Sunday, April 23, 2023

महाराष्ट्रातील तरुण पिढीचे भवितव्य कंत्राटदारांच्या कचाटयात

 एक आदमी रोटी बेलता है

एक आदमी रोटी खाता है

एक तीसरा आदमी भी है

जो न रोटी बेलता है, न रोटी खाता है

वह सिर्फ़ रोटी से खेलता है

मैं पूछता हूँ--

'यह तीसरा आदमी कौन है ?'


कवी धूमिल यांनी एका कवितेतून संसदेला विचारलेला हा प्रश्न आता महाराष्ट्र सरकारला विचारण्याची वेळ आली आहे. कारण आता महाराष्ट्रातही  या तिस-या व्यक्तीचा प्रवेश होतो आहे. शासनाने विविध खात्यात नोकरभरती जाहीर करावी आणि तरुण पिढीने त्या नोक-या मिळवाव्या हे अपेक्षित असते, मात्र आता कंत्राटदार या तिस-या पात्राच्या हाती  सारी सूत्रे सोपविली जात आहेत. सरकारी नोक-यांचे खाजगीकरण केले जात असल्याने , त्याचे भयंकर चटके तरुण पिढीला सोसावे लागणार आहेत. केंद्रीय कामगार मंत्राालयाच्या शासकीय अहवालानुसार सध्या महाराष्ट्रात बेरोजगारांची संख्या 38 लाखांपेक्षा अधिक आहे.त्यात पुरुष बेरोजगार 28 लाख 56 हजार , महिला बेरोजगार 9 लाख 44 हजार आणि ट्रान्सजेंडर बेरोजगार 230 आहेत. बेरोजगारांची आकडेवारी मोजण्याची पध्द्तीही सदोष आहे, अनेक बेरोजगार नोंदही करीत नाहीत. हे  विचारात घेतल्यास एकट्या महाराष्ट्रात एक कोटीपेक्षा अधिक बेरोजगार असू शकतात. 20 ते 30 वयोगटातील आजूबाजूच्या तरुण पिढीकडे पाहिल्यास 10पैकी केवळ 3 जण कंपन्या किंवा इतरत्र नोकरीस असलेले दिसतात.

 सरकारी नोकरभरती बारा वर्षांंपासून बंदच असल्याने सरकारी कार्यालयात आधीपासूनच कंत्राटी पध्द्तीने कर्मचारी नेमून कामे करुन घेतली जात आहेत. 12 ते 25 हजाराच्या तुटपुंज्या पगारावर दहा -बारा वर्षापासून काम करणारे असे कंत्राटी कर्मचारी, यावर्षी कामावर घेतात की नाही या भीतीसह दरवर्षी मुलाखतीला सामोरे जातात.. त्यांना आजवर निदान सरकारर्तर्फे कंत्राटी  म्हणून नेमले जात होते, आम्ही सरकारी नोकरीत आहोत असे ते म्हणू शकत होते. मात्र आता त्यांना सरकार नव्हे तर कंत्राटदार नेमणूकपत्र देणार आहे. म्हणजे त्या कंत्राटी कर्मचा-यासाठी आयुक्तापेक्षाही कंत्राटदार हा मोठा आणि मालक असणार आहे. 

.सरकारी नोकरांचा पगार आणि पेन्शन याचा अर्थव्यवस्थेवर मोठा भार अहे, त्यामुळे विकासकामांसाठी पैसा पुरत नाही हे कारण पुढे करुन सरकारी नोक-यांच्या खाजगीकरणाचा मार्ग सरकारने स्वीकारला आहे.कंत्राटदारामार्फत नोकरदार नेमल्याने राज्य शासनाच्या खर्चात 20 ते 30 टक्के बचत होईल असा दावा  सरकारतर्फे  केला जात आहे. विविध खात्यातील 75 हजार जागा या कंत्राटदारांमार्फत भरल्या जाणार असल्याचे राज्य शासनाने जाहीर केले आहे. 


महाराष्ट्र राज्यात शासकीय, निमशासकीय कार्यालयांमध्ये यापुढे पाच वर्षात भरली जाणारी 136 प्रकारची पदे नऊ खाजगी संस्थाव्दारे कंत्राटी पध्द्तीने भरण्यात येणार आहेत. हा शासन निर्णय 14 फेब्रुवारी 2023 रोजी  जाहीर करण्यात आलाआहे. त्यामुळे कोणत्याही शासकीय आणि निमशासकीय कार्यालयाला आता या कंत्राटदार संस्थाच्या मार्फत कंत्राटी नोकरभरती करावी लागणार आहे. आधीच बेकार्रीने गांजलेल्या महाराष्ट्रातील  तरुण पिढीचे भवितव्य कंत्राटदारांच्या हवाली करण्याचा हा निर्णय आहे. 



