Friday, February 6, 2015

आर.के.लक्ष्मणः सामान्यांना बोलते करणारा असामान्य माणूस



 आर.के.लक्ष्मण यांच्याविषयी विचार करताना स्वानंद किरकिरेंच्या गाण्यातील हेच शब्द पुन्हा पुन्हा आठवत राहतात. आर. के. लक्ष्मण हा खरेच अ॑फाट माणूस होता, त्यांनी भारतात नवा इतिहास रचला. नाजूक कुंचल्याच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाला नायक बनविण्याची किमया त्यांनी करुन दाखविली. एखादया कसलेल्या गुप्तहेराप्रमाणे हा सामान्य माणूस हवा तिथे डोकावत असे. पंडित जवाहरलाल नेहरु, इंदिरा गांधी, मोरारजी देसाई, व्ही.पी.सिंह, अटलबिहारी बाजपेयी, लालकृष्ण अडवाणी ,बाळासाहेब ठाकरे, शरद पवार यांच्यासह अनेक राजकारण्यांच्या घरात, विविध मंत्रालयात, प्रसंगी परदेशातही हा सामान्य माणूस मुशाफिरी करीत असे. समाजातील, राजकारणातील व्यंगावर नेमके भाष्य करीत असे.
भारतात व्यंगचित्रे आणि व्यंगचित्रकाराला प्रतिष्ठा मिळवून देण्याचे ऐतिहासिक कार्य आर.के.लक्ष्मण यांनी केले. यापेक्षाही थक्क कारायला लावणारी बाब म्ह्णजे, सर्वश्रेष्ठ वृत्तपत्रापेक्षा व्यंगचित्र प्रभावी असू शकते, हे त्यांनी सिध्द करुन दाखविले. तब्बल पाच दशके टाईम्स ऑफ इंडियात त्यांची व्यंगचित्रे प्रसिध्द होत असत. तेव्हा लोक बातम्या वाचण्याआधी, आज आर.कें.नी कोणते व्यंगचित्र रेखाटले आहे ते पाहण्यासाठी धडपडत असत. टाईम्स ऑफ इंडियाने आपल्या वृत्तपत्राचा खप वाढविण्यासाठी आर.कें.च्या व्यंगचित्रांचे प्रदर्शन नवी दिल्ली येथे भरविले होते , यापेक्षा एखादया व्यंगचित्रकाराचा मोठा सन्मान असू शकत नाही.
आर.के.लक्ष्मण यांचे पूर्ण नाव होते रासीपुरम कृष्णस्वामी लक्ष्मण . 23 आक्टोबर 1921 रोजी म्हैसूर येथे त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील शाळेचे संचालक होते. मोठे बंधू आर.के. नारायण मोठे लेखक होते.आर.के.लक्ष्मण शाळेत शिकत असताना त्यांच्या घरी अनेक वृत्तपत्रे येत असत. त्यात छापून येणा-या व्यंगचित्रांपैकी, इंग्लंडमधील प्रख्यात व्यंगचित्रकार डेव्हीड लो यांच्या व्यंगचित्रांनी त्यांना विशेष प्रभावित केले. याच कालखंडात त्यांनी व्यंगचित्रे रेखाटायला सुरुवात केली.
आर.के.लक्ष्मण यांना मुंबईच्या जे.जे.स्कूल ऑफ आर्टसमध्ये महाविदयालयीन शिक्षण घेण्याची इच्छा होती. पण, त्यांची चित्रे तिथल्या प्राचार्यांना प्रभावशाली वाटली नाहीत, त्यामुळे त्यांनी प्रवेश नाकारला. त्यामुळे आर.कें.ना महाविदयालयीन शिक्षण म्हैसूर येथून पूर्ण करावे लागले. त्याविषयी आपल्या शैलीत भाष्य करताना आर.के.लक्ष्मण यांनी लिहिले आहे की, ‘’ बरे झाले मला जे.जे.स्कूल ऑफ आर्टमध्ये प्रवेश मिळाला नही. मी तिथे शिकलो असतो तर व्यंगचित्रकार झालोच नसतो. फार फार तर एखादया जाहिरात संस्थेत डासांची अगरबत्ती अथवा महिलांच्या सौंदर्य प्रसाधनांसाठी रेखाटने करीत बसलो असतो.’’
