Sunday, April 21, 2019

जागा राहा रात्र माध्यमांची आहे


माणूस आणि जीवसृष्टीतील इतर प्राणीमात्र एकच मोठा फरक आहे तो म्हणजे जिज्ञासा अथवा कुतुहल. माणूस फक्त आपला विचार करीत नाही तर इतरांचा, जीवसृष्टीचा व त्यापलिकडचाही विचार करतो. या मानवी जिज्ञासेतूनच माध्यमांचा जन्म झाला आहे. ‘माध्यम’ हा शब्द मुळात मिडियम’ या असिरिअन शब्दापासून तयार झालेला आहे. ‘माध्यम’ म्हणजे संवादाचे असे साधन आहे की ज्याव्दारे विचार, भावना , घडामोडी इतरांना कळविता येतात. जेव्हा मोठया जनसमुदयापर्यंत या बातम्या, संदेश पोहोचवायच्या असतात, तेव्हा एखाद्या यंत्राचा/तंत्राचा आधार घेतला जातो, तेव्हा याच माध्यमांना प्रसार माध्यमे ( मास मिडिया ) म्हटले जाते. या प्रसार माध्यमांना सर्वत्र ‘माध्यमे असेच संबोधले जाते, त्यामुळे या लेखात प्रसार माध्यमांचा उल्लेख माध्यमे असाच केला आहे.
माध्यमांचे प्रामुख्याने पाच प्रमुख प्रकार सांगता येतील .त्यात पारंपरिक माध्यमे ( लोकनाटय, गोंधळ, कीर्तन इत्यादी), मुद्रित माध्यमे ( वृत्तपत्रे, मासिके),दृकश्राव्य माध्यमे (रेडिओ, टेलिव्हीजन, चित्रपट इत्यादी), बाहय प्रसिध्दी माध्यमे ( होर्डिंग्ज, बॅनर इत्यादी), इंटरनेट माध्यमे ( समाज माध्यमे, ब्लॉग,वेब पोर्टल इत्यादी ) यांचा समावेश होतो.
माध्यमांची प्रमुख कार्ये माहिती देणे, ज्ञान देणे, रंजन करणे, सेवा देणे आणि प्रबोधन करणे ही आहेत. माध्यम शास्त्रानुसार बातमी ही पवित्र असते, त्यामुळे ती आहे तशी दयावी असे मानले जाते. जर मते व्यक्त करायची असतील तर ती बातमीत नव्हे तर लेख , अग्रलेखातून व्यक्त करावित असे मानले जात होते.
भारताचा विचार केला तर पारंपरिक माध्यमे ही समाजातूनच उदयाला आली. लोकजीवन , लोकसंस्कृतीचे प्रतिबिंब त्यातून दिसत होते.दळवळणाची फारशी साधने नसल्याने ही माध्यमे व त्यातील संदेश त्या-त्या प्रदेशापुरतेच सीमित राहिले. स्वातंत्र्यलढयाच्या काळात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, अमर शेख इत्यादींनी लोकजागृतीसाठी शाहिरीचा उपयोग करुन घेतला असे काही अपवाद वगळता, लोकमाध्यमांचा प्रभार सीमित राहिला व ही लोकमाध्यमे पुढे अस्तंगत होत गेली.
 मुद्रित माध्यमाच्या व्‍2कसाची सुरुवात 1454 मध्ये जर्मनीतील जोहान्स गटेनबर्ग यांनी हलत्या टंकाचा ( टाईप) शोध लावला तेथून झाली . जगात आणि भारतात मुद्रणाचा वापर प्रथम धर्मग्रंथ छापण्यास झाला, त्यामुळे छापलेले प्रत्येक अक्षर खरे व पवित्र असे मानले जाऊ लागले. त्यापाठोपाठ आलेल्या वृत्तपत्रातील बातम्या, मजकुरालाही समाजात मानाचे स्थान प्राप्त झाले. भारतात स्वातंत्र्यलढयाच्या काळात महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरु, लोकमान्य टिळक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, मौलाना आझाद, लाला लाजपत राय यांच्यासह सर्वच नेत्यांनी वृत्तपत्रे स्वातंत्र्य व सामाजिक लढयाचे साधन म्हणून उपयोगात आणली, त्यामुळे भारताच्या स्वातंत्र्य लढयास मोठे बळ मिळाले आणि देश स्वतंत्र झाला. माध्यमांची शक्ती किती असते याचा प्रत्यय सर्वांना आला. ती वृत्तपत्रे मतपत्रे होती, ती बहुतांशी समाजहितासाठी काय्‍॒ करीत होती. त्यामुळे त्यांचे बाहयस्वरुप ओबडधोबड आणि कृष्णधवल असले तरी त्यांचे अंतरंग हे सुंदर, पवित्र होते. आता गुळगुळीत कागदावर रंगीत छपाई होत आहेत. बाहयस्वरुपात सुंदर भासणा-या बहुतांशी वृतपत्र, मासिकांचे अंतरंग मात्र कुरुप आहे.
1913 मध्ये सिनेमा हे नवे माध्यम भारतात उपलब्ध झाले. दादासाहेब फाळके, बाबुराव पेंटर, व्ही.शांताराम, विष्णुपंत दामले, सत्यजित रे, मृणाल सेन, श्याम बेनेगल, गोविंद निहलानी यांच्यासह अनेक दिग्दर्शकांनी चांगल्या चित्रपटांची न्‍2र्मिती केली. मात्र भारतीय समाजमन मसाला चित्रपटांच्या दुनियेतच रममाण झाले. त्यामुळे गोलमालसारख्या भंपक चित्रपटाचे पाच – पाच भाग निघतात आणि प्रत्येक भाग 100 कोटीपेक्षा अधिक कमाई करतो.सिनेमाला केवळ रंजनाचे साधन मानले गेल्याने या माध्यमाचे अंतरंग मारधाड, हिंसाचार, बलात्कार, प्रेमदृश्ये यातच धन्यता माननारे बनले आहे.