देशात आणि महाराष्ट्रात आजवर  जिथे -जिथे कंत्राटी पध्द्तीने नोक-या दिल्या गेल्या , तिथे-तिथे कंत्राटी कर्मचा-यांची पिळवणूकच झाली आहे. यात सर्व फायदा कंत्राटदारांनी लाटला आहे. महाराष्ट्रात महामार्ग तयार करण्याचे काम कंत्राटदारांना देण्यात आले, त्याथून काही रस्ते चांगले झाले, मात्र कंत्रटदारांनी दहापट वसुली करुनही टोल बंद होण्याऐवजी टोलचे दर वाढत आहेत. सर्वसामान्य माणूस त्यात भरडला जात आहे.  कंत्राटी नोकरभरतीत  यापेक्षा काही वेगळे घडेल अशी अपेक्षा करुन उपयोग नाही. विविध खात्यातील 75 हजार जागा या कंत्राटदारांमार्फत भरल्या जाणार असल्याचे राज्य शासनाने जाहीर केले आहे. 




महाराष्ट्र शासनाने चार संवर्गात या कंत्राटी पदांची वर्गवारी केली आहे ती खालीलप्रमाणे. 


कामाचे स्वरुप

पदाचा प्रकार 

पात्रता

अनुभव 

पगार 

अकुशल 

शिपाई , हेल्पर, स्वीपर इ. 

अट नाही  

एक ते दोन  वर्षे

25,000/- ते 28,800/- 

अर्धकुशल 

सुतार , माळी , स्टोअर असिस्टंट इ. 

बारावी

किमान दोन वर्षे 

25, 000/- ते 32 ,800/-

कुशल 

ग्रंथपाल , जनसंपर्क अधिकारी , निरीक्षक इत्यादी 

पदवी व तत्सम 

किमान 1 ते पाच वर्षे 

27.500/- ते 71 , 000/-

अतिकुशल 

शिक्षक, अधीक्षक, अभियंता,  लेखापाल, मिडिया एक्सपर्ट इत्यादी 

पदवी, बीई

पाच ते वीस वर्षे

27500 ते 2,92,000/-



 ही एकंदर 75, 000 पदे भरण्यासाठी निवडण्यात आलेल्या कंत्राटदार संस्थांची नावे खालीलप्रमाणे आहेत.  

  1.  ॲक्सेस टेक सर्व्हिसेस लि.

  2. सीएमएस आयटी सर्व्हिसेस प्रा. लि., 

  3. सीएससी ई गव्हर्नन्स सर्व्हिसेस इंडिया लि

  4. इनोवेव आयटी इन्फ्रास्ट्रक्चर लि.

  5. क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिसेस प्रा. लि., 

  6. एस-२ इन्फोटेक इंटरनॅशनल प्रा. लि.

  7. सैनिक इंटेलिजन्स सिक्युरिटी प्रा. लि.,

  8. सिंग इंटेलिजन्स सिक्युरिटी सर्व्हिसेस प्रा. लि., 

  9. उर्मिला इंटरनॅशनल सर्व्हिसेस प्रा. लि.

या कंपन्या कोणाच्या मालकीच्या आहेत  , त्यांची कार्यपध्द्ती कशी आहे हे प्रश्न तूर्त बाजूला ठेवले तरीही या कंत्राटदारांच्या हाती सोपविल्या जाणा-या तरुण पिढीचे भवितव्य धोक्यात आहे हे उघड सत्य आहे . सरकारी नोकरी आता विसरा हाच एकमेव अर्थ  यातून निघतो.

कंत्राटदारामार्फत का होईना आम्ही नोक-या देतोय असा दावा यासंदर्भात केला जात आहे..मात्र मागील बारा वर्षात सरकारी नोकरभरती न झाल्याने बेकारांची संख्या खूप वाढली आहे. वयोमर्यादा संपून अनेकांचे सरकारी नोकरीचे स्वप्न पूर्णत्वास जाणे अशक्य झाले आहे. एक-दोन वर्षांनी नोकरीची वयोमर्यादा वाढविणे हा यावरचा उपाय नाही. कंत्राटीकरणामुळे  नोकरदारास कायम नोकरीची कुठ्लीही हमी राहणार नाही, त्याची नोकरी कायम कंत्राटी राहील, तो अनुभव इतर नोकरीस पात्र धरला जाणार नाही. कंत्राटदार नोकरदारास कधीही नोकरीवरुन काढू शकेल, त्याबाबत कोठे दादही मागता येणार नाही.  सरकारी नोकर जे काम करतात त्यापेक्षा अधिक काम कंत्राटी कर्मचा-यांना जवळपास  निम्म्या वेतनावर करावे लागणार आहे. जेवढे दिवस काम केले तेवढ्याचाच पगार मिळैल. हक्काच्या सुट्या , रजा, भत्ते, पदेान्नती यासारख्या सवलती हद्द्पार होणार आहेत. कंत्राटदार या कर्मचा-यांचे मालक होतील, त्यांनी कमी पगार दिला, पिळवणूक केली तरी साधी तक्रारही करता येणार नाही. पगारवाढ हा शब्दच विसरावा लागेल. पेन्शन, ग्रॅच्युइटी याचे तर नावही काढता येणार नाही.  कंत्राटदार आरक्षण आणि गुणवत्ता यासारख्या नियमांचे पालन करतील असे म्हणणे धाडसाचे ठरेल. याशिवाय कायम नोकरी नसल्याने कंत्रटी कर्मचा-यांचे  लग्न होऊ शकणार नाही, नैराश्याच्या गर्तेत तरुण पिढी सापडेल यासारख्या सामाजिक समस्याही निर्माण होतील. वर्षभर कुठलीही सुटी न घेता शेतात राबणारा शेतकरी शेतीमालास भाव न मिळाल्याने जसा हवालदिल होतो आणि व्यापारी काही तासात फार्से श्रम न करता मालामाल होतो.,  तसे यात कंत्राटी कर्मचारी  वेठबिगारांसारखे राबतील पण, कंत्राटदार मात्र मालामाल होतील. 

