविला आहे. या माध्यम सम्राटांनी माध्यमांच्या मूळ उद्देशांना आणि नैतिकतेला तिलांजली दिली आहे. त्यामुळे आजच्या माध्यमांचे अंतरंग खूपच वेगळे आहे. जनहिताचा विचार करुन माध्यमे समाजप्रहरी म्हणून  कार्य करतील या भाबडया आशावादाला आता अर्थ राहिलेला नाही.  माध्यमांमधून दिल्या जाणा-या बातम्यांची विश्वासार्हता केव्हाच हरवलेली आहे. त्याउलट माध्यमांव्दारे दिल्या जाणा-या खोटया बातम्या ओळखणे हेच मोठे आव्हान बनले आहे. ही माध्यमे आता जनतेसाठी नव्हे तर बडया राजकारण्यांसाठी, जाहिरातदारांसाठी काम करीत आहेत. पैशांसाठी मिंधे होऊन फेक न्यूज आणि पेड न्यूज देणा-या या माध्यमांकडे आता समाज बदलण्याची शक्ती राहिलेली नाही . त्यामुळे जनतेला रंजनाच्या मोहपाशात गुंग ठेवण्याचे काम ही माध्यमे करीत आहेत. अशा या विपरित परिस्थितीत अजूनही आशेचा एक किरण आहे, तो म्हणजे जनहितासाठी निष्ठापूर्वक कार्य करणारे मोजके पत्रकार. माध्यमांनी संधी दिली नाही तरी ब्लॉगव्दारे, समाज माध्यमांव्दारे सत्य जनतेपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न ते करीत आहेत. अशा वेळी सर्वसामान्य माणसाला मात्र सांगावेसे वाटते की जागा राहा रात्र माध्यमांची आहे, त्यांच्यावर विसंबू नकोस;खरे काय ते तूच पारखून घे.

(मुंबई येथून प्रकाशित झालेल्या चैत्र पालवी माध्यम विशेष अंकात माध्यमांचे अंतरंग हा  लेख प्रसिध्द झाला आहे.)

छायाचित्र पत्रकारिता (फोटो जर्नलिझम)

छायाचित्र पत्रकारिता (फोटो जर्नलिझम)   हा पत्रकारितेचा एक विशेष प्रकार आहे. छायाचित्राच्या मदतीने बातमी वाचकापर्यंत पोहोचविणे याला छायाचि...