1927 नंतर नभोवाणीची ( रेडिओ ) सुरुवात झाली. या माध्यमाला प्रारंभी इंग्रजांनी आणि स्वातंत्र्यानंतर भारतीय सरकारने बंधनात ठेवले. 1990 नंतर खाजगी एफ.एम.ला परवानगी देण्यात आली मात्र, फक्तगाणी वाजविण्यासाठीच. त्यामुळे या माध्यमाची शक्ती शासकीय प्रचार आणि रंजन यापलिकडे वापरलीच गेली नाही.
1959 नंतर चित्रवाणीचा ( टेलिव्हिजन) उदय झाला. या माध्यमालाही प्रारंभी सरकारी बंधनात ठेवले गेले, 1990 नंतर अचानक मुक्त करण्यात आले .आता 400 बातम्यांच्या आणि इतर 500 अशा एकंदर 900 पेक्षा अधिक चित्रवाहिन्या आहेत. बहुराष्ट्रीय कंपन्यांनी या क्षेत्रावर कब्जा केला आहे. जाहिरातींसाठी वाटेल त्या तडजोडी केल्याने यातील बहुतांश वाहिन्या पाश्चिमात्य संस्कृती लादण्यातच धन्यता मानत आहेत.
1990 नंतर इंटरनेट व त्यानंतर समाज माध्यमांचा ( सोशल मिडिया ) उदय झाला. प्रत्येक भारतीय माणूस फेसबुक, व्हॉटसअप, व्टिटर, यू टयूब किंवा इतर कोणत्या तरी समाज माध्यमाचा भरपूर वापर करतो आहे.या माध्यमातून कोनलाही लिहिता  येते, मते, चित्रे, व्हिडिओ पाठविता येतात. या माध्यमाच्या अमर्याद शक्तीचा समाजहितासाठी सकारात्मक वापर करण्याऐवजी, व्देष, जातीयता, हिंसक विचार पसरविण्यासाठी या माध्यमाचा वापर अधिक होतो आहे. या माध्यमांचे मालक हे परदेशात असल्याने यातील मजकुरावर प्रतिबंध घालता येईल असे सशक्त कायदेच उपलब्ध नाहीत.
मोबाईलच्या माध्यमातून नवे डिजिटल माध्यम आता अवतरत आहे. उद्याचे भविष्य हे मोबाइलभोवतीच फिरणारे असणार आहे. सिनेमापेक्षा टीव्हीचा पडदा छोटा म्हणून त्याला घोटा पडदा म्हटले जायचे, त्याहीपेक्षा छोटया मोबाईलच्या पडदयावर आता जग सामावले जात आहे. वेब सिरिजने पुढच्या काळाची चुणुक दाखवायला सुरुवात केली आहे. यापुढच्या काळातील माध्यमांचे अंतरंग हे अधिक संकुचित , अधिक भयावह असेल अशीच शक्यता आहे.
बडया भांडवलदारांच्या आणि जाहिरातदारांच्या कचाटयात माध्यमे जाऊ नयेत अशी महात्मा गांधी आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची इच्छा होती. पहिल्या आणि दुस-या वृत्तपत्र आयोगांनीही यासाठी अनेक सुधारणा सुचविल्या व त्यानुसार सरकारनेही काही कायदे केले. मात्र या कायद्यांना बडया माध्यम समूहांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. न्यायालयाने सरकारने केलेले कायदे रद्द ठरविले. त्यामुळे भारतातील माध्यमांतील गळेकापू स्पर्धेला मोकळे रान मिळाले. बडे उद्योजक अथवा राजकारणी हेच माध्यम सम्राट बनले. छोटी वृत्तपत्रे, वाहिन्यांना गिळंकृत करीत, आठ - दहा माध्यम सम्राटांनी आपल्या साम्राज्याचा प्रचंड विस्तार केला. या माध्यम सम्राटांच्या हाती 70 टक्के माध्यमे आहेत आणि 90 टक्के जनतेचा कब्जा त्यांनी मिळविला आहे. या माध्यम सम्राटांनी माध्यमांच्या मूळ उद्देशांना आणि नैतिकतेला तिलांजली दिली आहे. त्यामुळे आजच्या माध्यमांचे अंतरंग खूपच वेगळे आहे. जनहिताचा विचार करुन माध्यमे समाजप्रहरी म्हणून  कार्य करतील या भाबडया आशावादाला आता अर्थ राहिलेला नाही.  माध्यमांमधून दिल्या जाणा-या बातम्यांची विश्वासार्हता केव्हाच हरवलेली आहे. त्याउलट माध्यमांव्दारे दिल्या जाणा-या खोटया बातम्या ओळखणे हेच मोठे आव्हान बनले आहे. ही माध्यमे आता जनतेसाठी नव्हे तर बडया राजकारण्यांसाठी, जाहिरातदारांसाठी काम करीत आहेत. पैशांसाठी मिंधे होऊन फेक न्यूज आणि पेड न्यूज देणा-या या माध्यमांकडे आता समाज बदलण्याची शक्ती राहिलेली नाही . त्यामुळे जनतेला रंजनाच्या मोहपाशात गुंग ठेवण्याचे काम ही माध्यमे करीत आहेत. अशा या विपरित परिस्थितीत अजूनही आशेचा एक किरण आहे, तो म्हणजे जनहितासाठी निष्ठापूर्वक कार्य करणारे मोजके पत्रकार. माध्यमांनी संधी दिली नाही तरी ब्लॉगव्दारे, समाज माध्यमांव्दारे सत्य जनतेपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न ते करीत आहेत. अशा वेळी सर्वसामान्य माणसाला मात्र सांगावेसे वाटते की जागा राहा रात्र माध्यमांची आहे, त्यांच्यावर विसंबू नकोस;खरे काय ते तूच पारखून घे.