महाराष्ठ्रतील बेरोजगारांची संख्या लक्षात घेता 75 हजार नोक-या नगण्य आहेत.  या सरकारी नोक-यात आरक्षण मिळावे यासाठी  विविध जाती संघटना आरक्षणाची मागणी करीत लाखोंचे मोर्चे काढीत आहेत आणि आपसात भांडत आहेत.  आता सरकारी नोक-याच नाहीत , हे वास्तव कोणी लक्षात घेत नाही. 


विशेष म्हणजे जेव्हा हा शासन निर्णय जाहीर  झाला तेव्हा विरोधी पक्षाच्या काही नेत्यांनी त्यास वरवरचा विरोध दर्शविला. मात्र तुम्ही सत्तेत असताना घेतलेला निर्णय आम्ही अमलात आणीत आहोत असे सरकारतर्फे सांगताच सारे चिडीचूप झाले.सरकार कोणत्याही पक्षाचे असो,  धोरणे तीच असणार हाच याचा अर्थ आहे.  एरवी साध्या - साध्या  प्रश्नावर आंदोलने करणा-या एकाही  विद्यार्थी संघटनेने याबाबत साधी प्रतिक्रीयाही नोंदविलेली नाही हे विसेष आहे. सरकारी नोकरांच्या कर्मचारी संघटना कायम पेन्शनच्या आश्वासनात दंग आहेत, आपलीच लेकरे असणा-या तरुण पीढीचे भवितव्य आपण नासवतोय याचे भान कोणालाच नाही. एकंदर तरुण पिढीसमोर असलेल्या खाजगीकरणाच्या आणि कंत्राटी नोकरीच्या संकटाला कोणीही वाली नाही. तरुण पिढीने आता स्वप्ने तरी कशी पाहायची , एक भयाण वास्तव त्यांना गिळंकृत करण्यासाठी वाट पाहते आहे. 

( यातील काही भाग दिव्य मराठीच्या दिनांक 23 एप्रिल 2023 च्या अंकात प्रकाशित झाला आहे. )



Saturday, May 2, 2020

छायाचित्र पत्रकारिता (फोटो जर्नलिझम)


छायाचित्र पत्रकारिता (फोटो जर्नलिझम)  हा पत्रकारितेचा एक विशेष प्रकार आहे. छायाचित्राच्या मदतीने बातमी वाचकापर्यंत पोहोचविणे याला छायाचित्र पत्रकारिता म्हणतात . सामान्य पत्रकारितेमध्ये बातमी केवळ भाषा आणि शब्दांद्वारे संकलित केली आणि प्रकाशित केली जाते. मात्र छायाचित्रांच्या माध्यमातून आपल्या बातम्या किंवा बातम्यांची कथा वाचकांपर्यंत पोहोचविल्यास त्या अत्यंत प्रभावी ठरतात.छायाचित्राच्या माध्यमातून जो पत्रकारिता करतो त्याला छायाचित्र पत्रकार म्हणतात. प्रसिध्द छायाचित्र पत्रकार रघु राय यांच्या मते “एखादया प्रसंगाच्या पाठीमागे असणारे सत्य छायाचित्राच्या माध्यमातून जो प्रखरपणे पुढे आणतो तोच खरा छायाचित्र पत्रकार होय”.घटना सोपी करुन सांगणे हा संज्ञापनाचा मूळ हेतू असतो. शब्दांपेक्षा दृश्य माध्यमातून संज्ञापन अधिक प्रभावीपणे साधता येते. म्हणूनच वृत्तपत्रात बातम्यांबरोबर छायाचित्रांचा वापर केला जातो. छायाचित्रांप्रमाणेच व्यंगचित्र, नकाशा, आलेख, रेखाटन, कल्पनाचित्रे आदींचा वापर करुन संज्ञापन साधले जाते.
छायाचित्र पत्रकारितेसाठी पत्रकारितेची दृष्टी असलेला छायाचित्रकार आवश्यक असतो. कोणत्याही घटनेचा सर्वांत महत्त्वाचा, नेमका क्षण कॅमेऱ्याने टिपणे यातच त्याचे कौशल्य असते.वृत्तपत्रात छायाचित्र प्रसिद्ध करताना त्याच्या तांत्रिक गुणवत्तेपेक्षा त्यातील पत्रकारिता-मूल्यास अधिक महत्त्व दिले जाते. प्रसिद्धीसाठी निवड करताना छायाचित्र बातमीला पूरक आणि छापण्यायोग्य असावे, अशी अपेक्षा असते. त्याखेरीज ते बनावट, दिशाभूल करणारे, न्यायालयीन कारवाई ओढवून घेणारे, वाचकावर विपरीत परिणाम करणारे, हीन अभिरुचीचे असू नये, असे काही निकषही पत्रकारितेत मानले जातात.
एखादा छायाचित्र पत्रकार शब्दांऐवजी फोटोंच्या माध्यमातून आपली बातमी / दृष्टिकोन / कथा / माहिती देतो. म्हणूनच, छायाचित्र पत्रकार एक कुशल छायाचित्रकार असणे आवश्यक आहे, परंतु छायाचित्र पत्रकार केवळ छायाचित्रकार नसतो. फोटोंच्या माध्यमातून सांगायचं असलं म्हणून पत्रकाराची शोधक दृष्टी त्याच्याकडे असणंही महत्त्वाचं आहे.