व्यंगचित्रे काढण्याचे अथवा चित्रकलेचे कुठलेही औपचारिक शिक्षण आर.के.लक्ष्मण यांनी घेतलेले नव्हते. व्यंगचित्र कला ही त्यांना उपजतच लाभलेली देणगी होती.काही वर्षे म्हैसूर येथील वृत्तपत्रात व्यंगचित्रे रेखाटण्याचे काम केल्यावर, ते मुंबईला फ्री प्रेस जर्नलमध्ये राजकीय व्यंगचित्रकार म्ह्णून रुजू झाले. तिथे बाळासाहेब ठाकरे त्यांचे सहकारी होते.पुढे टाईम्स ऑफ इंडियामध्ये त्यांचे आगमन झाले, 1957 साली ‘ यू सेड इट’ या दररोजच्या व्यंगचित्र मालिकेव्दारे ‘ कॉमन मॅन ‘ अवतरला. त्यानंतरची पाच दशके आर.के. लक्ष्मण यांच्या ‘कॉमन मॅन’ ने गाजविली. या कालखंडात आर.के.लक्ष्मण यांना  इंग्लंडच्या वृत्तपत्राकडूनही नोकरीची चांगली संधी देऊ करण्यात आली होती. त्यासाठी मोठा पगार, इंग्लंडमध्ये स्थाईक होण्याची सुविधा अशी आमिषेही दाखविण्यात आली. पण इंग्लडमध्ये जाण्यापेक्षा भारतातील बहुढंगी वास्तव मांडणे त्यांना अधिक मह्त्वाचे वाटले.
व्यंगचित्रातून एकाच वाक्यात ते अचूक आणि सडेतोड भाष्य करीत असत. व्यंगचित्राविषयी बोलताना ते म्ह्णत ‘ पूर्वी पंडित नेहरु, इंदिरा गांधी , मोरारजी देसाई यासह जे राजकारणी होते त्यांचे काहीन काही वेगळेपण होते.त्यामुळे त्यांची व्यंगचित्रे काढण्यात मजा होती. पण अलिकडच्या काळात लालूप्रसाद यादव आणि जयललिता हे दोन अपवाद वगळता सर्वांचे चेहरे सारखेच वाटतात.’
आणीबाणीच्या कालखंडात होणा-या अतिरेकाबाबत इंदिरा गांधीवर त्यांनी व्यंगचित्र रेखाटले, ते  त्यावेळी खूप गाजले होते. त्या काळात त्यांच्यावर मोठा दबाव टाकण्यात आला. अशा वेळी तडजोड स्वीकारुन काम करण्यास त्यांनी नकार दिला. ‘मी व्यंगचित्रकार आहे. मला अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य असलेच पाहिजे’ ही त्यांची भूमिका होती. त्या कालखंडात काही काळ ते मॉरीशस येथे वास्तव्यास गेले होते, निवडणुकीनंतरच ते परतले.
आर.के.लक्ष्मण यांना 94 वर्षाचे आयुष्य लाभले. या कालखंडात त्यांना अनेकदा आर्थिक ओढातान सहन करावी लागली. पण पैशाचा , प्रसिध्दीचा हव्यास त्यांनी कधीच धरला नाही. त्यांना रेमन मॅगेसेसे पुरस्कार, पद्मभूषण, पद्मविभूषण यासह अनेक मोठे पुरस्कार लाभले. एक प्रतिभासंपन्न जीवन ते जगले. आर.के.लक्ष्मण यांनी अजरामर केलेल्या ‘कॉमन मॅन ‘चा पुतळा पुणे आणि मुंबई येथे उभारण्यात आला आहे. हे पुतळे उभे आहेत , पण त्यांना नायकत्व मिळवून देणारा निर्माताच हरवला आहे. त्याला साद घालून म्ह्णावेसे वाटते ...........
 ‘’ हे लक्ष्मणा,       
  तुझ्या कुंचल्याच्या लक्ष्मणरेषांनी                                               सामान्यांच्या संवेदनांना बोलते केलेस                                         त्यांच्या व्यथा - वेदनांना शब्द दिलेस                                         बघ, ही माणसे पुन्हा मूक झालीत                                               पुन्हा एखादा लक्ष्मण जन्मावा                                                  या वाटेकडे आस लावून बसलीत. ’’