(मुंबई येथून प्रकाशित झालेल्या चैत्र पालवी माध्यम विशेष अंकात माध्यमांचे अंतरंग हा  लेख प्रसिध्द झाला आहे.)

1 comment:

  1. माध्यमांची शक्ती किती असते याचा प्रत्यय सर्वांना आला. ती वृत्तपत्रे मतपत्रे होती, ती बहुतांशी समाजहितासाठी काय्‍॒ करीत होती. त्यामुळे त्यांचे बाहयस्वरुप ओबडधोबड आणि कृष्णधवल असले तरी त्यांचे अंतरंग हे सुंदर, पवित्र होते. आता गुळगुळीत कागदावर रंगीत छपाई होत आहेत. बाहयस्वरुपात सुंदर भासणा-या बहुतांशी वृतपत्र, मासिकांचे अंतरंग मात्र कुरुप आहे.

    वेब सिरिजने पुढच्या काळाची चुणुक दाखवायला सुरुवात केली आहे. यापुढच्या काळातील माध्यमांचे अंतरंग हे अधिक संकुचित , अधिक भयावह असेल अशीच शक्यता आहे.



    वास्तववादी सत्य आहे...

    खूप छान माहीती सर......

    ReplyDelete

कोण होतास तू काय झालास तू ?

खींचो न कमान को न तलवार निकालो जब तोप मुक़ाबिल हो तो अख़बार निकालो भारतावर इंग्रजांची राजवट होती त्या काळात अकबर इलाहाबादी यांनी लिहिलेला हा...