 जगभरात गाजलेली काही छायाचित्रे

1)छायाचित्र कला हीसुद्धा विविध दृश्य आपल्या कॅमेऱ्यात पकडते आणि ती क्षणचित्रे छायाचित्रकार साकार करतो. छायाचित्रकला ही एक कला नव्हेच , असा एक युक्तिवाद पूर्वी केला जात असे. एखादे दृश्य निवडायचे, चौकटीत आणायचे आणि फोटो घ्यायचा, यात कला कुठे आहे? ते केवळ एक तंत्र आहे असेच म्हटले जात असे; परंतु जेव्हा आशय आणि दृष्टिकोन भरलेली छायाचित्रे छायाचित्रकार साकारू लागले तेव्हा जगाला यातील कलेचा साक्षात्कार होऊ लागला. याचे उत्तम उदाहरण प्रसिद्ध लेखक पत्रकार अनिल अवचट यांच्याफोटोग्राफीया लेखात वाचायला मिळते.
       महायुद्धातले अनेक फोटो पाहिले; पण एका फोटोने मन जसे चरचरले तसे दुसऱ्या कशाने नव्हते. मुख्य म्हणजे तो  फोटो  युद्धभूमीवरचा नव्हताच. युद्धकाळातलाही नव्हता. युद्धानंतर काही वर्षानी विशिष्ट बटालियनमधले लोक एकत्र आले, त्याचा एक ग्रुप फोटो होता. काहीजण खुर्चीत बसलेले, कोणी मागे उभे, असा तो टिपिकल ग्रुप फोटो.फोटोतल्या माणसांना कुणाला हात नाही, कुणाला पाय नाही, कुणाचा जबडा  फाटलेला, कुणाच्या गमावलेल्या डोळ्यावर कायमची काळी पट्टी चढलेली. माणसे जशी आपल्याला छत्र्या घेऊन फोटोला त्याकाळात बसायची, तसे इथे फक्त छत्र्याच्या जागी वेगवेगळ्या प्रकारच्या कुबड्या ठेवलेल्या. मागची इमारत छान चिरेबंदी, पुढे हिरवळ बाकी सगळे व्यवस्थित. फक्त हे असे आणि मुख्य म्हणजे फोटो काढताना ते हसत होते, युद्धाच्या परिणामाविषयी वेगळे भाष्य करण्याची गरजच नाही. तो फोटो युद्धावरच्या फोटोच्या संग्रहातला होता.तो फोटोग्राफरने परिस्थिती दाखवण्यासाठी, रूढ मार्गाने जाता अगदी वेगळ्या तऱ्हेने दाखवून आपली निवड केली होती.”
2) अफगाण –पाकिस्तान सीमेवर निर्वासितांच्या अनेक छावण्या होत्या. 1984 मध्ये छायाचित्र पत्रकार स्टीव्ह मॅककुरी यांना नॅशनल जिओग्राफिकने अफगाण-पाकिस्तान सीमेवरील निर्वासित छावण्यांचे फोटो काढण्यासाठी निमंत्रित केले. त्यांनी पेशावरच्या बाहेर छावण्या पाहिल्या .नासिर बागच्या छावणीत मॅककुरीला मुलींचा शाळा म्हणून उभारलेला तंबू सापडला ज्यामध्ये पंधरा मुली शिकत असत. त्यात हिरव्या डोळ्यांच्या एका मुलीला त्याने पाहिले.मॅककुरी यांनी ही आठवण सांगताना लिहिले आहे : “मी या तरूणीला शोधले. ती फक्त बारा वर्षांची होती. ती खूपच लाजाळू होती आणि मला वाटलं की मी इतर मुलांचे छायाचित्र प्रथम काढले तर ती सहमत होण्याची शक्यता जास्त आहे. मला वाटते की तिच्याविषयी मी जशी उत्सुक होती तशीच तिलाही होती, कारण तिचे कधीच छायाचित्र घेतले नव्हते आणि तिने कॅमेराही कधीच पाहिला नव्हता. काही क्षणांनंतर ती उठली आणि निघून जाऊ लागली. पण एका क्षणात तिने मागे वळून पाहिले तो क्षण मी टिपला - तिच्या डोळ्यातील प्रकाश, पार्श्वभूमी आणि अभिव्यक्ती. यामुळे छायाचित्र अजरामर झाले. ” विसाव्या शतकातील सर्वात गाजलेले छायाचित्र म्हणून ते ओळखले गेले.