( साप्ताहिक प्रजापत्र मध्ये प्रकाशित )

****************************************************************************

Tuesday, January 13, 2015

झुंजार विकास पत्रकार बी. जी. वर्गीस


‘In a shrinking world with information literally at our fingertips, the media needs to play a vital role as a trusted gatekeeper’
आजच्या या धकाधकीच्या काळात माध्यमांची भूमिका महत्वाची आहे असे सांगून, माध्यमांनी जनतेचे रक्षक म्हणून कामगिरी केली पाहिजे हे आग्रहपूर्वक सांगणारा एक भला माणूस मागच्या आठवडयात काळाच्या पडदयाआड गेला. 
 पत्रकार दिनाच्या निमित्ताने या माणसाचे मोठेपण आठवणे आणि त्यांचा संदेश मनात जागा ठेवणे गरजेचे आहे.
स्वातंत्र्यानंतरच्या कालखंडात  भारतात ज्या प्रकारच्या पत्रकारितेची गरज होती ती ओळखून ज्या पत्रकारांनी लेखन केले  त्यात सर्वप्रथम नाव घ्यावे लागेल ते पत्रकार बी.जी.वर्गीस यांचे. निवृत्ती हा शब्दच ज्याच्या शब्दकोशात नव्हता त्या या अवलिया पत्रकाराची लेखणी अखेरच्या श्वासापर्यंत 30 डिसेंबर 2014 पर्यंत जनतेच्या प्रबोधनासाठी आणि विकासासाठी कार्यरत होती. वयाची 88 गाठली तरी या पत्रकाराच्या लेखनाची धार कायम होती.

बी.जी. वर्गीस यांचे पूर्ण नाब बूबली जॉर्ज वर्गीस . ते मूळचे केरळचे पण त्यांचे बालपण परदेशात व्यतीत झाले शालेय शिक्षणासाठी ते जेव्हा डेहराडूनच्या डून स्कूलमध्ये दाखल झाले , तेव्हापासूनच त्यांच्यातील पत्रकारितेची झलक दिसू लागली. डून स्कूल वीकली चे ते संपादक होते.केम्ब्रिज विदयापीठातून अर्थशास्त्राचे सिक्षण घेतल्यावर त्यांनी टाईम्स ऑफ इंडियाचे पत्रकार म्ह्णून कार्यास सुरुवात केली. 1966 ते 1969 या काळात ते पंतप्रधान इंदिरा गांधींचे माहिती सल्लागार होते. 1969 ते 75 या काळात ते हिदुस्तान टाईम्सचे संपादक होते.विकास विषयक प्रश्नांबाबत अभ्यासपूर्वक लेखन , मानवी हक्कांचा लढा, पर्यावरण संवर्धन, भारत- पाकिस्तान संबंध , आंतरराष्ट्रीय संबंध हे त्यांचे आवडीचे विषय होते. त्यांच्या पत्रकारितेतील कार्याबद्द्ल ,1975 साली रेमन मॅगेसेसे पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात आले. यावरुन त्यांच्या पत्रकारितेतील योगदानाचे मोल लक्षात येऊ शकेल.

हिंदुस्तान टाईम्समध्ये असताना 1969 साली त्यांनी पत्रकारितेतील एक नवा प्रयोग केला. हरियानातील चटेरा एक छोटे गाव दत्तक घेऊन तेथील प्रश्नाबाबत वृत्तपत्रात सातत्यपूर्ण लेखन सुरु केले . या गावात पत्रकारांचे पथक पाठवून या लेखाचा ओघ वाहता ठेवला, त्यातून प्रशासनाला जागे केले. विकासाच्या प्रक्रीयेत माध्यमे योगदान देऊ शकतात, विकसनशील देशातील माध्यमांनी सामान्य माणसाशी नाळ जोडून , शहरांकडेच लक्ष केंद्रित न करता , ग्रामीण भागात जाऊन जनतेचे खरे प्रश्न मांडायला हवेत हा संदेश दिला. त्यांनी आधी केले आणि मग सांगितले. विकास पत्रकारिता हा शब्दही भारतात रुजला नव्ह्ता , त्या काळात विकास पत्रकारितेचे प्रयोग करणारा हा पत्रकार होता.