हे छायाचित्र युद्धग्रस्त देशांमधील मुलांचे दुःख आणि सामान्य लोकांवर अशा संघर्षाचे वास्तविक परिणाम दर्शवते. नॅशनल जिओग्राफिकच्या जून 1985 च्या अंकाच्या मुखपृष्ठावर हे छायाचित्र प्रसिध्द झाले. नंतर अनेक वर्षानंतर त्या मुलीचे नाव शरबत गुल असल्याचे समजले.  
                                                                                                                                                
4)सीरियातील यादवीला कंटाळून सप्टेंबर 2015 मध्ये जीव मुठीत धरुन अब्दुल्ला कुर्दी याचे कुटुंब कॅनडाला जाण्यासाठी साध्या बोटीतून निघाले होते. मात्र हा एजियन समुद्रातच बोट उलटून त्याचा आयलान या मुलाचा मृत्यू झाला. अगदी तीन वर्षाच्या आयलान कुर्दी या मुलाचा लाल टी शर्ट व निळ्या चड्डी घातलेला मृतदेह वाहून किनाऱ्याला आला. निलोफर डेमीर यांनी काढलेले आयलानचे छायाचित्र  जगभरात अनेकांचे काळीज पिळवटणारे ठरले. या अपघातात अब्दुल्ला यांनी आयलानसह, गालेब या चार वर्षांच्या मुलासह पत्नीला गमावले आहे.








Sunday, February 23, 2020

व्हाटस ऍपचे तरुणाईवर गारुड

संदेशाची देवाण - घेवाण करण्यासाठी जगभरात आणि विशेषतः भारतात सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या व्हाटस ऍपचा प्रारंभ झाला त्या घटनेला दिनांक 24 फेब्रुवारी 2020 रोजी अकरा वर्षे पूर्ण होत आहेत. या अकरा वर्षाच्या वाटचालीमध्ये भारतीय तरुण पिढीवर गारुड घालण्याचे काम केले आहे व्हाटस ऍप ने जगभरात लोकप्रियता मिळविली त्याचबरोबर त्याला टीकेचे धनी देखील व्हावे लागले आहे. व्हाटस ऍपचा च्या या वाटचालीचा लेखाजोखा मांडण्याचा प्रयत्न येथे केला आहे
व्हाटस ऍपचा हे फेसबुक, व्टिटर सारखे समाज माध्यम Social Media) नाही. व्हाटस ऍप हे संदेशाची देवाण - घेवाण करणारे (Instant Messaging App) ॲप आहे. मात्र त्याला अनेकजण समज माध्यम असेच मानतात. गमती गमती मध्ये व्हाटस ऍप ची निर्मिती झाली,  त्याची कथा मोठी रंजक आहे. जॉन कॉम हा युक्रेनमधील एक तरुण गरिबीने गांजलेला होता, तो एका दुकानांमध्ये  काम करायचा. नंतर त्यांने अमेरिकेमध्ये जाऊन याहू या कंपनीमध्ये काळ काम केले. तेथे अमेरिकेतील ब्रायन अॅक्टन यांच्यासमवेत त्याची मैत्री झाली. त्या काळात जॉन कॉमने एक आयफोन विकत घेतला होता. जॉन कॉम  प्रत्येक आठवडयात आपल्या मित्रमंडळींना गप्पा-टप्पा, भोजनासाठी निमंत्रित करायचा. त्यावेळी त्याला सहज संदेश पाठवता येणारे एखादे ऑप असावे अशी गरज वाटू लागली. त्यावेळी जॉन कॉम, ब्रायन ऍक्टन आणि काही सहका-यांनी व्हाटस ऍपचा चा शोध लावलाइंग्रजीत बोलताना एकमेकांना काय चालले आहे हे विचारण्यासाठी ‘What’s up’ असे विचारले जाते. त्यारुनच या ऍपला त्यांनी व्हाटस ऍप नाव दिले.  पाहता पाहता व्हाटस ऍप जगभरात लोकप्रिय झाले, 2013 पर्यंत त्याचा वापर करणाऱ्या लोकांची संख्या वीस कोटी पेक्षा अधिक वाढली. त्यावेळेला जगभरातील अनेक मोठया कंपन्यांचे लक्ष त्याकडे वेधले गेले आणि त्यांनी व्हाटस ऍप खरेदी करण्याचा प्रयत्न केला.  मार्क झुकरबर्ग यांच्या फेसबुकने कंपनीने 14 फेब्रुवारी 2014 रोजी 1182 मिलियन डॉलर एवढी मोठी किंमत देऊन  व्हाटस ऍप विकत घेतले. व्हाटस ऍपला फेसबुक मध्ये विलीन न करता त्याचे स्वतंत्र अस्तित्व त्यांनी कायम ठेवले. आज घडीला जगभरात 180 देशांमध्ये व्हाटस ऍपचे दीड अब्ज पेक्षा अधिक वापरकर्ते आहेत. 50 कोटी लोक दररोज व्हाटस ऍप स्टेटस चा वापर करतात, तर सहा कोटी 50 लाख लोक व्हाटस ऍपचा व्दारे संदेश पाठवतातव्हाटस ऍपचा व्दारे 53 भाषांमध्ये संदेशाची देवाणघेवाण होऊ शकते. दररोज व्हाटस ऍपचा वापर करुन सरासरी 4300 कोटी संदेश एकमेकांना पाठविले जातात. एकटया भारतात 40 कोटींपेक्षा अधिक लोक व्हाटस ऍपचा वापर करतात, ही संख्या जगातील कोणत्याही देशातील सर्वाधिक आहे. भारतीय तरुणाईवर तर व्हाटस ऍपने अक्षरशः गारुड घातले आहे. भारतातील तरुण पिढी पिढीने आपापल्या भाषेत व्हाटस ऍप द्वारे संदेशाची देवाणघेवाण करण्याची एक नवी परिभाषा निर्माण केली आहे.
जगभरातील दीड अब्ज लोकांची पसंती असलेल्या व्हाटस ऍपचा कारभार हा फार अवाढव्य असेल व त्यासाठी फार मोठी यंत्रणा लागत असेल असे आपल्याला वाटू शकते. मात्र केवळ 50 अभियंते आणि 55 कर्मचारी व्हाटस ऍपने या कामासाठी नेमलेले आहेत.