विकास पत्रकारितेबद्दल त्यांचे म्ह्णणे होते की, ‘ सरकारी योजना सांगणे, आणि त्याचे ढोल वाजविणे ही विकास पत्रकारिता नाही. तर जनतेचे खरे प्रश्न मांडून त्याबाबत सरकार काय करीत आहे व सरकारने काय करायला हवे हे सांगणे म्ह्णजे विकास पत्रकारिता.’
1977 मध्ये वर्गीस यांनी केरळमधून लोकसभेची निवडणूक लढविली . जवळ फारसे पैसे नव्ह्तेच, लोकवर्गणीतून निवडणूक लढविली. ते पराभूत झाले , पण त्यांचे मोठेपण यात होते की, लोकवर्गणीतील उरलेली रक्कम त्यांनी समप्रमाणात ज्याची त्याला परत केली.

आणीबाणीच्या विरोधात लेखन केल्यामुळे , त्यांना हिंदुस्तान टाईम्स संपादक पदावरुन दूर करण्यात आले. मात्र त्यांची लेखणी कधी कोणाची बटिक झाली नाही. 1982 ते 86 या काळात ते इंडियन एक्सप्रेसचे संपादक होते. त्यांनी हिमालयातील पर्यावरणाचे प्रश्न मांडणारे ‘वॉटर्स आफ होप’ , पाणी प्रश्न , पत्रकारिता या विषयावर मह्त्वपूर्ण ग्रंथ लिहिले. फर्स्ट ड्रफ्टः मेकिंग ऑफ मॉडर्न इंडिया हा त्यांचा ग्रंथही लक्षवेधी ठरला. त्यांना अनेक पुरस्कारही लाभले. त्यात आसामचा शंकरदेव पुरस्कार,मानवी हक्काच्या लढ्यासाठीचा उपेंद्रनाथ ब्रम्हा पुरस्कार यासह अनेक पुरस्कार लाभले.

पाण्यासाठी, विकासासाठी सर्व देशांनी एकत्र काम करावी यासाठी त्यांची लेखणी झिजत राहिली. जेव्हा मलाला आणि कैलाश सत्यार्थी यांना नोबेल पुरस्कार जाहीर झाला तेव्हा त्यांनी लिहिले ‘’ भारत आणि पाकिस्तान आपसात वैराच्या भूमिकेतून वागत आहेत.अशा काळात पाकिस्तानातील एका मुस्लिम व्यक्तीला आणि भारतातील एका हिंदू व्यक्तीला शांततेचा नोबेल पुरस्कार लाभतो आहे. यातील संदेश हाच आहे की, बालकांच्या भल्यासाठी, पुढच्या पिढ्यांच्या भविष्यासाठी दोन्ही देशात शांतता नांदणे आवश्यक आहे.वर्गीस यांच्या लेखणीतील माणूसपण यातून जाणवते. 
वर्गीस निर्भिडपणे मते मांडणारे पत्रकार होते सध्या सर्वत्र पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक होत आहे, अशा काळात वर्गीस मात्र मोदींच्या अमेरिका दौ-यात झालेल्या प्रकाराबाबत कडाडून टीका केली. 

नव्या काळातील पत्रकारांना मार्गदर्शन करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेऊन 2001 साली ‘ द हूट’ नावाचे वेबपोर्टल सुरु केले. पत्रकारितेतील मूल्ये कोणती आहेत, ती कशी जपावित याचे धडे यातून पत्रकारांना दिले   जातात मूल्याधिष्ठित पत्रकारितेसाठी आयुष्य वेचणारा हा आगळावेगळा पत्रकार कायम स्मरणात राहील.
( पूर्व  प्रसिध्दी  दैनिक सकाळ दिनांक ५ जानेवारी २०१५ )





महाराष्ट्रातील तरुण पिढीचे भवितव्य कंत्राटदारांच्या कचाटयात

  एक आदमी रोटी बेलता है एक आदमी रोटी खाता है एक तीसरा आदमी भी है जो न रोटी बेलता है, न रोटी खाता है वह सिर्फ़ रोटी से खेलता है मैं पूछता हूँ...