व्हाटस ऍपच्या लोकप्रियतेच्या कारणांचा शोध घेतला असता जाणवते की,  संदेशाची देवाण-घेवाण ही सहज व मोफत होते, ती जगभरात व क्षणार्धात होते. व्हाटस ऍपचा वापर परस्पर संवादासाठी, संदेश, छायाचित्रे, ध्वनिफीत, व्हिडिओ पाठवण्यासाठी करता येतो. व्हाटस ऍप वर कोणत्याही प्रकारच्या जाहिराती नसतात. लोकप्रियता मिळविण्यासाठी व्हाटस ऍप ने स्थापनेपासून कधीही एक रुपयाची देखील जाहिरात केली नाही अथवा जनसंपर्क साधण्याचा देखील प्रयत्न केलेला नाही. व्हाटस ऍप ने आपल्या वाटचालीमध्ये वापरकर्त्यांना अधिकाधिक सुविधा देण्याचा प्रयत्न केला आहे. ऑडिओ-व्हिडिओ पाठविणे,  संदेश जर चुकलेला असेल तर तो डिलीट करणे, व्हाटस ऍपचा बिजनेस, अगदी अलीकडच्या काळामध्ये भारतात व्हाटस ऍपचा वापर पैशांची देवाणघेवाण करण्यासाठी देखील करता येईल अशी सुविधा निर्माण करण्यात आलेली आहे.
भारतीय समाजातील विविध समाजघटकांसाठी व्हाटस ऍपचे अनेक फायदे दिसून आलेले आहेत. शेतकऱ्यांना हवामानाचीबाजार भावाची, नवीन उपकरणांची माहिती उपलब्ध होते. उदयोजकांना शेअरबजार, नवे नियम यांची माहिती मिळते. सेवाभावी संस्था ग्रामस्थांना व्हाटस ऍप द्वारे संदेश पाठवून विधायक कार्यामध्ये सहभागी करून घेतात, काही रुग्णांना परदेशातून डॉक्टरांचा सल्ला मिळतो, पुराच्या परिस्थितीत अथवा दुष्काळाच्या परिस्थितीत अनेक नागरिक पुढे येऊन मदत करतात अशी अनेक उदाहरणे आहेत.
कोणतेही तंत्रज्ञान मुळामध्ये वाईट नसते त्यामुळे व्हाटस ऍप हे वाईट आहे असे म्हणता येणार नाही. मात्र वापर करणाऱ्यांना जर ते वाईट उद्देशाने वापरले तर त्याचे दुष्परिणाम सर्वांना भोगावे लागतात. इस्त्राईल  मधील एन.एस.ओ. गटाने हल्ला करून जगातील चौदाशे मानवाधिकार कार्यकर्ते, पत्रकार, नागरिक यांची माहिती चोरली होती अशी गंभीर घटना 2019 मध्ये घडलेली आहे. व्हाटस ऍपच्या माध्यमातून भारतात खोटया बातम्या पसरवण्याचे अनेक प्रकार मागील काही वर्षांत झाले आहेत. अशा खोटया संदेशामुळे जमावाकडून लोकांना जीवे मारण्यात आल्याच्या घटनाही घडल्या आहेत. अशाच एका घटनेमध्ये सोलापूरच्या मंगळवेढा परिसरातील पाच नागरिकांना धुळे जिल्ह्यातील साक्री येथे जमावाने ठार केले. भारतातही इतर ठिकाणीही अशा घटना घडलेल्या आहेत. एखादया व्यक्तीला बदनाम करण्यासाठी देखील व्हाटस ऍपचा वापर होतो. अलीकडच्या काळामध्ये सोलापूर- पुणे रस्त्यावर असलेल्या कुरकुंभ एमआयडीसी मध्ये मोठी आग लागलेली आहे अशी खोटी बातमी व्हाटस ऍप द्वारे फिरत होती, त्यामध्ये तसा व्हिडिओदेखील जोडलेला होता. अशा अनेक गोष्टी सातत्याने घडत आहेत.
व्हाटस ऍप ने देखील आपल्या परीने आपल्या सेवेमध्ये सुधारणा करण्याचे काही प्रयत्न केले आहेत, मात्र ते तोकडे आहेत. व्हाटस ऍप भारतीय तरुण पिढीवर एक गारुड निर्माण केले असले तरी या गारुडाच्या संमोहनात  किती काळ अडकून राहायचे याचा विचार तरुण पिढीने करण्याची गरज निर्माण झाली आहे. व्हाटस ऍप वरून दिली जाणारी माहिती किती उथळ स्वरुपाची असते याची अनेक उदाहरणे आहेत. व्हाटस ऍप व्दारे आलेल्या कोणत्याही माहितीवर अगदी पूर्ण विश्वास ठेवता येईल असे चित्र सध्या तरी नाही. तशी विश्वासार्हता निर्माण करण्या तसेच खोटया बातम्या आणि संदेश पसरविण्याच्या प्रकाराला आळा घालण्यात व्हाटस ऍपची यंत्रणा कितपत यशस्वी ठरते यावर व्हाटस ऍपचे भवितव्य अवलंबून आहे.

Saturday, December 7, 2019

व्यक्तिपूजा हूकूमशाहीकडे नेते


भारतीय समाजाचा, सामाजिक रचनेचा , भारतीयांच्या मानसिकतेचा संपूर्ण अभ्यास असणारी आणि त्यावर अचूक भाष्य करणारी एकमेव व्यक्ती म्हणजे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर होत. त्यांनी भारतासाठी अलोकिक कामगिरी केली आहे. 

आजच्या कोणत्याही राजकीय, सामाजिक, आर्थिक समस्येवरीलउत्तर त्यांच्या लेखनात सापडते. आजच्या काळातील राजकारणात पक्षनिष्ठेला दिली जाणारी तिलांजली, उबग आणणारा घोडेबाजार, विरोधकांची मुस्कटदाबी करणारी कपटनीती यावर त्यांनी अचूक आणि दिशादर्शक भाष्य केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी व्यक्त केलेल्या विचारांचे प्रत्येक भारतीयाने मंथन प्रत्येक भारतीयाने करण्याची गरज आहे असे प्रकर्षाने वाटते.
भारतातील प्रत्येक स्त्री – पुरुषाला घटनेतील तरतुदीनुसार देण्यात आलेला मतदनाचा आधिकार ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची मोठी देण आहे. अनेक प्रगत देशात मतदानाच्या अधिकारासाठी लोकांना व विशेषतः स्त्रियांना मोठा संघर्ष करावा लागला. मतदानाचा हा अधिकार किती महत्वपूर्ण आहे याविषयी डॉ आंबेडकर यांनी म्हटले आहे मत म्हणजे ईश्वराने दिलेल्या संजीवनी मंत्र आहे, त्याचा योग्य उपयोग केला तरच आपले संरक्षण होईल. स्वाभिमानी जीवनाचा तो एक तरणोपाय आहे, त्याची जोपासना करा. या दृष्टीने निवडणुकीचा विचार करा”. आजच्या काळात अधिक शिकलेले आणि श्रीमंत लोक मतदानासाठी बाहेरच पडत नाहीत. विशेष म्हणजे चांगले लोकप्रतिनिधी नाहीत असा गळा काढण्यात हेच लोक पुढे असतात.
निवडणुकीच्या काळात जे लोक प्रचार सभांचा धडाका लावून विमानाने फिरत सर्वत्र सभा घेतात त्यांच्याविषयी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भाष्य केले आहे. ते म्हणतात देशातील सरी जनता आपल्या मागे उभी आहे अशी फुशारकी व घमेंड मारणारे हे लोक विमानाने का उडतात? सारा देश घुसळून का काढतात?”. आजच्या काळात हे विधान अधिक मार्मिक आहे.
निवडून आल्यानंतर घोडेबाजारात विकले जाणाऱ्या लोकप्रतिनिधीनी विषयी आंबेडकर म्हणतात जो विकला जातो, लोभाला बळी पडतो, त्याचा काही उपयोग नाही”. लोककल्याण याच एकमेव भावनेने राजकारण केले गेले पाहिजे असे त्यांचे मत होते.
भारतीयांच्या मानसिकतेचा अभ्यास करुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी इशारा दिला होता की “राजकारणाच्या क्षेत्रात व्यक्ती पूजेला महत्त्व दिले जाऊ नये. इतर कोणत्याही देशाच्या राजकारणात दिसणार नाही इतक्या मोठया प्रमाणात भारतीय राजकारणात विभूतिपूजा दिसते. राजकारणात भक्ती किंवा व्यक्तीपूजा ही अधःपतन आणि अंतिमतः हुकूमशाहीकडे नेणारा हमखास मार्ग ठरतो”.
निकोप लोकशाहीत कोणत्याही पक्षाच्या हाती अनियंत्रित सत्ता असू नये असे स्पष्ट करताना डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणतात माझ्या मताप्रमाणे लोकशाहीच्या कामकाजासाठी फार महत्त्वाची बाब म्हणजे लोकशाहीच्या नावावर बहुमत वाल्यांनी अल्पमत वाल्यांवर जुलूम करता कामा नये. बहुमत वाले जरी सत्तेवर असले तरी अल्पमत वाल्यांना स्वतःबद्दल सुरक्षितता वाटली पाहिजे. अल्पमत वाल्यांची मुस्कटदाबी केली जाते किंवा त्यांना डावपेचाने मार दिला जातोय अशी अल्पमत वाल्यांची भावना होता कामा नये.
राजकारणही गाभीर्याने करण्याची गोष्ट आहे असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मानत. कोणाला राजकारणात यायचे असेल तर त्याने आधी भारतीय समाजाचा, अर्थकारणाचा अभ्यास केला पाहिजे. राजकारणी व्यक्तीने जनतेच्या पैशाचा कदापिही अपहार करु नये , तो पैसा लोककल्याणासाठीच वापरला गेला पाहिजे असे ते म्हणत. सरकारने राज्यकारभार कसा करावा याविषयी आंबेडकर म्हणतात कोणतेही सरकार जनहित किती पाहते याच्यावर त्याचे श्रेष्ठत्व अवलंबून असते. आपल्या देशात अनेक प्रश्न आहेत पण त्याहूनही महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे राज्यकारभार किती शुध्दतेने केला जातो. आपल्याकडील सगळ्यात महत्त्वाचा दोष कोणता असेल तर तो म्हणजे अशुद्ध व लाच बाजीने भरलेले राज्य शासन. राज्य शासन शुद्ध राखण्यासाठी काही बाहेरची मदत लागत नाही फक्त  ते शुद्ध राखण्याची इच्छा असली पाहिजे.
स्वातंत्र्य , समता आणि बंधुत्व या त्रिसूत्रीवर आधारित देशातील राजकीय, सामाजिक, आर्थिक व्यवस्था असावी. जातीधर्म विरहित सामाजिक विचार व्हावा, शुध्द हेतूने राजकारण केले जावे , राजकारणात घोडेबाजार होऊ नये, सक्षम विरोधी पक्ष असणे हे जिवंत लोकशाहीचे दयोतक आहे असे  असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मत होते. मात्र स्वातंत्र्यानंतर 72 वर्षे उलटून गेल्यावर आजही हे प्रत्यक्षात येवू शकलेले नाही. कोणताही पक्ष उमेदवार निवडताना त्याच्या मतदारसंघात त्याच्या जाती- धर्माचे किती मतदार आहेत , त्याची पैसा खर्च करण्याची ताकत किती आहे हे पाहूनच उमेदवारी देतो, निवडणुकीनंतर बहुमतासाठी होणारा घोडेबाजार ही नित्याचीच बाब झाली आहे. विरोधी पक्षांना संपविण्यासाठी सत्ताधारी पक्ष शासकीय यंत्रणा , न्यायसंस्थांना वेठीस धरीत आहेत. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेल्य मार्गाने राजकारण झाले  आणि लोकशाहीची जोपासना झाली तर आपला देश खरोखर बलशाली होईल .
 ( दिव्य मराठीत दिनांक 6 डिसेंबर 2019 रोजी प्रकाशित झालेला लेख )

महाराष्ट्रातील तरुण पिढीचे भवितव्य कंत्राटदारांच्या कचाटयात

  एक आदमी रोटी बेलता है एक आदमी रोटी खाता है एक तीसरा आदमी भी है जो न रोटी बेलता है, न रोटी खाता है वह सिर्फ़ रोटी से खेलता है मैं पूछता हूँ...